27.8 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeसाहित्यलोकप्रभाचा अस्त!

लोकप्रभाचा अस्त!

लेखन:जयश्री देसाई

आज सकाळी सकाळी अचानक, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय लोकप्रभा बंद करण्यात आल्याची बातमी समजली आणि आपला कोणी तरी जिवलग हरपल्यासारखे झाले.

पत्रकारितेच्या माझ्या कारकिर्दीत लोकप्रभा चे योगदान खूप मोठे आहे. 1998 साली मी लोकप्रभा सोडलं . पण आजही ‘जयश्री देसाई म्हणजे त्या लोकप्रभात लिहीत होत्या त्या का?’ असे जेव्हा लोक विचारतात किंवा तुमचे लेख आम्ही आजही जपून ठेवले असल्याचे लोक जेव्हा सांगतात किंवा लोकप्रभाचे सर्वच्या सर्व अंक जपून ठेवलेले वाचक जेव्हा भेटतात तेव्हा काय वाटतं याचं वर्णन शब्दात करणे कठीण आहे. लोकप्रभाची ती ताकद होती. ती आता संपली.

हे होणार याचे नगारे 2015 पासून वाजत होते. अनेक गोष्टी कानावर येत होत्या. पण तरीही हा एवढा यशस्वी ब्रँड खरोखर बंद केला जाईल यावर विश्वास बसत नव्हता. पण आजच्या डिजिटल युगात साप्ताहिकं किंवा मासिकं यांचं अर्थकारण सांभाळणं ही खरोखर अत्यंत कठीण गोष्ट आहे. त्याचेच पर्यवसान आज आणखी एक अत्यंत लोकप्रिय साप्ताहिक बंद होण्यात झाले.

माझ्यापुरतं बोलायचं तर मला लोकप्रभाने खूप काही दिलं. एक स्वतंत्र ओळख दिली, अनेक स्फोटक विषयांवर मुखपृष्ठकथा करण्याची संधी दिली . माणसांच्या अनेक चेहऱ्यांचा जवळून परिचय घडवला. पत्रकाराला येणाऱ्या धमक्या म्हणजे काय असतात याचा आणि दंगलींच्या वार्तांकनाचा दाहक अनुभव दिला, आरडीएक्सचा बॉम्बस्फोट म्हणजे काय भयाण प्रकार असतो त्याचा अनुभव दिला, या क्षमतेचे बॉम्बस्फोट झाल्यानंतर रस्त्यावर पडलेला रक्ताचा सडा आणि मृत्यूचा नंगा नाच बघण्याइतका बेडरपणा दिला, हर्षद मेहता स्कॅमसकट अनेक गाजलेली प्रकरणं कव्हर करण्याची सुसंधी दिली आणि त्याच बरोबर श्री प्रदीप वर्मा, मराठीतील आद्य पहिला पत्रकारांपैकी एक असलेल्या पुष्पा त्रिलोकेकर, संजीवनी खेर, सतीश नाईक, संजय राऊत, अभिजीत देसाई, प्रतिमा जोशी, महेश म्हात्रे , भरत वद्देवार , लता राजे , उज्वला पाटील धर, मीनल मोहाडीकर, शिरीष कणेकर असे अत्यंत मोलाचे सहकारी, स्नेही दिले. मानसी इंगळे, शुभदा चौकर आणि लोकसत्तातले अनेक जण हे तर आधीपासूनच माझ्या मैत्रीच्या परिघात होते. श्री. माधव गडकरी व डॉक्टर अरुण टिकेकर यांच्या सोबत काम करण्याचा अल्पसा का होईना पण अनुभव मिळाला. आमच्या दैनंदित कामात त्यांचा हस्तक्षेप नव्हता. मात्र क्वचित कधी त्यांचे मार्गदर्शन मिळत असे.

अर्थात तिथे फक्त कामच होत होते असे नाही. संजय राऊत, अभिजित देसाई, मी व राजश्री ( मानसी इंगळे) अशा चौघांनी मिळून केलेली धमाल आठवते आहे. अभिजीत देसाई हा माझा नवरा असल्याचे समजून लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आठवून हसायला येते आहे. गंमत म्हणजे अभिजीत दुर्दैवाने अकाली गेल्यावर काही वाचकांनी मला शोकसंदेश सुद्धा पाठवले होते…. तसेच तेव्हा फार मोठ्या संख्येने येणारी वाचकांची प्रशस्तिपत्रे आजही प्रेरणा देत आहेत.

आज या सगळ्या कडू-गोड आठवणी मनात पिंगा घालत आहेत. आज अभिजीत हयात नाही . संजय राऊत आणि सतीश नाईक यांनी वेगळा मार्ग निवडला आहे. मात्र आम्हा सगळ्यांना जोडणारा लोकप्रभा हा दुवा कायम होता.

तो आज तुटला .

तिथल्या प्रेस मधले, प्रूफ रीडिंग करणारे, जाहिरात आणि मार्केटिंग विभागातले अनेक सहकारी आजही संपर्कात आहेत. त्यांनाही माझ्याशी जोडणारा दुवा लोकप्रभा हाच होता. त्याच्याशी संपर्क पुढेही कायम राहील मात्र हा दुवा हरपल्याची खंत सुद्धा कायम राहील.

मी मुंबई तरुण भारत या दैनिकातून आले होते त्यामुळे साप्ताहिकाची मुखपृष्ठकथा कशी ठरवायची, पुढच्या आठवड्यात कोणता विषय हिट होईल या दृष्टीने मुखपृष्ठ कथेचं नियोजन मला येत नव्हतं. मात्र संपादक प्रदीप वर्मा त्यात इतके निष्णात होते की या आठवड्यात जी बातमी चर्चेत सुद्धा नसायची त्या बातमीवर केलेली मुखपृष्ठकथा पुढच्या आठवड्यात प्रचंड गाजायची. हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं आणि त्याचा उपयोग मला पुढे मैत्रीण आणि भटकंतीचे संपादन करताना निश्चितच झाला

संजीवनी खेर यांच्याबरोबरच्या साहित्यिक आणि विशेषतः विदेशी राजकारणावरच्या गप्पा समृद्ध करून जायच्या. तेच लता राजे यांच्याबाबतही होतं . माझं क्षितीज विस्तारल्याची सुखद जाणीव आणि त्या विस्तारलेल्या परिघात लक्षणीय रंग भरण्याची प्रेरणा हे दोन्ही त्यातून मिळत होतं

काही नाती तर शब्दांच्या पलीकडची असतात. ती नाती का जुळतात याला काही कारण मीमांसा नसते. लोकप्रभामुळेच ज्या माझ्या आयुष्यात आल्या त्या वसुंधरा पेंडसे नाईक यांच्याशी जुळलेलं माझं नातं असंच होतं. खरंतर मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी कधी मिळाली नाही. पण लोकप्रभा हाच समान धागा असावा बहुतेक की ज्यामुळे त्या आणि मी जवळ आलो. त्यांचं प्रचंड , अकृत्रिम प्रेम मला लाभलं. दूरदर्शनवरची माझी पहिली मुलाखत त्यांनी घेतली . ती त्यांनीच आयोजित केली होती आणि त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या नियमित संपर्क ठेवून होत्या. त्यांना कॅन्सर झाला होता. त्या दादरला राहायला आल्या होत्या. ग्राहक संघाचं काम करत होत्या. माझं वा आमच्या मैत्रेय प्रकाशनाचं कोणतंही पुस्तक त्यांच्याकडे गेलं की ते वाचून त्यांचा फोन आला नाही असं कधी झालं नाही. इतक्या वेळा त्यांनी भेटायला बोलावलं. मला ते जमलं नाही. ती खंत आजही माझ्या मनात आहे.

लोकप्रभा बंद झाल्याच्या बातमीनं आपला जिवलग हरपल्याची जी जाणीव मला होते आहे त्यामध्ये अभिजीतच्या अकाली जाण्याचं, वसुंधरा ताईंना शेवटच्या क्षणी न भेटल्याचं दुःख सुद्धा सामील आहे.
पण जीवन म्हणजे शेवटी अशी सुखदुःखाची शिदोरीच तर असते. ती आपल्याला समृद्ध करते हे निश्चित. लोकप्रभाने मला समृद्ध केलं. …. तो प्रत्यक्षात राहिला नाही तरी माझ्या मनात कायम राहील!

जयश्री देसाई

ठाणे (साभार :फेसबुक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]