मुंबई: ( विशेष प्रतिनिधी) – राज्यसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर विधानपरिषदेची निवडणुकीही अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. अशातच प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नव्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विधानपरिषदेत आपापल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून संपूर्ण ताकद पणाला लावली जात आहे. त्यासाठी अगदी शिवसेनेच्या गोटातील अपक्ष आमदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून सुरु आहेत. त्यामुळे शिवसेना नाराज असल्याची चर्चा असतानाच बच्चू कडू यांनी अपक्ष आमदारांशी इतर राजकीय पक्षांनी संपर्क साधण्यात काहीही गैर नसल्याचे म्हटले आहे.
निवडणुकीच्या काळात आमदारांची फोडाफोडी ही होतच असते. किंबहुना फोडाफोडीशिवाय राजकारण होऊच शकत नाही. त्यामध्ये नवीन काय आहे, असा सवाल कडू त्यांनी विचारला.

विहीर म्हटलं की त्यामध्ये पाणीच असणार. विहीरीला पेट्रोल किंवा घासलेट लागलं तर तो आश्चर्याचा विषय ठरू शकतो. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात फोडाफोडी ही क्रमप्राप्त आहे. आमचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असता तर आम्हीही मतांसाठी फोडाफोडी केली असती. कोणताही आमदार त्याला विधानपरिषदेच्या मतांसाठी कोणत्या राजकीय पक्षाचे फोन आले, हे सांगणार नाही. आम्हाला इतर राजकीय पक्षांचा फोन आला म्हणजे आम्ही त्यांना मतदान करूच असेही नाही, असेही कडू यांनी म्हटले आहे.
विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून यासाठी शिवसेनेच्या गोटातील आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत परस्परांचे आमदार फोडले जाण्याचा खेळ रंगू शकतो. तसे घडल्यास महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या गोष्टीचे समर्थन केले आहे. निवडणुकीत सगळ्या पक्षांच्या आमदारांशी संपर्क साधला जातोच. त्यामध्ये काहीही चूक नाही, अशी भूमिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली.



 


