मांजरा परिवारातील साखर कारखान्याकडून चालू गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाला रू. २००/- प्रति मे.टन चा हप्ता पेरणीसाठी, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या कडून जाहीर.
लातूर (विलासनगर ): मांजरा परिवारातील साखर कारखान्याकडे गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये गळीत झालेल्या ऊसाच्या एफआरपीपोटी पेरणीसाठी प्रति मे.टन रू.२००/- (दोनशे)प्रमाणे दुस-या हप्त्याची रक्कम संबंधित ऊस पुरवठादारांच्या बँक बचत खात्यावर वर्ग करण्या बाबतच्या सुचना मांजरा परिवाराचे मार्गदर्शक मा.श्री दिलीपरावजी देशमुखसाहेब यांनी परिवारातील कारखान्याना दिल्या आहेत.
मांजरा परिवारात साखर कारखान्याच्या २०२१-२२ च्या गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात विक्रमी नोंद झाली होती. कार्यक्षेत्रातील उपलब्ध संपुर्ण ऊसाचे गाळप झालेले असून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार २०२१ – २२ हंगामातील गळीत ऊसासाठी एफआरपी पोटी पहिल्या हप्त्याची प्रति मे. टन रू. २,२००/- (दोन हजार दोनशे) प्रमाणे होणारी रक्कम संबंधित ऊस पुरवठादारांना दर दहा दिवसाला आदा केलेली आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे एफआरपी निश्चित होऊन आदा करणेसाठी आणखी काही दिवसाचा कालावधी लागणार आहे. तथापि, महाराष्ट्रामध्ये मान्सुनपुर्व पावसास सुरूवात झालेली असल्याने व मान्सुन केरळ मध्ये दाखल झालेला असल्याने शेतकरी आंतर मशागतीची कामे तसेच पेरणीसाठी विवंचनेत होता. सदर परिस्थिती लक्षात घेऊन मा. दिलीपरावजी देशमुखसाहेब यांनी परिवारातील साखर कारखान्याकडे हंगाम २०२१ – २२ मध्ये झालेल्या गळीत ऊसासाठीच्या एफआरपी पोटी प्रति मे.टन रू. २००/- प्रमाणे दुस-या हप्त्याची अग्रीम रक्कम संबंधित ऊस पुरवठादारांना आदा करण्याच्या सुचना संबंधित कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना दिलेल्या आहेत. त्यानुसार सोमवार दिनांक १३ जून २०२२ पासून संबंधीत ऊस पुरवठादारांच्या बँक बचत खात्यावर सदर प्रमाणे रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही संबंधित कारखान्याचे व्यवस्थापना मार्फत करण्यात येणार आहे

मांजरा परिवारातील सर्वच कारखान्यांची वाटचाल आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार गतीमान होत असून या वाटचालीस महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्यमंत्री मा.ना. अमित विलासरावजी देशमुख साहेब, लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री धीरज विलासरावजी देशमुख साहेब यांचे नेतृत्व व मार्गदर्शन लाभत आहे.
मांजरा परिवारातील साखर कारखाने हे कार्यक्षेत्रातील परिसरासाठी उत्पन्नाचे मुख्य आर्थिक स्त्रोत असून परिवारातील साखर कारखान्यांचे नेतृत्व व मार्गदर्शन तसेच कारखान्याच्या कामकाजा विषयी असलेल्या विश्वासात दिवसें दिवस अधिकाधिक भर पडत आहे. एफआरपी पोटी रक्कम जमा होणार असल्याने पेरणीची चिंता संपल्याने सभासद, शेतकरी व परिसरात आनंदाचे वातावरण आहे.