रेणापूरचा पाणी प्रश्न आता कायमस्वरूपी मिटणार
तब्बल 8 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता; आमदार धिरज देशमुख यांच्या मागणीची सरकारकडून दखल–
-लातूर :
रेणापूर नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता केव्हा मिळणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. या प्रकल्पासाठी ‘लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर महाविकास आघाडी सरकारने 8 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे रेणापूर आणि नगरपंचायतीच्या हद्दीतील 6 तांड्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच कायमस्वरूपी मिटणार आहे.
‘रेणापूरमधील माता-भगिनींच्या आणि बांधवांच्या डोक्यावरचा हंडा आम्ही उतरवू’, असा शब्द आमदार श्री. धिरज देशमुख यांनी दिला होता. त्यानुसार रेणापूर शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास मान्यता मिळवून आणण्यासाठी आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री श्री. अजित पवार, नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन प्रकल्पाला मान्यता देण्याची मागणीही केली.
अखेर आमदार श्री. धिरज देशमुख यांच्या प्रयत्नांना यश आले असून राज्य सरकारने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोत्थान महाभियान या अंतर्गत रेणापूर नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यानुसार 8 कोटी रुपयांची कामे होणार आहेत. या कामांमुळे रेणापूर आणि नगरपंचायतीच्या हद्दीतील 6 तांड्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
पाणी पुरवठा प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अमित देशमुख यांचे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी आभार मानले.—