संस्कारीत पिढी निर्माण होणे गरजेचे
शतकपुर्ती सोहळयात आ. रमेशअप्पा कराड यांचे प्रतिपादन
लातूर दि.१४–
माणसाला आयुष्यात सर्वकाही मिळते मात्र शरीर संपत्ती सहज मिळत नाही. सगळं आहे त्यांना अनेक व्याधी आहेत, संस्कार नसल्याने आजकाल तरूणांचा कल वाममार्गाकडे वाढत आहे. हे अत्यंत दुर्दैवी असून संस्कारीत पिढी निर्माण होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी केले.

लातूर तालुक्यातील मौजे सामनगाव येथील केरबा बुलबुले यांनी नुकतीच वयाची शंभर वर्षे पुर्ण केल्याच्या निमित्ताने आयोजित शतकपुर्ती सोहळयात आ. रमेशअप्पा कराड बोलत होते. या प्रसंगी बर्दापुर येथील मठाचे श्री. १०८ चन्नबस्व शिवाचार्य महाराज, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर, भाजयुमोच्या प्रदेश प्रवक्त्या प्रा. प्रेरणा होनराव, जिल्हा उपाध्यक्ष भागवत सोट, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, तालूकाध्यक्ष बन्सी भिसे, ज्ञानेश्वर जूगल, सरपंच नरसिंग बुलबुले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास सर्व स्तरातील नागरीक, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

शतकपुर्ती निमित्ताने केरबा बुलबुले यांचा यथोचित सत्कार करून गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक शालेय साहित्याची तुला करण्यात आली. प्रारंभी आमदार स्थानिक निधी अंतर्गत सामनगाव येथील सात लक्ष रूपये खर्चाच्या सिमेंट रस्त्याच्या कामाचा आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
शंभर वर्षे पुर्ण केलेल्या केरबा बुलबुले अप्पा यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहिल्यावर आम्हालाही उर्जा येते असे सांगून आ. कराड म्हणाले की, केरबाअप्पा आज पाचवी पिढी बघत आहेत हे भाग्य लाभण्यासाठी खरोखर परमेश्वराचा आशिर्वाद आणि सत्कार्यच असावे लागते. नाहीतर आजकाल साठ सत्तर वर्षातच आयुष्य संपुष्टात येवू लागले आहे. कोरोनाच्या महाभयंकर काळात आपल्या जवळचे अनेकजण आपल्याला सोडून निघून गेले. मात्र केरबा बुलबुले आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला कोरोना आजाराने साधा स्पर्शही केला नाही असे बोलून दाखविले.

कितीही दुःख आले तेव्हा आईने पाठीवर थाप मारली तर आलेले दुःख सहजतेने नाहीसे होते आणि वडीलांनी मी आहे घाबरू नको एवढेच म्हटले तरी हिम्मत येते. गुरूजनांचा आशिर्वाद आणि आईवडीलांचे संस्कार असतील तरच चांगली पिढी घडते असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, विधानसभेचा आमदार असतो तर दोन तीन तालुक्याचा राहिलो असतो आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने आज मी महाराष्ट्राचा आमदार आहे. आजपर्यंत आपण मला खुप प्रेम दिले वेळोवेळी साथ दिली यापुढील काळातही देणार आहोत यात शंका नाही. सामनगावच्या सर्वांगीन विकासासाठी जे जे शक्य आहे ते ते करू असे सांगून विकास कामे करण्यासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही दिली.
