शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी
नरेंद्र मोदींनी अनेक योजना सुरू केल्या
रामेश्वर येथील शेतकरी प्रशिक्षण मेळाव्यात आ. रमेशआप्पा कराड
लातूर दि.११ – शासन संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला वेळोवेळी मदत करते मात्र केवळ अनुदानाच्या आशेवर राहणार असाल तर कधीच प्रगती होणार नाही. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या असून शेतीतून मिळालेल्या चार पैशात जे समाधान आहे ते कशातच नाही. ऊस, सोयाबीन पिकाला आता अनेक पर्याय पुढे आले आहेत तेव्हा शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोडून आधुनिक पद्धतीने शेती करावी असे आव्हान भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेशआप्पा कराड यांनी केले आहे.
अनुलोम संस्था आणि प्रयाग ग्रीन्स शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर येथे आ. रमेशआप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी प्रशिक्षण मेळावा नुकताच झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खा. सुधाकर शृंगारे, बांबू लागवड सल्लागार समितीचे राष्ट्रीय सदस्य पाशा पटेल, अनुलोम संस्थेचे कार्यकारी संचालक स्वानंदजी ओक, हिल इंडिया कंपनीचे मार्केटिंग उपव्यवस्थापक विकास यादव, भाजपाचे सहप्रवक्ते राम कुलकर्णी, प्रदेशाचे अमोल पाटील, जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, गोविंद नरहरे, कौशल्या सिल्क धागा उद्योगाचे ऋषिकेश कराड, मेळाव्याचे संयोजक प्रयाग ग्रीन्स शेतकरी उत्पादक कंपनीचे चेअरमन राजेश कराड यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, शेतकरी कुटुंबात आणि वारकरी संप्रदायात माझा जन्म झाला. वडील चुलत्यांनी आयुष्यभर कष्ट केले मेहनत केली मातीतून सोन पिकविले त्यांच्या कष्टातून इथपर्यंत आज आम्ही पोहोचलो याची जाणीव सगळ्या पुढच्या पिढीला असल्याने समाजासाठी शेतकऱ्यासाठी काहीतरी करावे हे आपले नैतिक कर्तव्य आहे असे समजून शेतकऱ्याच्या कष्टाचे घामाचे चीज झाले पाहिजे, योग्य मोबदला मिळाला पाहिजे याकरिता शेतकरी प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन केले.

आई वडील शेतात कष्ट करतात मात्र त्यांची मुलं पान टपरीवर बसून असतात. नोकरीसाठी दारोदार फिरतात मुलांनी शेतीत कष्ट केले तर नोकरीपेक्षा कितीतरी पटीने मोबदला मिळू शकतो असे सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की काँग्रेसवाल्यांनी आजपर्यंत आपल्याच बगलबच्चांना शासनाच्या योजनेचा लाभ दिला मात्र पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी अनेक योजना ऑनलाईन केल्याने त्याचा लाभ गरजूंना मिळत आहे. उत्पादित शेतीमालाला स्थानिक बाजारपेठ मिळाली तर त्याकडे शेतकरी वळतो त्यामुळे शेती उत्पादनावर आधारित उद्योग मोठ्या प्रमाणात व्हायला हवेत याकरिता तरुणांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
मानवाची गरज अन्न, वस्त्र, निवारा हे जरी असले तरी त्या अगोदर ऑक्सिजन महत्वाचे आहे. ऑक्सिजनचे कारखाने नाहीत तर ते झाडातून मिळते वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्याने निसर्गाचा समतोल बिघडला आहे. वातावरणात बदल झाल्याने कार्बन झपाट्याने वाढत आहे असे सांगून पाशा पटेल म्हणाले की, इतर झाडापेक्षा ३० टक्के अधिक ऑक्सिजन बांबूचे झाड देते. बांबू शिवाय पुढची पिढी जगू शकत नाही. आंबा, चंदन, सागवान यापेक्षा बांबूचे झाड शेतकऱ्यांना परवडणारे असून बहुउद्देशीय आहे. बांबूपासून फर्निचर, पेट्रोल, डिझेल, कपडे यास आठराशे वस्तू तयार होतात. बांबू लागवड करण्यासाठी तीन वर्षात हेक्टरी सहा लाख रुपयांचे अनुदान शासन देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या मेळाव्यात खासदार सुधाकर शृंगारे, मार्केटिंग उपव्यवस्थापक विकास यादव, यशस्वी गटशेतीचे वैजनाथ कराड, रेशीम उद्योग अधिकारी बी. वी. वऱ्हाड अनुलोमचे विभागीय समन्वयक मोरगुलवार यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून सुधारित शेती, गटशेती, बांबू लागवड, शासकीय योजना, फवारणी, कीटकनाशके यासह विविध विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रारंभी संयोजक राजेश कराड यांनी शेतकरी प्रशिक्षण मेळाव्याच्या आयोजना मागची भूमिका विशद करून येत्या काळात याहीपेक्षा अधिक प्रमाणात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळावे घेण्यात येतील असे बोलून दाखविले.

शेतकरी प्रशिक्षण मेळाव्याच्या निमित्ताने विविध कंपन्यांनी उभारलेल्या कीटकनाशके, फवारणी यंत्र, सेंद्रिय शेती, मशागत यंत्र, विविध जातीची रोपे, बी बियाणे स्टॉलला उपस्थित मान्यवरांसह शेतकऱ्यांनी भेटी देऊन आधुनिक शेतीची माहिती जाणून घेतली या शेतकरी मेळाव्यास लातूर रेणापूर तालुक्यासह जिल्हाभरातील प्रयोगशील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मेळाव्याचे सूत्रसंचालन दिलीप पाटील यांनी केले.