अस्मानी भरारी घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते- कु. सृष्टी जगताप
लातूर;दि.30-प्रबळ इच्छाशक्ती, अदम्य आत्मविश्वास व कठोर परिश्रमाची तयारी असेल तर अस्मानी भरारी घेण्यासाठी वयाची मर्यादा आड येत नाही असे प्रतिपादन सृष्टी जगताप हिने केले. ती दयानंद कला महाविद्यालयाच्या संगीत विभागात इयत्ता अकरावी विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होती.

पुढे ती म्हणाली की, “कोरोना सारख्या महामारीच्या काळात टाळेबंदी लागली होती तेव्हा अनेकांच्या जीवनात निराशा आली होती परंतु मी त्या आपत्तीचे परिवर्तन इष्ट आपत्तीत केले व मी इयत्ता नववीत असताना २४ तास सतत लावणी नृत्य सादर करून एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपल्या महाराष्ट्राच्या लावणीला नेऊन पोचविले. त्यानंतर इयत्ता दहावीत मी ९९.२७ % गुण प्राप्त करून पुन्हा अकरावीसाठी दयानंद विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. माझ्या आयुष्यात दयानंद शिक्षण संस्थेने अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. विज्ञान शाखेचा अभ्यास सांभाळत मी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी तयारी सुरू केली. आणि सर्वात कमी वयामध्ये अशाप्रकारे सलग १२७ तास नृत्य करून एक नवा उच्चांक मी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने मार्गक्रमण करावे म्हणजे निश्चितच आपल्याला यश प्राप्त होते.”
विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व घडावे, व्यवहार चातुर्य, नेतृत्व गुण विकसित व्हावे यासाठी संगीत विभागात मागील २४ वर्षांपासून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांकडून अकरावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात येते.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड हे उपस्थित होते तर उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, संगीत विभाग प्रमुख डॉ. देवेंद्र कुलकर्णी, डॉ संदिपान जगदाळे, विनोदवीर बालाजी सुळ, सूरज साबळे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ईश्वरी जोशी,ब्रह्मकुमारी भोसले, प्रणिता जाधव, नंदिनी नाडे यांनी सादर केलेल्या सरस्वती वंदनेने झाली. डॉ संदीपान जगदाळे यांनी संगीत विभागात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या प्रसंगी उपप्राचार्य अनिलकुमार माळी म्हणाले की, “संगीत विभागातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिक्षणाबरोबरच माणूस घडवण्याचे कार्य संगीत विभाग करीत आहे.” पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड म्हणाले की, “संगीत विभागातून आजपर्यंत २१ दूरदर्शन व चित्रपट कलावंत घडले आहेत तर २३ वर्ग एक व वर्ग दोन प्रशासकीय अधिकारी घडले आहेत. संगीत कलेबरोबरच अभिनय, चित्रकला, साहित्य, क्रीडा व राष्ट्रीय सेवा योजना आदी उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत संगीत विभागाने मोलाचे योगदान दिले आहे.”
कार्यक्रमात राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत चित्रकला या कलाप्रकारात देशात सर्वप्रथम आलेला आदित्य कुलकर्णी, नवोदित साहित्यिक कु. सई शिंदे व अकरावीत शिकणाऱ्या कु. साक्षी नांनजकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता शिंदे व कुमकुम पाटील यांनी केले. प्रास्ताविक यशवंत कातळे याने केले. पाहुण्यांचा परिचय अपूर्वा मस्के हिने करून दिला तर आभार प्रदर्शन अमित जोशी याने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनंत खलुळे, ज्ञानेश्वर जाधवर, अनमोल कांबळे, यश कसबे, रागिनी मस्के, गायत्री परिहार, वैष्णवी वाघमारे, संजीवनी कांबळे, संघर्ष आचार्य, वसुधा उत्केकर यांनी परिश्रम घेतले.