इचलकरंजी ; दि.१६ ( प्रतिनिधी ) –
इचलकरंजी शहरातीलयेथील आबासाहेब पाटील रेंदाळ बँकेत संगनमताने सुमारे 1 कोटी 60 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अटक केलेल्या प्रभाकर भोरे, संजय गुरव, शुभम कांबळे, अतुल कांबळे या चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
इचलकरंजी शहरातील अडत पेठ परिसरात असलेल्या आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँकेच्या शाखेतील अपहाराबाबत तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे बँकेने याबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. त्यानुसार ऑडीट तपासासाठी सनदी लेखापाल धोंडीराम चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली. श्री. चौगुले यांनी ऑडीट केले असता त्यामध्ये शाखाधिकारी रयाजी गणपती पाटील, कॅशिअर किरण तानाजी पाटील (दोघे रा. रेदाळ), पासिंग ऑफीसर प्रभाकर पांडूरंग भोरे (रा. मांगूर, ता.निपाणी), संजय सदाशिव गुरव (रा. इचलकरंजी), क्लार्क शुभम संजय कांबळे (रा. हुपरी) व शिपाई अतुल रघुनाथ कांबळे (रा. रेंदाळ) या सहाजणांनी संगनमताने बनावट व बोगस 44 खाती उघडून त्याद्वारे बँकेत 1 कोटी 60 लाख 29 हजार 800 रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे धोंडीराम चौगुले यांनी अपहाराप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात उपरोक्त सहाजणांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून प्रभाकर भोरे, संजय गुरव, शुभम कांबळे व अतुल कांबळे या चौघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

कस्टम अधिकारी असल्याचे सांगत ऑक्शनमधील इम्पोर्टेड गाड्या व वस्तू कमी देण्याच्या बहाण्याने अनेकांना गंडा घालणार्या मुंबई येथील मनिष प्रभाकर आहिरे याला शिवाजीनगर पोलिसांनी इचलकरंजीत अटक केली आहे.
मुंबई येथील मनिष आहिरे याने आपली पत्नी अर्चना ही कस्टम खात्यात नोकरीस असल्याचे सांगत कस्टम खात्याकडून जप्त करण्यात आलेल्या इम्पोर्टेड गाड्या, ब्रॅण्डेड दुचाकी व चारचाकी तसेच स्क्रॅप मटेरियलसह अन्य वस्तू कमी किंमतीत देतो असे सांगत अनेकांकडून पैसे घेतले आहेत. अशा पध्दतीने या तिघांनी अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. त्यामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचार्यांसह नागरिकांचा समावेश आहे. या तिघांवर काशिमीरा पोलिस ठाणे, चितळसर पोलिस ठाणे व कोपरी पोलिस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत. यापैकी मनिष आहिरे हा इचलकरंजी येथील जनता चौक परिसरात येणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरिक्षक महादेव वाघमोडे यांना मिळाली. त्या अनुषंगाने श्री. वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत ओतारी यांनी जनता चौकात सापळा लावून मनिष आहिरे याला अटक केली. त्याला कोपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर चितळसर पोलिसांनी यापूर्वीच योगेश आहिरे याला अटक करण्यात आली आहे.