……सर्वांना खूप खूप धन्यवाद
—————————————————

आज रोजी इंग्रजी कॅलेंडरनुसार अस्मादिकांनी आपल्या जीवाची एकूण छप्पन्न वर्षे ओलांडली. तसा वाढदिवस साजरा करण्याचा माझा शिरस्ता 'रामनवमी'चा! या दिवशी अवघे जगच राममय बनलेले असते.रामजन्माचा पाळणा घरोघर गायला जातो,त्यात लगेहाथ प्रतिवर्षी आम्हीही स्वतःला जोजवून घेत असतो.मात्र हा सोशल मिडिया नावाचा 'समंध' या जगती आल्यापासून मला प्रतिवर्षी आजच्या तारखेला फोनकाॅल्स, एसएमएस,व्हाटस्अप, मेसेंजर, फेसबुक टॅग्ज आणि मेसेजेसना प्रतिसाद द्यावाच लागतो.तसे नाही केले तर हा 'उतला-मातला का रे' इ.इ. ऐकणे आलेच.मग भले चोवीस तास प्रतिसाद देण्यात आपल्याला अंगठा,मान,पाठ, हाताला कळा लागून सर्व्हायकल स्पाॅन्डिलिसिसचा प्रसाद लाभला तरी चालेल पण सर्वांना धन्यवाद तरी द्यायलाच हवेत.तुम्हा सर्वांचे प्रेम,एवढीच तर श्रीमंती आजवर मिळवलेली.
तर मंडळी आपण विविध माध्यमातून दिलेल्या शुभेच्छा व अभीष्टचिंतनाबद्दल खूप खूप धन्यवाद!स्वर्गीय मातापित्यांचे कायमचे लाभलेले आशीर्वाद,गुरूकृपा आणि तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांच्या बळावर हे 56 वर्षांचे आयुष्य मला लाभले.विशेषतः यावेळेसचा हा वाढदिवस साजरा करण्याचे बळ तरी नक्कीच तुमच्या सकारात्मक उर्जेचे आहे याबद्दल माझ्या मनी कोणतीच शंका नाही.ही उर्जा नसती तर अन्यथा आजचा दिवस माझ्यासाठी उजाडलाच नसता!
त्याचे झाले असे की, तसा नेहमीच आहार-विहार- व्यवहार- उपचारात कायम सकारात्मकता राखत मार्गक्रमणा करणारा मी,पण आठवड्यापूर्वी ऑफिसमध्ये काम करीत असताना एक चुकीची बाब स्वीकारण्याचा चोहोबाजूंनी आणला जात असलेला दबाव तेव्हा अगदी माझ्या जीवावर बेतलेला होता हे आता लक्षात येत आहे.त्यावेळी एका क्षणासाठी मानसिक द्वंद्व निर्माण झाले.संपूर्णतः नियमबाह्य,अनुचित कृती करण्याच्या सामुहिक दबावास बळी पडायचे की त्यास धुत्कारायचे! आणि नेहमीप्रमाणेच ,"असे छप्पन्नजणांनी छप्पन्नदा प्रसंग तुझ्यावर आणले आहेत,त्यास आजवर भीक नाही घातली तर इथेही नाही घालायची,सत्याच्या कसोटीवर छप्पन्न इंचाची छाती काढून सामना करायचा!'' हा अंतरात्म्याचा आवाज ऐकायचे ठरवले.माझा नीरक्षीरविवेक कामी आला.सत्य नोंदवून स्वाक्षरी केली आणि आलेला तणाव उतरला पण त्याचवेळी क्षणात माझी संपूर्ण उजवी बाजू बधीर होत चालल्याची जाणीव झाली.हातातील पेन जागीच टाकून मंत्रालयातील क्लिनिक गाठले.तेथील डाॅक्टरनी प्रथम रक्तदाब तपासला आणि तत्काळ 108 ला फोन करून अॅम्ब्युलन्स बोलावली. जिभेखाली साॅर्बिट्रेटची गोळी सरकवली व कार्यालय सोबती 'हरी'ला हरी अप् हरी अप् म्हणत अॅम्ब्युलन्स तत्काळ हाॅस्पिटलकडे पिटाळण्यास सांगितले.जीटी हाॅस्पिटलला जाताच एकेक चाचण्या सुरू झाल्या.
इसीजी व ब्लड रिपोर्ट ठणठणीत,शुगर नाही, बीपीची हिस्ट्री नाही.तेथील डाॅक्टरनी तातडीने जिथे न्युराॅलाॅजीस्ट आहेत तिथे अॅडमिट होण्यास सांगितले.आमच्याकडे नाहीत.मेंदूत अंतर्गत रक्तस्राव झाला नसेल म्हणजे मिळवली.बेलापूरला घराजवळचे एमजीएम हाॅस्पिटल नजरेसमोर आले.लगेच औरंगाबाद एमजीएमला माझी वर्गमैत्रीण प्रेरणा बोराडेला फोन केला.तिने फोनाफोनी करून बेलापूरात सर्व व्यवस्था लावली.एरवीचे आधी डिपॉझिट भरा,फाॅर्म भरा या झंझटी बाजूस ठेवून तातडीने चक्रं फिरली.योगायोगाने काॅलेज सुरू होण्यास अवकाश असल्याने दिल्लीहून कुटुंब मुंबईत आलेलेच होते.लेक उपासनाने एकाचवेळी घामाने डबडबलेला बाबास आणि घबराटीने थरथरलेल्या आईस सहजपणे सांभाळले.एमआरआय मध्ये मेंदूही शाबूत असल्याचे दिसले. मग पुन्हा मानेचा एमआरआय काढला आणि सर्व्हायकल स्पाॅन्डिलिसीसचे निदान झाले.मानेची शीर तीन ठिकाणी दबल्याने बीपी उच्च स्तरावर गेला आणि त्याने एक हलकासा झटका दिलाच असल्याचे आढळले.मग एक दिवस अस्मादिकांना 'एमजीएम' रूग्णालयाच्या आयसीयुमध्ये माॅनिटरिंगसाठी आयुष्यात प्रथमच घालवावा लागला.आता घरी संपूर्ण विश्रांती घेणे आले, पूर्ण ठणठणीत बरा होईपर्यंत.
हे सारे विस्ताराने लिहिण्याचे प्रयोजन असे की,मागील संपूर्ण आठवडा मी मोबाईलपासून संपूर्णपणे दूर होतो व महिनाभर असेच पथ्य पाळावे लागणार आहे.त्यामुळे मदतीसाठी माझ्या Omnipresent वृत्तीचा परिचय माहीत असणा-या अनेकांना माझे त्यांना अव्हेलेबल नसणे अनाकलनीय वाटत होते.तेवढ्यात आजच्या माझ्या वाढदिवसदिवशीही मी फोनवर/मेसेजवर उपलब्ध नाही हे पाहून आजाराच्या वार्ता कर्णोपकर्णी होत 'ध' चा 'मा' होत सर्वजण आणखीनच धास्तावत त्यांची फोनाफोनी वाढली.त्यामुळे सारे काही बयाजवार लिहीणे हाच पर्याय हाती उरला.लेखनिक म्हणून उपासना होतीच.आता तिच्या मदतीने गेले एक वर्ष माझी बंद ठेवलेली समाज माध्यम चावडी हलती दिसेल.
तर माझ्या सर्व सुहृदांनो, माझ्यावर आपण प्रेमाचा,मायेचा व काळजीचा वर्षाव केला आहे त्याचा संपूर्ण आदर राखत मी व माझे कुटुंब या पोस्टद्वारे आपणांस खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहे.आपण निरनिराळ्या मार्गाने केलेले माझे अभीष्टचिंतन हीच मला लाभलेल्या या

नवजीवनासाठीची उर्जा आहे.काही काळ तणावमुक्त जीवन जगण्यासाठी सर्व काही बाजूस ठेवून कुटुंबासह राहणे व संपूर्ण विश्रांती गरजेचे असल्यानेच वैद्यकीय सल्ल्याने दूरध्वनीपासून शक्यतोवर दूर राहावे लागत आहे.आपण सारे समजून घ्यालच.
गणेश रामदासी