अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना दिली बारावीची परीक्षा आणि मिळवले ८९.६७ टक्के गुण…
अन्वी पंपटवारच्या यशाचे सर्वत्र कौतुक
लातूर:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत लातूरच्या सुभाष चौक परिसरात राहणारी अन्वी साईनाथ पंपटवार हिने मिळवलेले यश सध्या लातूरकरांचे लक्ष वेधून घेत आहे.
प्रचंड जिद्द, मेहनत आणि ध्येयाने प्रेरित होऊन कसल्याही संकटावर मात करता येते हे अन्वीने आपल्या इच्छाशक्तीने दाखवून दिले आहे. बारावीची परीक्षा सुरू असताना अन्वीवर लोकमान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत होते. अशावेळी तिने डॉक्टर आणि पालकांना भांडून मी परीक्षा देणारच असा हट्ट केला. एवढेच नाही तर परीक्षेत लिहिता यावे म्हणून तिने उजव्या हाताला सलाईन लावू दिले नाही. तिची ही जिद्द पाहून डॉक्टरांनी तिला परीक्षा देण्यास परवानगी दिली. तिचे वडील साईनाथ पंपटवार हे तिला परीक्षेला घेऊन जात आणि परत रुग्णालयात उपचारासाठी घेऊन येत होते.

अशा कठीण परिस्थितीत परीक्षा देऊन तिने तब्बल ८९.६७ टक्के गुण घेत सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. तीचे १०वी पर्यंतचे शिक्षण लातूरच्या गुजराती विद्यालयात झालेले आहे. १० वीत तिला ९८ टक्के गुण होते. ११ वी आणि १२ वी साठी राजर्षी शाहू वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. वडील साईनाथ पंपटवार हे छोटे व्यापारी आहेत तर आई अंजली या गृहिणी आहेत. तिचा भाऊ सुध्दा मेकॅनिकल इंजिनिअर झालेला आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अन्वीने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.