दिन विशेष
सहजीवनाचे मर्म!!
व्हॅलेंटाईन डे! रोम मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस. संत व्हॅलेंटाईन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो.
रोममध्ये केलेडीएस द्वितीय राजाच्या साम्राज्यात सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यास बंदी होती. संत व्हॅलेंटाइन ने याला विरोध करून काही सैनिकांचे लग्न लावून दिले. त्यामुळे राजाने व्हॅलेंटाईन ला तुरुंगात टाकले, तर तुरुंगात असताना या व्हॅलेंटाईनचा जीव नेमका जेलरच्या मुलीवर जडला. आणि प्रेम केले याची शिक्षा म्हणून व्हॅलेंटाईन ला 14 फेब्रुवारी रोजी फाशी दिली गेली. फाशीच्या आदल्या रात्री व्हॅलेंटाईन ने आपल्या प्रियसीला पत्र लिहिले होते त्या पत्राचा शेवट ‘युवर व्हॅलेंटाइन’ असा केला होता. तेव्हापासून 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो अशी अख्यायिका आहे .
तसे प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी एक विशिष्ट दिवस असण्याचे प्रथा फार पूर्वीची आहे. वसंत ऋतूच्या सुरुवातीला हा दिवस साजरा केला जात असे .
सध्या प्रेमाच्या व्याख्या बदललेल्या आहेत . प्रेम आणि शारीर आकर्षण ह्या एकमेकात गुंतलेल्या गुंत्यामध्ये अडकून तरुणाई संभ्रमित झाली आहे . प्रेम भावना आणि कामभावना यामध्ये त्यांची गल्लत होताना दिसते .
दुसरे म्हणजे बहुराष्ट्रीय भांडवलशाहीने त्यांच्या लाभासाठी मानवी भावनांना दिलेले बाजारु रुप याकडे आजची तरुणाई आकर्षित झाली आहे, जाहिराती चित्रपट आणि मालिकांमधून नातेसंबंधाचा होणारं बीभत्स आणि वास्तव चित्रण यामुळे नातेसंबंधाकडे आणि लग्न संस्थेकडे तरुणांचा बघण्याचा दृष्टिकोनच एकंदरीत संभ्रमित झाला आहे.
या सगळ्याचा परिपाक आजची बहुतांश तरुण पिढी विचारहीन आणि भरकटलेल्या मनोवस्थेत आहे. स्त्री-पुरुष नातेसंबंध- लग्न- सहजीवन या गोष्टींची नव्याने ओळख करून देण्याची गरज निर्माण झाली आहे .
प्रेम म्हणजे एकमेकांचा विनाअट स्विकार, प्रेम म्हणजे एकमेकांचा आदर, प्रेम म्हणजे एकमेकांच्या भावनांची जपणूक, प्रेम म्हणजे सहजीवन… समताधिष्ठित सहजीवन ज्यात कोणी लहान नाही कोणी मोठा नाही. श्रेष्ठ-कनिष्ठ हा भेदभाव नाही. हे प्रामुख्याने समजावून सांगितले पाहिजे.
आणि हे सांगताना आजच्या तरुण पिढीला जवळपास दोनशे वर्षापूर्वीच्या एका आगळ्यावेगळ्या प्रेमाची… सहजीवनाची कहाणी सांगावीशी वाटते . कारण ती आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे असे मला वाटते. लैला-मजनू, शिरी- फरहाद यासारख्या मिथकां पेक्षा खरी आणि शाश्वत अशी प्रेम कहाणी आहे… कारण त्यात आयुष्यभर निभावलेलं प्रेम आहे , खरी समता आहे, एक आदर्श सहजीवन आहे. आणि ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं प्रेम – सहजीवन!

त्या दोघांचं लग्न त्यांच्या वयाच्या अनुक्रमे तेराव्या व नवव्या वर्षी झालं कारण तो काळ 1840 चा होता, त्याकाळी बालविवाहाची पद्धत सर्रास रुढ होती.
त्या दोघांचं सहजीवन जवळजवळ पन्नास वर्षांचं म्हणजे अर्धशतकाचं! आजच्या तरुण मुलांसाठी अशक्य कोटीतली गोष्ट.आता या तरुणांना प्रश्न पडेल की यात प्रेमाचा संबंध काय ?
त्या काळातील सामाजिक धार्मिक परिस्थिती इतकी कर्मठ आणि सनातनी होती की, चार चौघात बायकोने नवऱ्याला बोलणे देखील शक्य नव्हते . अशा सनातनी काळात ज्योतीबांनी सावित्रीबाईंची शिक्षण घेण्या विषयीची तळमळ- ओढ पाहून तिला शिक्षण दिले प्रशिक्षित शिक्षिका बनवले . हा होता एका पतीने आपल्या पत्नीच्या भावनेचा केलेला आदर !
त्याकाळात बायकोने नवऱ्याच्या पाया पडणे ही साधी गोष्ट होती कारण पतीला परमेश्वर मानण्याचा तो काळ ! पण जेव्हा जेव्हा सावित्रीबाई ज्योतीबांच्या पाया पडण्यासाठी वाकत असत तेव्हा तेव्हा त्यांना अडवून ज्योतिबा म्हणत असत की “हे बघ सावित्री ! तू जर माझ्या पाया पडणार असशील तर नवरा-बायकोच्या समतेच्या न्यायाने मीही तुझ्या पाया पडेन !” ही होती दोघांमधली समता ! पत्नीला खरा बरोबरीचा दर्जा देणे !
लग्नानंतर काही वर्षे उलटून गेली तरी सावित्रीबाईंना मूल होत नव्हते तेव्हा त्या दोघांच्याही घरची मंडळी ज्योतिबांना दुसरे लग्न करण्यासाठी आग्रह करत होती. कारण हिंदू धर्माच्या रूढीनुसार वंशवृद्धी आणि वारसा या गोष्टींना किती महत्त्व आहे हे आपण जाणतोच . आजच्या आधुनिक म्हणवून घेणाऱ्या काळातदेखील मुल नसणाऱ्या स्त्रीची ‘वांझ’ म्हणून अवहेलना केली जाते. आणि त्या पुरुषाचं दुसरे लग्न लावून दिलं जातं . मग त्या काळात तर केवढा दबाव त्या दोघांवर असेल याची कल्पना करून बघा ! परंतु ज्योतिबा या दबावाला बळी पडले नाहीत… ” सावित्रीही दुसरं लग्न लावून देणार असाल तरच मी दुसरे लग्न करीन ” असं ते ठामपणे म्हणाले होते. या सर्वांचा कुटुंब पद्धतीच्या संदर्भात आणि सामाजिक परंपरांच्या संदर्भात केवढा मोठा परिणाम झाला असेल.
आजची तरुण सुशिक्षित मुलं हा विचार तरी करु शकतात का? हा मला प्रश्न पडतो . साधी हुंड्या सारखी प्रथाही ही तरुण मुलं झुगारून देऊ शकत नाहीत( आम्ही आईवडिलांच्या आज्ञे बाहेर जाऊ शकत नाही) अशी दुबळी लंगडी सबब सांगतात .
आजच्या तरुणांचं स्वतःच्या विचारांवर ठाम नसणं किंवा स्वतःचा कुठलाच विवेकी विचार नसणं या आणि आजच्या कशावरून नाही भावना दुखावण्याच्या याकाळात प्रेम या संकल्पनेला आलेलं बाजारू स्वरूप , प्रेम म्हणजे ताबा , हक्क , स्वामित्व असं समजणार्या तरुणांना या व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने प्रेम , नातेसंबंध , सहजीवन – समताधिष्ठित सहजीवन या प्रारूपाची नव्याने ओळख करून देणे गरजेचं वाटतं.

अरुणा दिवेगावकर.
लातूर.
7666509174.