लेखमाला भाग -४
लेखमाला
भेटी लागे जीवा
लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील सुपुत्र व सध्या माहिती संचालक गणेश रामदासीयांनी प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी होऊन शेअर केलेल्या मागील तीन वारींमधील अनुभवावर आधारित लेखमाला माध्यम
वाचकासाठी प्रसिद्ध करीत आहोत ( या सारख्या या आधीच्या विविधांगी लेखांचा आस्वाद घेण्यासाठी लेखकाचे ‘राग दरबारी’फेसबुक पेज https://www.facebook.com/ramdasiganesh/ या लिंकचा उपयोग करावा तसेच त्यांनी घेतलेल्या दिल्लीतील विविध विषयांवरील मुलाखतींचा आस्वाद घेण्यासाठी त्यांचे युट्यूब चॅनल ‘ दिल्ली निवासी गणेश रामदासी’ याच्या https://youtube.com/channel/UCzXEBaxXKN-05jO-5TaWQOA या लिंकचा उपयोग करावा) -संपादक

विठुमाऊलीचे दर्शन घेऊन आमच्या वारीतील जो तो आपापल्या घरी विश्रांतीसाठी पोहोचला असला तरीही प्रत्येकजण मनाने अजूनही वारीतील आठवणींमध्ये,माऊलींच्या पालखीसोबत आणि पांडुरंगाच्या चरणस्पर्शातच गुंतून आहे.प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये कैद झालेली क्षणचित्रे व चित्रफिती एकमेकांना शेयर करत आठवणींमध्ये गुंग आहेत. अनेकजण ते जेव्हा आपापल्या घरी पोहोचले तेव्हा त्यांचे केले गेलेल्या स्वागताच्या कथा सांगत आहेत.वारकरी पंथात एकमेकांना माऊली स्वरूप मानून एकमेकांच्या पायाला वाकून स्पर्श करण्याची परंपरा आहे.राऊळात हरिपाठ सुरू करताना आणि पसायदानाच्या वेळेस तर तसे केलेच जाते. त्याचप्रमाणे वारीहून वारकरी परतले तेव्हा त्यालाच विठ्ठल स्वरूप मानून गावकरी-नातेवाईक पायावर डोके ठेवण्यास जमतात. भाव-भक्तीवर आधारित हा पंथ असल्याने ज्याचा-त्याचा विठ्ठल जो तो मानत असतो व त्यास विठ्ठलही कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन देतोच देतो.
मागे एका लेखात दत्तगुरूंनी माझ्याकडून दिवेघाट कसा चढून घेतला याचे वर्णन केले होते,तसा आणखी एक दर्शनानुभव विठ्ठलाने माझी पहिली वारी पूर्ण होण्याआधीच मला कसा दिला होता याची आठवण या निमित्ताने नोंदवणे गरजेचे वाटते.श्रद्धा मनाला किती बळकट बनवते याचे हे उत्तम उदाहरण आहे.
पहिल्या वारीत उजवा पाय अगडबंब सुजला असतानाही दिवेघाट चढण्याचे दिव्य पार केल्यानंतर पुढे जेजुरी,वाल्हे,लोणंद,पर्यंत आधीइतका पायाने त्रास दिला नाही.पण फलटण गाठण्यापूर्वी पुन्हा उजवा पाय पुढे टाकणेच मला कठीण होऊन बसलेले. सर्व टीम पुढे-पुढे जात असे आणि मी आपला रखडत-रखडत हातात काठीचा आधार घेत पुढे सरकत असे.करता- करता फलटण ब-यापैकी मागे टाकत सर्वजण माळशिरसला ठरलेल्या ठिकाणी विश्रामास पोचलेले आणि मी मात्र 15-16 किलोमीटर मागे पडलेला.माझ्यासोबत केवळ माझा सारथी वाहन पुढे-मागे करत पण मला नजरेच्या टप्प्यात ठेवत येत होता.माझ्या पायात सूज वाढल्याने बूट काढून स्लीपर घासत चालणे सुरूच ठेवले पण आणखी 70-80 किलोमीटर अंतर कापले जाईल तरी कसे? ही विवंचना दुपारपासूनच मनात घोळत होती.हळूहळू तिन्हीसांजा होऊ घातल्या,वाहनचालक म्हणालाही की "खूपच असह्य होईल तेव्हा सांगा नाहीतर मी गाडीचे हेडलाईट्स चालू ठेवत मागे-मागे येतो पण आजचा टप्पा पूर्ण करेपर्यंत मी तुमच्यासोबतच आहे,हिम्मत हारू नका!"
त्याच्या हिम्मत देण्यानेही मी बरेचसे अंतर कापले पण आता पायाची शीर जांघेपर्यंत ठणकत होती.ह्युमिडिटी खूप असल्याने अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या.नुकतेच वाहनचालकाने पाणी-ताक-लिंबुपाणी विचारलेले व दिलेले होते त्यामुळे मी जोवर मागे वळून पाहत नाही तोवर तो मागे अंतर ठेवून राहणार होता.एक क्षण असा आला की,आता काही आपल्याला चालवणार नाही आणि वारी काही पूर्ण होणार नाही असे वाटून रडू फुटायची वेळ आली.एवढ्यात डोक्याला मुंडासे बांधलेले,हातात काठी घेतलेले एक म्हातारे गृहस्थ रस्त्याच्या पलीकडून माझ्याकडे तरातरा आले आणि माझ्यासमोर उभे राहिले.रस्त्यावर रहदारी तशी नव्हतीच,दूरवर पलिकडे तेवढे एक खोपटे होते.माझे सारे लक्ष रस्ता पार करणा-या त्यांच्या पायाकडे होते.त्या आजोबांनी माझा हात धरला आणि माझी दृष्ट काढत म्हणाले," खूप कष्टाने आळंदीहून इथवर आलास लेकरा,आता मला काही पंढरपूरपर्यंत चालायला व्हायचे नाही पण आता तुझ्या पायानेच चालतो आणि पांडुरंगाचे दर्शन घेतो,माझ्यासाठी तुला पंढरपूरपर्यंत जायचेच आहे!" असे म्हणून माझ्या दोन्ही पिंढ-यांना स्पर्श केला.

मी लगेचच वाकून “अहो आजोबा असे काय करताय,मीच आपले दर्शन घ्यायला हवे” असे म्हणत पाया पडलो.उठून त्यांचा चेहरा पाहिला आणि अक्षरशः ट्रान्समध्येच पोहोचलो.तो पर्यंत त्या म्हातारबाबाने पुन्हा रस्ता पार केला आणि ते झोपडीपल्याड दिसेनासे झाले.
त्या आजोबांचा मला जसा स्पर्श झाला तशा माझ्या पायांच्या वेदना कमी झाल्या असे जाणवले.काहीतरी वेगळीच जाणीव होऊ लागली.मी पुन्हा-पुन्हा इकडे तिकडे पाहतोय,मागे वळून पाहतोय तेव्हा मला कशाची तरी गरज आहे असे वाटून वाहनचालक गाडी घेऊन जवळ आला.त्याला म्हटले," अरे आत्ता एक म्हातारबाबा पलिकडून येऊन मला भेटले-बोलले आणि पुन्हा रस्ता ओलांडून गेले,ते तुला दिसले का कुठे?" तेव्हा तो म्हणाला,"अहो कोण म्हातारबाबा? ना कोणी तिकडून आले,ना गेले...मी तुमच्या मागेच आहे की ,जरी अंतरावर असलो तरी दिसत होते की मला.तुम्ही थांबलाय आणि वळून मागे सारखे पाहताय म्हणून मी आलो पुन्हा तुमच्याजवळ" मग मी त्याला काही न बोलता पुन्हा चालायला सुरूवात केली.चालताना सारखा त्या आजोबांचा चेहरा आठवू पाहतोय पण एक कृष्णवर्णाचा जरासा देवीचे वण असणारा अंधुकसा चेहरा नजरेसमोर येत गेला आणि वाटले,ती साक्षात विठूमाऊलीच आली होती.अंगावर रोमांच फुलले,चित्तवृत्ती दाटून आल्या,संपूर्ण शरीर घामाने ओलेचिंब झाले आणि शरीर मोरपिसासम हलके होत गेले.त्या नादात मी 10-12 किमी अंतर भराभर पार कधी व कसे केले तेच समजले नाही.हाॅटेलवर सारेजण हा आज रात्र होईपर्यंत काही येणार नाही म्हणून खुर्च्या टाकून बाहेर निवांत बसलेले आणि मी पोहोचलो सुद्धा.मी जेव्हा माझा हा अनुभव सांगितला तेव्हा अशीम पाटलांनी "माऊली अहो तुम्हाला साक्षात पांडुरंगाने दर्शन दिले की हो! म्हणून माझ्या पायालाच मिठी मारली" माझ्यासह अशीम,वैभव,लड्डाजी अशा सर्वांच्याच डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.
त्यानंतर दुसरे दिवशी पहाटेपासून पंढरपूरात पोहोचेपर्यंत दोन-तीन दिवस मी सर्वांच्या बरोबरीने अंतर पार केले. आमच्यापैकी बहुतेकांच्या अर्धांगिनी दिल्लीहून आधीच वाखरीपर्यंत येऊन पोहोचलेल्या होत्या.त्याही आमच्यासोबत चंद्रभागेपर्यंत व नामदेव पायरीपर्यंत चालत आल्या.दुसरे दिवशी पहाटे जेव्हा अभिषेकानंतर विठूमाऊलीस पुजा-यांनी जे सोवळे नेसवताना पाहिले,त्याचा रंग आणि वाटेत आजोबा डोक्यावर जे मुंडासं घालून आले होते त्याचा रंग एकसारखा पाहून मी टाहोच फोडला.विठ्ठलाचा संपूर्ण शृंगार पाहताना मला मात्र त्या आजोबांचे माझे दृष्ट काढणेच आठवत गेले.माझे माता-पिता देवाघरी गेल्यावर दुःखाने जेवढा रडलो नाही त्यापेक्षा ज्यास्त अश्रुधारा माझ्यावरील विठ्ठलाच्या कृपेने त्यावेळेस डोळ्यातून वाहिल्या.वडिलांना संधिवात होता,त्यांनी आजारी असताना एकदा म्हटले होते,"गणेश मला एकदा तरी वारी करायची होती पण संधिवात माझ्या आडवा आला.तुला एकदा करता आली तर बघ पण एकादशी मात्र नक्की करत जा बरं का!" वारी पूर्ण केल्यानंतर मला ते उद््गार पुन्हा आठवले.आईतर पंधरवाडी एकादशी ती पण निर्जला करीत असे.मनोमन दोघांनाही नमस्कार केला आणि राऊळ सोडले.
पांडुरंगाचे दर्शनानंतर रुक्मिणीमातेचे दर्शन घेऊन त्यासमोरील प्रांगणात फुगडी घालण्याची परंपरा आहे.त्यावेळेस सौ.गायत्री सोबत कितीतरी वेळ घातलेली फुगडी व घेतलेले फेरे पाहून मी असे काही करू शकतो असे वारीच्या सुरूवातीची माझ्या पायाची स्थिती पाहणा-या कुणालाही वाटलेले नव्हते.
आपली वारी विठ्ठलाने,गुरू महाराजांनी करून घेतली,माता-पित्यांची इच्छा पूर्ण करता आली याचा अत्यानंद कल्पनातीत होता.आजही तिस-यांदा तो आनंद होतोच आहे पण ती पहिल्यावेळेसची अनुभूती स्मृतीकप्प्यात फिट बसलेली आहे.फक्त दुःख याचेच होतेय की,त्या संपूर्ण वारीतील माझ्या आयफोनमध्ये असलेले प्रत्येक क्षणांचे कितीतरी फोटो अचानक गायब झाले आणि ते आजतागायत गायबच आहेत.

पण माझ्यासाठी आलेला विठ्ठल तर माझ्याजवळ आहेच की!
म्हणूनच बदल करून गुणगुणावेसे वाटते-
विठ्ठलं तो आला आला मला भेटण्याला
सत्य वाचा माझी होती,
वाचली ना गाथा पोथी
देई पाणी वाटसरूंना,
आगळीच ती मनुष्यभक्ती
शिकवण माता-पित्यांची ती,
बंधुभाव राखी सर्वांभूती
विसरून धर्म-जाती घास,
देई त्या भुकेल्या
विठ्ठलं तो आला आला मला भेटण्याला.

लेखन :गणेश रामदासी
माहिती संचालक