– डॉ. विठ्ठल लहाने यांचे आवाहन
लातूर दि.17-04-2022
माझ्या दिनक्रमानुसार मी दररोज पावनेपाच वाजता उठतो, आई वडिलांच्या सेवेमुळे आजही तब्बल चौदा तास काम करतो. दीडशे कर्मचार्यांचा मदतीतून आजपर्यंत साठ हजार शस्त्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत. गेल्या 17 वर्षापासून मी काम करीत आहे. दररोजच्या 16 शस्त्रक्रियेपैकी 3 शस्त्रक्रिया मोफत करतो. हे सर्व शक्य होतं ते आई वडिलांची सेवा व कार्यातील सातत्यामुळे. त्यामुळे नीट परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांनीही नीट परीक्षेला सामोरे जाताना सातत्याने व थोडा-थोडा अभ्यास केला तर यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन प्रसिध्द प्लास्टिक सर्जन डॉ.विठ्ठल लहाने यांनी केले.

यावेळी ते अराईज अकॅडमी व सुर्यवंशी बायोलाँजी क्लासेसच्यावतीने कूसूम सभागृह नांदेड येथे आयोजित “संकल्प ते सिध्दी” या विषयावरील भव्य मार्गदर्शन समारंभात प्रमुख उद्घाटक व वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर हे होते. तसेच प्रसिद्ध सिनेअभिनेते तथा सेवानिवृत्त सनदी अधिकारी अनिल उर्फ एकनाथराव मोरे, नांदेड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, अराईज अकॅडमीचे चेअरमन रणजितसिंह पाटील कव्हेकर, अराईजचे संचालक संभाजीराव पाटील रावणगावकर, अराईज अकॅडमी सेंटर हेड विक्रांत शेटे, मार्र्केटिंग हेड बळीराम घोणसे, प्रा.आर.के.मिश्रा, प्रा.ए.पी.एस.सर, सूर्यवंशी बायोलॉजी क्लासेसचे संचालक प्रा.राजू सूर्यवंशी, प्रा.राजकुमार गुप्ता, प्रा.शशांक अलोरा, प्रा.रवी जैस्वाल, प्रा.अमृत अनुराग, प्रा.गव्हाणे, धिरजकुमार मिश्रा, अराध्य अवस्थी, विरेंद्र द्विवेदी, अराईज अकॅडमीचे शुभम पाटील यांच्यासह मान्यवर मंडळीची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ.लहाने म्हणाले की, माझा दैनंदिन दिनक्रम व्यस्त असला तरी विद्यार्थ्यांसाठी मी सदैव वेळ देण्याचे काम करतो. या माध्यमातून जवळपास 25 हजार विद्यार्थ्यांना मी सोशल मिडीयाच्या माध्यमातून जोडला गेला आहे तर 80 हजार विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे संवाद साधण्याचे काम केलेले आहे. घरातील परिस्थिती प्रतिकूल असतानाही अभ्यासातील सातत्यामुळे 14 गोल्ड मेडल मिळाले असून या माध्यमातून देशात भरारी घेण्याचे काम मी केलेले आहे, ते रेकॉर्ड तोडण्याचे काम तुम्ही करा त्यासाठी योग्य ते बक्षीस जाहीर केले असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यार्थी जीवनामध्ये बुलेटप्रुफसारखे ध्येय ठेवून वाटचाल करा, आई वडिलांची सेवा करा, जीवनात अनेकदा अपयश मिळते त्याने खचून जाऊ नका. कारण नापास झालेले विद्यार्थीच मोठे होतात. हा इतिहास आहे. त्यामुळे अराईज अकॅडमीच्या माध्यमातून यश मिळवून नीटमध्ये देशात नावलौकिक मिळवण्यासाठी अग्रेसर रहा याचे सर्वांना कौतुकच वाटेल असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.ए.पी.एस. सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार अब्दूल गालिब शेख यांनी केले.
सीबीसीएस शिक्षणातून देश सामर्थ्यशाली बनेल – माजी आ.कव्हेकर
जेएसपीएम शिक्षण संस्था गेल्या 38 वर्षापासून 30 युनिटच्या माध्यमातून अध्यात्म, विज्ञान व व्यावसायीकतेवर आधारित शिक्षणातून तेजस्वी विद्यार्थी घडविण्याचे काम करते. यामध्ये अराईज अकॅडमीच्या माध्यमातून नीटचे विद्यार्थी घडविण्याचे काम नांदेड व लातूर येथे सुरु केलेले आहे. मधुर इंदानी या विद्यार्थ्यांने ई.डल्यूएस कॅटॅगेरीतून 312 वी रँक मिळविण्याचे काम केलेले आहे. तसेच श्रीनिधी मनोज पाते या विद्यार्थींनीने 709 गुण घेवून नीटमध्ये यश मिळविले तर नयन पाटील हा विद्यार्थीही नीटमध्ये त्याच पध्दतीने यश मिळवेल, अशी अपेक्षाही व्यक्त करत मोदीजी यांनी नवीन सीबीसीएस शिक्षणपध्दती आणून शिक्षणामध्ये अध्यात्म, विज्ञान, संशोधन, योगा अशा अनेक विषयाला प्राधान्य देण्याचे काम केलेले आहे. त्यांच्या या चौफेर कार्याबद्दल जगातील तेरा राष्ट्रांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गौरव केला. यामध्ये तीन मुस्लीम राष्ट्रांचा समावेश आहे. हाच विचार, हीच दिशा कायम ठेवून वाटचाल केल्यास सीबीसीएस शिक्षणातून देश सामर्थ्यशाली बनेल असे प्रतिपादन जेएसपीएम शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
समजा उपयोक्ततेसाठी जेएसपीएमची स्थापना – प्रसिध्द सिनेअभिनेते अनिल मोरे
आज आयुष्याचा संकल्प दिवस नीट परीक्षा देण्यार्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल नावाच्या व्यक्तीसमोर संकल्प केला तर तडीस जातो ही खरी बाब आहे. अशी खडतर वाटचाल करून यश मिळविलेले डॉ.विठ्ठल लहाने यांचा सहवास आज मिळाला. त्याचबरोबर कुठलाही आर्थिक विचार न करता केवळ सामाजिक भूमिकेतून गेल्या 38 वर्षापूर्वी जेएसपीएम संस्थेची स्थापना करून सर्वसामान्य गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केलेले आहे. त्यामुळे आज अनेक विद्यार्थी राज्यात विविध पदावर कार्यरत आहेत. अराईज अकॅडमीच्या माध्यमातूनही अनेक विद्यार्थी डॉक्टर होतील. मी ही शैक्षणिक जिवनामध्ये अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या. कठोर परिश्रमानंतर राज्यात तेरावा सनदी अधिकारी म्हणून राज्याचे ग्रामविकास खात्याचे काम पाहण्याचे काम केले. त्यामुळे आज सेवानिृवृत्तीनंतर का होईना या जेएसपीएम व अराईज अकॅडमीच्या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली. त्यामुळे समाज उपयुक्ततेसाठी स्थापन केलेल्या जेएसपीएम संस्थेला भविष्यातही दैदिप्यमान यश मिळो अशी अपेक्षा प्रसिध्द सिनेअभिनेते अनिल उर्फ एकनाथराव मोरे यांनी केले.
——————————————————-