लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतलेला नोटबंदीचा निर्णय अत्यंत बेजबाबदार व दिवाळखोरपणाचा असल्याचे मत माजी खासदार तथा मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.
बापू – सुधा काळदाते प्रतिष्ठान औरंगाबादच्यावतीने गुरुवार दि. १ डिसेंबर २०२२ रोजी डॉ. बापूसाहेब काळदाते यांच्या ९३ व्या जयंतीचे औचित्य साधून ‘नोट बंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम’ या विषयावर डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते ॲड. धनंजय पाटील हे होते. याप्रसंगी अशोक गोविंदपूरकर, शिवाजीराव शिंदे, ॲड. मोहनराव पाटील, ॲड. वसंत उगले, अरविंद कांबळे, प्रा. सुधीर देशमुख, प्रा. सुधीर अनवले, कॉ. विश्वंभरराव भोसले, ॲड. आर. के. चव्हाण, प्रा. दत्ता मुंडे, प्रतिष्ठानचे सचिव ॲड. सुनील काळदाते, रणजित खंदारे आदींची प्रमुख उपस्थिती होती . आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी दिवंगत ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बापूसाहेब काळदाते यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. नोटबंदी या विषयांवर आपण आतापर्यंत अनेक व्याख्याने दिल्याचे नमूद करून हा निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतला म्हणून आपण त्याचा विरोध करतो असे नसून कोणत्याही पक्षाच्या पंतप्रधानांनी घेतला असता तरी आपण त्याना एवढाच प्रखरपणे विरोध केला असता, असे डॉ. मुणगेकर म्हणाले. अशा प्रकारचा बेजबाबदार निर्णय किमान २०० वर्षाच्या कालखंडात कोणत्याही देशाच्या पंतप्रधान वा राष्ट्राध्यक्षांनी घेतला नसल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे १५ लाख ८३ हजार कोटी रुपये किंमतीच्या ५०० व एका हजार रुपयांच्या चलनी नोटा बाद केल्या गेल्या. तेव्हापासून आतापर्यंत देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. पैशाशिवाय कोणताही व्यवहार करणे अशक्य आहे. आपल्याकडे ९० टक्के व्यवहार रोखीने चालतात. बनावट नोटा आणि काळा पैसा उजेडात आणण्याच्या उद्देशाने हा अवसान घातकी निर्णय घेतला गेला. मात्र, बाद केल्या गेलेल्या १५ लाख ८३ हजार कोटींपैकी लोकांनी पुन्हा बँकेत १५ लाख १६ हजार कोटी जमा केले. म्हणजे केवळ ६७ हजार कोटी रुपयांसाठी अर्थव्यवस्थेला वेठीस धरून उध्वस्त केले गेले, ही बाब अत्यंत चुकीची आहे. नोटबंदीच्या या चुकीच्या निर्णयाला विरोधी पक्षांनी तेवढ्याच खंबीरपणे विरोध करायला हवा होता. पण असे न झाल्याने देशातील सगळे विरोधी पक्षही बौद्धिक दिवाळखोर निघाल्याचा आरोप डॉ. मुणगेकर यांनी केला.
विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना त्यांच्या चुकीच्या निर्णयाबद्दल जाब विचारायला हवा होता. नोटबंदीच्या या निर्णयाला रिझर्व्ह बँकेची मान्यता असल्याचे सांगण्यात येत होते. तसे असेल तर ही रिझर्व्ह बँकेचीही दिवाळखोरी आहे,असे आपण म्हणू शकतो. मात्र नोटबंदीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा का दिला ? याकडे कोणीही गांभीर्याने पाहिले नसल्याबद्दल डॉ. मुणगेकर यांनी आश्चर्य व्यक्त केले. भारतात राजकारणाची चर्चा अत्यंत खालच्या पातळीवर होते. आपल्या देशातील किमान २० टक्के लोकांनी अद्यापही भारतीय राज्यघटनाही बघितलेली नाही, ही बाबही विचार करायला लावणारी आहे, असे सांगून डॉ. मुणगेकर यांनी देशाच्या नागरिकांनी सजग होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक गोविंदपूरकर यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी डॉ. बापूसाहेब काळदाते यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमास प्राचार्य अनिरुद्ध जाधव, डॉ. नरेंद्र काळे, डॉ. डी. एन. चिंते यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.