राजकीय विश्लेषण
◆ उद्धव सरकारचा ‘निकाल’ घेणारी निवडणूक
■ राजेंद्र शहापूरकर ■
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या सोमवारी निवडणूक होत आहे. राज्यसभा निवडणुकीतील दणक्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीने महाआघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी या घटकांनी प्रयत्न करून पाहिला पण काँग्रेसचे भाई जगताप यांनी ऐकले नाही असे म्हणतात. त्यामुळे नाराज झालेल्या सेनेने ‘तो फिर तुम तुम्हारा देख लो ‘ म्हणत आपल्या दोन उमेदवारांवर कॉन्सट्रेट करण्याचे ठरविले , राष्ट्रवादीनेही त्याच्या दोन उमेदवारांवर लक्ष ठेवण्याचा ‘निकाल’घेतला.भाई जगताप काँग्रेसचे दुसरे उमेदवार आहेत (पहिले चंद्रकांत हंडोरे) त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्याकडेच आहे असे दिसते. भाजपाने याही वेळी सत्तारूढ आघाडीत मोडतोड घडवून आणण्याचे निश्चित करून पाचवा उमेदवार म्हणून प्रसाद लाड यांना रिंगणात आणले आहे. लाड महाशय विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस याचे लाडके समजले जातात त्यामुळे ही निवडणूक कोणाला धक्का देऊन जाते ते आज सांगता येणार नाही.

राज्यसभेच्या पार्श्वभूमीवर यावेळी एक बाब डोळ्यात भरण्यासारखी आहे ती म्हणजे सेना प्रवक्त्यांची ऐकू न आलेली (आजपर्यंत) बडबड! राज्यसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून ‘पवारांचा कार्यक्रम’ होईपर्यंत आणि त्यानंतरही प्रवक्त्यांच्या तोंडाला दम नव्हता .म्हणजे त्यांच्या बडबडीलाही ‘दम’ तसा नव्हताच म्हणा ! यावेळी मात्र अजूनतरी त्यांच्या वलग्ना कानावर पडलेली नाही .कदाचित युवानेत्याच्या अयोध्या दौऱ्याच्या सरबराईत त्यांची ‘रसवंती’ गुंतल्यामुळे तसे झाले असावे. काही हरकत नाही अजुन चार दिवस व पुढचे दोन-तीन दिवस धरले तर आज- उद्यापासून त्यांचा ‘अखंड बडबड सप्ताह’ सुरू होईल असा विश्वास व्यक्त करण्यास हरकत नाही.
विधान परिषदेत राज्यसभेची पुनरावृत्ती झाली तर फटका कुणाला बसेल हे सांगता येत नाही. म्हणजे भाजपाला बसला तर आघाडी सरकारच्या दृष्टीने सोन्याहून पिवळं , काँग्रेसला बसला तरी फारसा फरक पडणार नाही पण जर तो राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसे किंवा सेनेच्या एखाद्या उमेदवारांला बसला तर मात्र राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळू शकते. ही शक्यता गृहीत धरूनच की काय शिवसेनेने आपले सर्व आमदार मुंबईत बोलावून घेतले आहेत आणि यावेळी ‘ट्रायडन’ ऐवजी पवईतील ‘रेनिसन्स’ निवडले आहे. भाजपानेही आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्याचा निर्णय घेतला आहे . दोन दिवसात त्यांचीही ‘व्यवस्था’ होईल असे दिसते. आजचे चित्र पाहाता काँग्रेसचे भाई जगताप व भाजपाचे प्रसाद लाड यांना दहा आमदारांची गरज आहे. तसे झाले तर या दोघांपैकी एक विजयी होईल मात्र ते दोघेही विजयी झाले तर राज्यात ‘बडा कुछ होनेवाला’ है,असे गृहीत धरून चला !