रामेश्वर नगरीत विश्वधर्मी मानवतातीर्थ भवनाची उभारणी लवकरच लोकार्पण सोहळा;
जगभरातील मान्यवर येणार- डॉ. प्रा. विश्वनाथजी कराड
लातूर दि. २८ – सर्वधर्मसमभाव आणि विश्वबंधुत्वाचा एक नवा आदर्श निर्माण करणाऱ्या लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर (रुई) हे महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील स्वावलंबी व आदर्श गाव म्हणून उदयास आले असून येथे भव्य दिव्य उभारण्यात आलेल्या ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’ च्या माध्यमातून संपूर्ण जगाला ‘वसुधैव कुटुंबकम्’ व ‘एकं सत् विप्रा बहुदा वदंती’ हा मानवतेचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस यूनिवर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

सदरील रामेश्वर (रुई) येथे साकारण्यात आलेल्या ‘अद्वितीय विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’ या वास्तूचा लोकार्पण सोहळा १४ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमास देशभरातीलच नव्हे तर जगभरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे. अत्यंत अस्मरणीय असा लोकार्पण सोहळा होईल अशी ही माहिती डॉ. प्रा. विश्वनाथजी कराड यांनी दिली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी एक आदर्श व स्वयंपूर्ण खेडे कसे असावे, याची संकल्पना मांडली या संकल्पनेला अनुसरून डॉ. प्रा. विश्वनाथजी कराड यांच्या पुढाकाराने रामेश्वर (रुई) येथे आदर्शवत् व स्वावलंबी असे खेडे निर्माण करण्यासाठी ग्रामस्थांसोबत, रामेश्वर (रुई) गावाचे रूप पालटून आता त्याची विश्वधर्मी मानवता तीर्थ अशी ओळख निर्माण झाली आहे. प्रभु श्रीराम मंदिर, जामा मस्जिद व हजरत जैनुद्दिन चिस्ती दर्गा याचे पुर्ननिर्माण रामेश्वर (रुई) गावातील समस्त हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन केले व सर्वधर्मसमभाव आणि विश्वबंधुत्वाचा एक नवा आदर्श भारतासमोर ठेवला. त्याचप्रमाणे, भारतातील सर्वात मोठा लाल मातीचा कुस्ती आखाडा, ग्रामीण रुग्णालय व वाचनालय, सर्व धर्मांचा संदेश देणारा विश्वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतू, तथागत भगवान गौतम बुद्ध विहार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, रामेश्वर (रुई) चे श्रद्धास्थान असलेले संत श्री गोपाळबुवा महाराज यांचे अत्यंत सुंदर समाधी मंदिर अशा विविध समाजोपयोगी उपक्रमातून रामेश्वर (रुई) हे महात्मा गांधींच्या स्वप्नातले स्वावलंबी व आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

विश्वधर्मी मानवता तीर्थ भवन लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर येथे साकार होत असून याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस डॉ. प्रा. विश्वनाथजी कराड यांच्यासह प्रगतशील शेतकरी श्री. काशीरामनाना कराड, डॉ. महेश थोरवे आणि गिरीश दाते यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉ. प्रा. विश्वनाथजी कराड म्हणाले की, विश्वशांती, सर्वधर्मसमभाव, विश्वबंधुत्व आणि मानवतेचा संदेश देणारी एकमेवाद्वितीय वास्तु रामेश्वर (रुई) येथे साकार होत असून या वास्तूस ‘विश्वधर्मी मानवता तीर्थ भवन’ असे नामकरण करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीचे ‘वसुधैव कुटुंबकम्’ व ‘एकं सत् विप्रा बहुदा वदंती’ हे संदेश जगाला विनाशापासून वाचवू शकतात, अशी आमची धारणा आहे आणि हाच संदेश एकमेवाद्वितीय अशा ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’ च्या माध्यमातून संपूर्ण जगाला देण्याचा हा प्रयत्न आहे.

विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन हे २५० फूट लांब आणि ९० फूट रुंद एवढ्या मोठ्या छताचे उभारणी केली असून भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीकच म्हणावे लागेल. या भवनात मानवतेचा इतिहास घडविणाऱ्या अनेक थोर संत, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ यांच्या भव्य चित्रांमधून आणि त्यांच्या संदेशांमधून मानवता भवनाचे एक आगळेवेगळे दर्शन समाजाला घडेल यात शंका नाही या भवनाचा योग ध्यानधारणा व ओंकार साधना, केंद्र, सरपंच परिषद तसेच इतर ग्रामपंचायती संबंधी कार्यक्रम, कृषी मेळावे, कुस्ती स्पर्धा तसेच टेबलटेनिस, कॅरम इ. इनडोअर खेळ, रक्तदान शिबिरे, विविध विषयांवरच्या परिषद, चर्चासत्र, कार्यशाळा, मुलांसाठी संस्कार शिबिरे, महिला बचत गटांच्या बैठका / मेळावे, लोकशिक्षण व साक्षरता कार्यक्रम, पत्रकारांसाठीचे मेळावे, लोकोपयोगी प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम, वारकरी प्रशिक्षण केंद्र, भागवत सप्ताह, भजन / कीर्तन / भारूड संबंधी कार्यक्रम, विविध वस्तूंचे प्रदर्शन या शिवाय इतर विविध लोकोपयोगी कार्यक्रमाठी वापर केला जाणार आहे.





