प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांचे आवाहन
इचलकरंजी ; दि. २३ (प्रतिनिधी ) — केंद्र शासनाच्या निर्देशानुसार भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.याच अनुषंगाने इचलकरंजीमहापालिकेच्या वतीनेशहरात राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये सर्व स्वयंसेवी व सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे ,असे प्रशासक सुधाकर देशमुख यांनी आयोजित बैठकीत बोलताना केले.
यंदाच्या वर्षी भारतीय स्वातंञ्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.त्यामुळे जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक ,क्रांतिकारक , स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दि. १३ ऑगस्ट ते दि. १५ ऑगस्ट या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे
प्रत्येक राज्यात हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

याच अनुषंगाने आज शुक्रवार दि २२ जुलै रोजी महानगरपालिकेचे प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी शहरातील स्वयंसेवी संस्था व सामाजिक संस्था यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन केले होते.
हा उपक्रम संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येणार असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सदर उपक्रमामध्ये स्वयंसेवी / सामाजिक संस्थांना सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. यास अनुसरून प्रशासक तथा प्रभारी अधिकारी यांनी हर घर तिरंगा या उपक्रमासाठी सर्वांनी सहभागी होतानाचआवश्यक ध्वज पुरविणेकरीता प्रायोजक स्वरूपात आर्थिक सहाय्य करावे असे आवाहन संस्थांच्या प्रतिनिधींना केले.
सदर बैठकीस उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शहरातील विविध स्वयंसेवी संस्था व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.




