जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक
लातूर : लातूर ग्रामीण मतदारसंघातील अपूर्ण असलेली व विविध कारणांमुळे रेंगाळलेली विकासकामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना लातूर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर ग्रामीण मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, सुनील यादव, विजय ढगे, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, श्रीशैल उटगे, प्रमोद जाधव, धनंजय देशमुख, विजय देशमुख, सुभाष घोडके, तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, तहसीलदार स्वप्नील पवार आदींसह रेणापूर नगरपंचायत, जलसंपदा, कृषी, पशुसंवर्धन, बांधकाम, क्रीडा, परिवहन, जिल्हा नियोजन, वन, महावितरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आमदार श्री. धिरज देशमुख म्हणाले, रायगव्हाण मध्यम प्रकल्पावरील १७०० हेक्टॅर सिंचन क्षेत्र पुर्नस्थापित करण्यासाठी मांजरा नदीवरील लासरा बराजमधून पाणी उपसा करून प्रकल्पात सोडण्याबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुढील प्रशासकीय कार्यवाही गतीने पूर्ण करावी. जवळगा, रेणापुर येथील कोल्हापुरी पद्धतीचे बंधाऱ्याचे लातूर पद्धतीच्या बराजमध्ये रुपांतर करण्याची कामे तातडीने सुरू करावी.

पावसाळ्यामध्ये मांजरा नदीतून वाहून जाणारे पाण्याचे त्याच खो-यातील कोरड्या प्रकल्पात आणण्यासाठी वळण योजनेचे सर्व्हेक्षण करून पुढील कार्यवाही करा. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची व्यवस्था करावी. पावसाळ्यात बराजवर कुशल मनुष्यबळ नेमावे. त्याच त्या चुका पुन्हा होऊ नये, याची खबरदारी घ्यावी, असेही ते म्हणाले.
सताळा व भादा साठवण तलावाचे काम करता येत नसल्यामुळे या प्रकल्पाच्या मंजूर पाण्याचे फेर नियोजन करून नवीन प्रकल्प प्रस्तावित करावे. तावरजा मध्यम प्रकल्प विशेष दुरूस्ती निविदा प्रसिध्द करण्याची कार्यवाही गतीने करावी. मांजरा प्रकल्पाची सिंचन कार्यक्षमता वाढवण्यासाठी बंद पाईपलाईनद्वारे सिंचन करण्याचा व मांजरा नदीवरील बराजचे एकत्रीत परिचालन करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा (scada system) बसवण्याचा पथदर्शी प्रस्ताव तयार करावा, असे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन निधीमधून 2020 -21 या वर्षात मंजूर झालेली सर्व कामे तातडीने करावीत. निविदा प्रक्रिया पुर्ण होऊन सुध्दा अद्याप काम सुरू नाहीत, असे होऊ नये. मतदारसंघातील शाळा दुरुस्तीचीही कामे तातडीने हाती घ्यावीत. ग्रामीण पोलीस स्टेशन, रेणापूर क्रीडा संकुल, मुरुड बसस्थानक, रेणापूर येथील महात्मा गांधी चौकाचे सुशोभीकरण ही कामे सुरू करावीत. तांदुळजा, पानगाव, खरोळा, भादा येथील बस स्थानकासाठी प्रस्ताव पाठवावा. तसेच, मुरुड उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी व बस स्थानकासमोरील रस्त्यासाठीही प्रस्ताव तयार करून पाठवावा. स्मशानभूमीच्या देखभाल, दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत. लंपी स्किन डीसिजचा प्रादुर्भाव रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी वेळेवर लसीकरण पूर्ण करावे. वीज पडून ज्यांचे पशुधन दगावले आहे, त्यांना मोबदला देण्यात दिरंगाई होऊ नये. सध्या रब्बीचा हंगाम तोंडावर आहे, त्यामुळे डीपी, ट्रान्सफार्मर कामांना गती द्यावी. शेतकऱ्यांना अडचण येऊ नये, याकडेही आमदार श्री. धिरज देशमुख यांनी लक्ष वेधले.-
- लातूर, रेणापूरमध्येही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
- अतिवृष्टी व गोगलगाय प्रादुर्भावामुळे लातूर आणि रेणापूर तालुक्यातही सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पण, या तालुक्यात योग्य ती मदत सध्याच्या सरकारने दिली नाही. शेतकरी रोष व्यक्त करत आहेत. त्यामुळे या विषयात लक्ष घालून शेतकरी बांधवांना अधिकची मदत देण्याबाबत सहकार्य व पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार श्री. धिरज देशमुख यांनी केली.—-