औसा नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप संपूर्ण ताकदीने उतरणार – आ. अभिमन्यू पवार.
औसा ;दि.१६ ( प्रतिनिधी ) –
औसा नगरपालिका एक आव्हान आहे आणि हे आव्हान आपण स्वीकारले आहे. यासाठी जे जे करणे आवश्यक आहे ते सर्व काही केले जाईल. या अगोदरच्या निवडणूका वेगळया होत्या मात्र हि निवडणूक वेगळी असून यासाठी भाजपा संपूर्ण ताकदीने उतरणार असून यावर्षी औसा नगरपालिका भाजपचीच असणार आहे. आता जिंकायला लढायचे आहे.असा ठाम विश्वास व्यक्त करीत आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
दि.१३ फेब्रुवारी रोजी आमदार अभिमन्यू पवार यांच्या औसा येथील निवासस्थानी औसा शहर भाजप च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठकीत ते बोलत होते.यावेळी ज्येष्ठ नेते व्यंकट मोरे, कंटप्पा मुळे, हणमंत थोरात, ॲड.मुक्तेश्वर वागदरे, ॲड.अरविंद कुलकर्णी, एकनाथ बनसोडे, माधव सिंह परिहार , निवृत्ती कटके,सुभाष जाधव,संतोष मुक्ता,किरण उटगे,सुनील उटगे,भीमाशंकर राचट्टे,मुन्ना वागदरे,लहू कांबळे,संजय माळी,संतोष चिकुर्डेकर ,समीर डेंग,गोपाळ धानुरे,कल्पना डांंगे, सोनाली गुळबिले,पप्पूभाई शेख, धनराज परसणे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आ. अभिमन्यू पवार पुढे बोलत होते की भारतीय जनता पक्षाला पोषक वातावरण आहे. या निवडणुकीत संपूर्ण ताकदीने उतरणार असून ताकदीनेच सामना करायचा आहे. आता याठिकाणी भाजपचा आमदार आहे. यामुळे लोकांची अपेक्षा आहे.औसा शहरात भाजपची सत्ता आली पाहिजे म्हणून आणि सत्ता येणार आहे.कोणीही काळजी करायची गरज नाही. सर्व कार्यकर्त्यांना आमदारांचे घर यासाठी खुले आहे.भाजप पक्षाला सर्वांची मान्यता आहे. विधानसभेच्या काळात कोणत्याही भाजपच्या उमेदवाराला मुस्लिम समाजाचे जितके मते मिळाली नाहीत तेवढी मते आपणास मिळाली आहेत.मुस्लिम समाजाचे आपणास समर्थन आहे. आपले राजकारण हे विकासाचे राजकारण आहे.लातूर जिल्ह्य़ात भाजपचे सक्षम नेतृत्व असून औशाचे आमदार म्हणून मी, माजीमंत्री संभाजी पाटील निलंगेकर,खासदार सुधाकर श्रंगारे, आमदार रमेशअप्पा कराड, माजी आमदार पाशा पटेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे हे सर्व नेते आपल्या सोबत आहेत असे सांगून हि निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. दगाफटका होता कामा नये. कार्यकर्ते निवडणूकीत आपले सर्वस्व पणाला लावतो त्याला निवडून आणायची जबाबदारी आपली असून पक्ष मोठा आहे पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही.त्यामुळे पक्षाचा निर्णय अंतिम मानून काम करणारे आपण कार्यकर्ते आहोत महाराष्ट्र औसा हे एकमेव शहर आहे जिथे महापुरुषांचे पुतळे नाहीत. याठिकाणी शिवाजी महाराज, बश्वेशवर महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आण्णा भाऊ साठे यांचे पुतळे स्वाभिमानाने उभे केले जातील. आतापर्यंत लातूरचा लहान भाऊ म्हणून आतापर्यंत आपणाला सावत्र भावाची वागणूक मिळाली आहे.
यावेळी पुढे बोलताना आ. अभिमन्यू पवार यांनी ४ वर्ष झोपत असलेले सत्ताधारी शेवटच्या वर्षी माकणी धरणातून औसा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे फुकटचे श्रेय घेण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करीत असल्याची टीका करीत औसा शहर विकासाच्या दृष्टीने मनरेगा अंतर्गत रस्ते विकास व रुस्तम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ औसा येथे उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलाल औसा नगरपालिकेने नाहारकत प्रमाणपत्र न देता विकास कामांना खोडा घातला आहे. औसा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपण प्रामाणिकपणे काम करीत असून यावर्षी औसा नगरपालिका भाजप पक्षाचीच असणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.




