हर हर महादेवच्या जयघोषात ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवास प्रारंभ
लातूर/प्रतिनिधी:
“हर हर महादेव ” च्या जयघोषात गवळी समाजाच्या दुग्धाभिषेकाने लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला.मध्यरात्री गवळी समाजाचा दुग्धाभिषेक आणि सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रींची महापूजा व ध्वजारोहण संपन्न झाले. लातूरसह शेजारील जिल्ह्यात सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानची महाशिवरात्री यात्रा प्रसिद्ध आहे.यात्रा महोत्सवानिमित्त यावर्षी चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी मध्यरात्री प्रथेप्रमाणे गवळी समाजाच्या वतीने श्री सिद्धेश्वरांना दुग्धाभिषेक करण्यात आला.सकाळी माळी समाजाचा पुष्पाभिषेक संपन्न झाला.

मंगळवारी ( १ मार्च )सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांच्या हस्ते सपत्नीक श्रींची महापूजा करण्यात आली.जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहणही करण्यात आले.देवस्थानच्या वतीने यावेळी जिल्हाधिकारी आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी सुनील यादव, तहसीलदार स्वप्नील पवार,विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विक्रम तात्या गोजमगुंडे,महापौर विक्रांत गोजमगुंडे,देवस्थानच्या प्रशासक श्रीमती हिराशेळके,प्रदीप भोसले,विश्वस्त मंडळाचे सचिव अशोक भोसले,श्रीनिवास लाहोटी, मन्मथ लोखंडे, विशाल झांबरे यांच्यासह विश्वस्त आणि भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मानाच्या काठ्यांचे पुजन …. महाशिवरात्री यात्रा
महोत्सवानिमित्त दरवर्षी गोजमगुंडे परिवाराच्या वतीने मानाच्या काठ्यांची मिरवणूक काढून पूजन केले जाते.यावर्षी मंदिर परिसरातच काठ्यांचे पूजन संपन्न झाले.विक्रमतात्या गोजमगुंडे व सौ.स्मिता गोजमगुंडे,विशाल गोजमगुंडे व सौ.स्वप्ना गोजमगुंडे, विक्रांत गोजमगुंडे व सौ.वर्षा गोजमगुंडे यांच्यासह परिवारातील सदस्यांच्या हस्ते काठ्यांचे विधिवत पूजन करण्यात आले.

दर्शनासाठी रांगा…
महाशिवरात्रीनिमित्त ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वराचे दर्शन घेण्यासाठी लातूर शहरासह परिसरातून आलेल्या हजारो भक्तांनी मध्यरात्रीपासूनच मंदिर परिसरात रांगा लावल्या होत्या.दोन वर्षानंतर महाशिवरात्रीच्या पर्वावर दर्शन मिळणार असल्याने मोठ्या संख्येने भक्त दर्शनासाठी आले होते. कोरोना संसर्ग लक्षात घेता मंदिर परिसरात मास्क शिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. देवस्थानच्या वतीने भक्तांना दर्शन घेताना कसलीही अडचण येऊ नये याची काळजी घेण्यात आली.




