पुणे, दिः १८ एप्रिल:
सुप्रसिध्द नाक, कान व घसा तज्ञ आणि माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त व माजी अध्यक्ष डॉ. सुरेश गोविंद घैसास यांचे अल्पशा आजाराने निधन आज निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले व नातवंडे असा परिवार आहे.
डॉ. सुरेश घैसास यांचे शालेय शिक्षण पुण्यातील नुतन मराठी विद्यालयात झाले असून एम.बी.बी.एस. ही पदवी बी.जे.मेडिकल कॉलेज, पुणे येथून मिळवली. त्यानंतर त्यांनी कान, नाक, घसा यामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. कानाच्या शस्त्रक्रियेवरील अभ्यासाकरता जर्मनी येथील टुबिरगन विद्यापीठामध्ये शिक्षण घेतले. नंतर त्यांनी पुण्यात कान, नाक, घसा तज्ञ म्हणून डेक्कन जिमखाना येथे त्यांचे क्लिनिक सुरु केले. त्यांच्या प्रेमळ स्वभाव आणि कान, नाक व घसा यातील कौशल्यामुळे अल्पावधीत त्यांची पुण्यातील एक नामवंत शल्यचिकित्सक म्हणून ओळख झाली.

बहिरेपणाच्या शस्त्रक्रियेवरील अनेक शोध निबंध त्यांनी लिहिलेे. पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये कान, नाक व घसा या विभागाचे प्रमुख म्हणून २५ वर्षे अविरत सेवा केली. तसेच धोंडुमामा साठे वैद्यकीय महाविद्यालयात कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख प्रोफेसर म्हणून ३० वर्षे काम केले. पुणे तसेच महाराष्ट्र कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टरांच्या असोसिएशनचे अध्यक्ष होते.
१९९० साली माईर्स एम.आय.टी.चे लातूर येथील एम.आय.एम.एस.आर. वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेत त्यांचा प्रमुख सहभाग होता. तळेगाव येथील मायमर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वैद्यकीय अधिकारी (मेडिकल ऑफीसर) म्हणून ३० वर्ष अविरत सेवा देऊन महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान दिले.
माईर्स एमआयटी या जगविख्यात शिक्षण संस्थेचे संस्थापक विश्वस्त होते. काही काळ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. माईर्स एमआयटी संस्थेला स्वतःची १६ एकर जमीन कोणताही मोबदला न घेता प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्याकडे सुपूर्त केली. आज त्यांच्या या योगदानामुळे व सक्रीय सहभागामुळे माईर्स एमआयटी ही शिक्षण संस्था नावलौकीकास आली आहे.
डॉ. सुरेश घैसास हे अतिशय निर्मळ मनाचे आणि प्रेमळ स्वभावाचे होते. वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून हजारो रुग्णांना ते विनामूल्य सेवा देत होते. अनेक गरजुंचे व गोरगरीबांचे आयुष्य त्यांच्यामुळे बदलले गेले आहे.
“चेहर्यावर सदैव हास्य ठेवून ते निरपेक्ष, निरलस व निर्मळ भावनेने आपले आयुष्य जगले. त्यांच्या अचानक जाण्याने संस्थेची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! अशी भावना माईर्स एमआयटीचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केली.”