• स्थायी विकासाच्या धोरणास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन
• नागपुरात 75 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण – भूमिपूजन
नागपूर, दि. 11 : आपल्या सरकारकडून पायाभूत सुविधांना मानवी चेहरा दिला जात असून विविध क्षेत्रात मूलगामी परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातून वंचित-उपेक्षितांच्या विकासास अग्रक्रमाने प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी ग्वाही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे दिली. स्थायी विकासाचे धोरण हे देशासाठी सर्वाधिक गरजेचे असून त्यास सर्व घटकांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केले.

मिहान (नागपूर) येथील एम्स संस्थेजवळील मंदीर मैदानावर आयोजित कार्यक्रमात विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. चंद्रशेखर बावनकुळे आदी यावेळी उपस्थित होते.
हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग उदघाटन, नागपूर मेट्रो टप्पा-१ लोकार्पण, नागपूर मेट्रो टप्पा-२ भूमिपूजन, नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस शुभारंभ, नागपूर आणि अजनी रेल्वे पुनर्विकास शुभारंभ, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर राष्ट्राला समर्पित, नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प भूमिपूजन, सेंटर फॉर स्किलींग ॲड टेक्निकल सपोर्ट (सपेट), चंद्रपूर लोकार्पण असे विविध कार्यक्रम आज पार पडले.
नागपूर येथे आज ज्या विविध योजनांचे लोकार्पण झाले त्यातून सरकारचा विकासाचा सर्वसमावेशक दृष्टीकोन प्रतिबिंबित होतो. एम्स, समृद्धी महामार्ग, वंदे भारत गाडी, मेट्रो हे सारे विविध प्रकल्प विविध क्षेत्रातील जनतेच्या हिताचे आहेत. जीवनाच्या विविध अंगांना आम्ही त्यातून स्पर्श करीत आहोत असे सांगून श्री. मोदी म्हणाले, आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या आहेत. विविध धर्मक्षेत्रांच्या विकासातून सांस्कृतिक पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. जनधन योजनेच्या माध्यमातून ३५ कोटी गरीबांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यात आले आहे. एम्स संस्थेच्या उभारणीसह प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालये ही वैद्यकीय पायाभूत सुविधांची उदाहरणे आहेत. या साऱ्यांच्या माध्यमातून मानवी संवेदना जोपासल्या गेल्या आहेत. जेव्हा अशा सुविधा देताना मानवी चेहरा नसतो तेव्हा त्याचा जनतेला मोठा फटका बसतो असे सांगताना त्यांनी गेली ३०-३५ वर्ष रखडलेल्या गोसीखुर्द प्रकल्पाचे उदाहरण दिले.

विकासाला जेव्हा मर्यादित ठेवले जाते तेव्हा निर्माण होणाऱ्या संधीही मर्यादित असतात असे सांगून प्रधानमंत्री म्हणाले, यापूर्वी शिक्षण मर्यादित होते तेव्हा येथील गुणवत्ताही पूर्ण क्षमतेने समोर आली नाही. यामुळे मोठा वर्ग विकासापासून वंचित राहिला, त्याचा परिणाम म्हणून देशाची खरी ताकद पुढे आली नाही. मात्र, गेल्या आठ वर्षात आम्ही दृष्टीकोन आणि विचारपद्धतीत बदल घडविला. ‘सबका साथ, सबका विकास’ या सूत्राच्या सार्थकतेसाठी ‘सबका प्रयास’ही गरजेचा आहे. त्यात देशातील प्रत्येक नागरिक सहभागी झाला तरच देश विकसित होवू शकेल. आजवर जे वंचित-उपेक्षित राहिले ते आता आमच्या प्राधान्यक्रमाच्या अग्रस्थानी आहेत, हे स्पष्ट करताना प्रधानमंत्र्यांनी ‘वंचित को वरियता’ हे या सरकारचे सूत्र असल्याचे आग्रहाने सांगितले. शेतकरी, पशुपालक, रस्त्यावरील विक्रेते अशा विविध वर्गांचा विचार करून योजना राबविल्या जात आहेत. देशातील आकांक्षित जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न होत आहे. हे जिल्हे प्रामुख्याने आदिवासीबहुल आहेत. गेल्या आठ वर्षात आम्ही विविध वंचित क्षेत्रांना विकासाचे केंद्रे बनवित आहोत, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

राजकीय स्वार्थासाठी देशाचा पैसा लुटण्याचा शॉर्टकट अवलंबणाऱ्या प्रवृत्तीवर कठोर टीका करून प्रधानमंत्री म्हणाले, केंद्र सरकार पुढील २५ वर्षांचे उद्दिष्ट्य आखून काम करीत आहे. मात्र, काही प्रवृत्ती देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करीत आहेत. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठयावर आपण आहोत अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही, ‘शॉर्टकट’ वृत्तीने देश चालू शकत नाही. दूरगामी दृष्टीकोन असल्याशिवाय देशाचा स्थायी विकास होवू शकत नाही. हा मुद्दा स्पष्ट करताना प्रधानमंत्र्यांनी सिंगापूरचे उदाहरण दिले. यापूर्वी प्रामाणिक करदात्यांनी दिलेला पैसा चुकीच्या आणि अनिष्ट बाबींसाठी खर्ची पडला आता हा पैसा युवा पिढीच्या भविष्यासाठी खर्च झाला पाहिजे ही काळाची गरज आहे. ‘आमदनी अठ्ठणी खर्चा रुपया ‘ या प्रवृत्तीमुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होवू शकते अशा प्रवृत्ती पासून देश वाचवला पाहिजे ‘शॉर्टकट’ ऐवजी स्थायी विकासाचे धोरणच आपली मोठी गरज आहे. देशहितासाठी सर्वांनी त्याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या अखेरीस केले.

महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणार – मुख्यमंत्री
आपण सुरुवात केलेल्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्याचा आनंद आणि समाधान आहे. त्यातही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते हे लोकार्पण होत असल्याचा आपणास आनंद आणि अभिमान आहे. अशा भावना व्यक्त करुन मुख्यमंत्री म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जे स्वप्न पाहिले होते त्या स्वप्नाची ही पूर्ती आहे. या प्रकल्पात विक्रमी वेळेमध्ये भूमी अधिग्रहण करण्यात आले. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात आली. शेतकऱ्यांना थेट आरटीजीएस करून पैसे देण्यात आले. हा इकॉनॉमिक कॅारिडॉर आहे त्यासोबतच ग्रीन कॅारिडॉर सुद्धा आहे. या ठिकाणी वन्यजीवांचीही विशेष काळजी घेतली आहे. खऱ्या अर्थाने समृद्धी महामार्ग ही महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार आहे. लक्षावधी लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. सर्व घटकांच्या हिताचे आपले सरकार असून प्रगतीच्या दिशेने महाराष्ट्राला नेण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

विदर्भ – मराठवाड्याच्या विकासाला चालना – गडकरी
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी आवश्यक होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील विकासाला चालना मिळेल, असा अशावाद व्यक्त करुन गडकरी म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अत्यंत दर्जेदार काम केले आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई-पुणे हा महामार्ग तसेच वांद्रे वरळी सी-लिंक या प्रकल्पाचे काम केले आहे. आता हा आणखी एक महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी पूर्णत्वास नेला आहे. याशिवाय विविध रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात लवकरच औरंगाबाद ते पुणे या महामार्गाचे काम पूर्णत्वास येत आहे. महाराष्ट्रात ७५ हजार कोटी रुपयांचे ग्रीन हायवे लवकरच पूर्णत्वास येईल, असे ते म्हणाले.
नागपूर विमानतळाचे लवकरच भूमिपूजन – फडणवीस
समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या खंबीर पाठबळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या महामार्गाच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या पुढील दोन वर्षात ५० हजार कोटी प्राप्त होतील. त्यातून इतर पायाभूत सुविधांची कामे होऊ शकतील. केंद्र सरकार राबवत असलेल्या गतिशक्ती योजनेचे उत्तम उदाहरण म्हणजे समृद्धी महामार्ग होय. या महामार्गाच्या मल्टीयुटीलिटी कॉरिडॉरच्या माध्यमातून गॅस पाईपलाईन, पेट्रोलियम प्रॉडक्ट पाईप लाईन, अंडर सी केबल सोबतच दृतगती रेल्वे मार्गाची तरतूद अशा विविध बाबी जोडल्या जात आहेत. त्याचा डेटा सेंटर निर्मितीसाठी उपयोग होऊ शकेल. सौरऊर्जा निर्माण होणार आहे. अशा अनेक बाबींतून हा प्रकल्प अधिक समृद्ध केला जाणार आहे. शहरातील रेल्वे स्थानक सुसज्ज करण्यात येत आहेत. रेल्वे, रस्ते, हायस्पीड ट्रेन अशा अनेक प्रकल्पांची कामे होत आहेत. नागपूर-गोवा महामार्गाची लवकरच उभारणी करण्यात येणार आहे. मल्टीमॉडेल कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न पूर्णत्वाकडे जात आहे. राज्यातील जिल्हे प्रमुख बंदराशी जोडतांना महाराष्ट्राचा ‘पोर्टलेड’ विकासासह विविधांगी दृष्टीकोनातून विकास करण्यात येत आहे असे सांगताना नागपूर येथील नव्या विमानतळाच्या भुमिपूजनाच्या उद्घाटनाचे निमंत्रणही लवकरच प्रधानमंत्री श्री. मोदी यांना देण्यात येईल, अशी घोषणाही श्री. फडणवीस यांनी केली. नागपूर शहरातील मेट्रो टप्पा दोन आणि नाग नदी प्रदूषण निर्मूलन हे दोन्ही प्रकल्प मधल्या काही काळात रखडले होते मात्र, प्रधानमंत्री कार्यालयाच्या पुढाकाराने केवळ 35 दिवसात मंजुरी देण्यात आल्याने सांगून त्यांनी विशेष आभार मानले.

विकासाच्या नभांगणातील अकरा तारे
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भाषणात विकासाच्या नभांगणातील अकरा तारे असा नागपुरातील विविध लोकार्पण व उदघाटन कार्यक्रमांचा उल्लेख केला. हे तारे असे…
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग – महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेखा ठरणा-या ५५ हजार कोटींच्या सहापदरी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन करण्यात आले.
नागपूर मेट्रो फेज १ – नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणा-या ४० किलोमीटर अंतराच्या ९ हजार ३०० कोटी खर्चाच्या प्रकल्पाचे लोकार्पण
नागपूर मेट्रो फेज २ – नागपुरातील मेट्रो जाळे हिंगणा, कन्हाण बुटीबोरीपर्यंत विस्तारित करणा-या ४४ किलोमीट अंतराच्या आणि ६७ हजार कोटी खर्चाच्या प्रकल्पाची पायाभरणी
वंदे भारत एक्सप्रेस – नागपूर ते बिलासपूर या दोन शहरामधील प्रवासी वाहतुकीला गतिमानतेचा आयाम देणा-या आणि ताशी १३० कि.मी. वेगाने धावणा-या रेल्वे गाडीला प्रारंभ
नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प – नागपूर शहरातील नाग नदीला नवे जीवन देणा-या ४१ कि.मी. लांबीचा आणि १९२७ कोटी खर्चाच्या प्रकल्पाची पायाभरणी
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर – राज्या वैद्यकीय क्षेत्रात नवे पर्व असणा-या आणि १५० एकर क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज संस्था राष्ट्राला समर्पित
नागपूर आणि अजनी रेल्वे स्टेशन पुनर्विकास प्रकल्प – नागपूर रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्पासाठी ५८९ कोटी आणि अजनी रेल्वेस्थानक पुनर्विकास प्रकल्पासाठी ३६० कोटी खर्चाच्या प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ
चंद्रपूर येथील सिपेट – सेंटर फॅार स्किलिंग अँड टेक्निकल सपोर्ट (सीएसटीएस) चंद्रपूरचे लोकार्पण करण्यात आले. राज्य शासनाने या संस्थेला 15 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे.
नागपूर इटारसी तिसरी मार्गिका कोहळी-नरखेड खंड राष्ट्राला समर्पित.
अजनी येथे लोकोमोटिव्ह डेपो – अजनी येथील अत्यंत महत्वाकांक्षी अशा १२ हजार हॅार्सपॅावरच्या लोकोमोटिव्ह डेपोचे लोकार्पण
नॅशनल इंस्टिट्यूट फॅार हेल्थ – नागपुरातील नॅशनल इंस्टिट्यूट आफ हेल्थ या संस्थेची पायाभरणी करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून अनेक दूर्धर आजारांवरील संशोधन होणार आहे.
चंद्रपूर येथील सेंटर फॉर रिसर्च मॅनेजमेंट ॲन्ड कंट्रोल ऑफ हिमोग्लोबिनो पॅथीस या संस्थेचे लोकार्पण करण्यात आले.
श्री टेकडी गणेशाला वंदन !
प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. आजच्या संकष्टीचतुर्थीचा उल्लेख करून शहरातील श्री. टेकडी गणेशाला वंदन केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ७५ हजार कोटी खर्चाच्या विविध कामांच्या लोकार्पण आणि शुभारंभाबद्दल त्यांनी नागपूरच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.

0000
नागपूर मेट्रोचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
विस्तारीकरण प्रकल्पाची पायाभरणी
खापरी-ऑटोमोटिव्ह आणि प्रजापती नगर-लोकमान्य नगर मार्गावर प्रवासी सेवेचा प्रारंभ
नागपूर, दि.११ : नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणाऱ्या नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील दोन मार्गाचे लोकार्पण तसेच दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो विस्तारीकरण प्रकल्पाची पायाभरणी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खापरी मेट्रो स्थानकावर करण्यात आली.
याप्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार कृपाल तुमाने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
प्रधानमंत्र्यांनी झिरो माईल मेट्रो ते खापरी मेट्रो स्थानका दरम्यान मेट्रोने प्रवास केला. यानंतर त्यांनी खापरी मेट्रो स्थानकाला नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्ग क्रमांक-२ व मार्ग क्रमांक-४ अंतर्गत ‘कस्तुरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौक’ आणि ‘कस्तुरचंद पार्क ते प्रजापती नगर मेट्रो स्थानक’ या मार्गांवरील मेट्रो वाहतूक सेवेचे लोकार्पण केले. या टप्प्यातील ४० कि.मी. मार्गावर ३६ मेट्रो स्थानकांचा समावेश असून या प्रकल्पासाठी ९३०० कोटींचा खर्च झाला आहे.
मेट्रो विस्तारीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ३२ स्थानकांचा समावेश आहे. हा टप्पा ४३.८ कि.मी. अंतराचा आहे. यासाठी ६७०० कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. यात उत्तरेकडे कन्हान, दक्षिणेला बुटीबोरी एमआयडीसी, पूर्वेला ट्रान्सपोर्ट नगर आणि पश्चिमेला हिंगणापर्यंत मेट्रोचा विस्तार होणार आहे. भविष्यात नागपूर शहरातील वाढत्या लोकसंख्येसाठी हा प्रकल्प मोलाचा ठरणार आहे.
खापरी मेट्रो स्थानक आणि मेट्रो ट्रेन सजविण्यात आली होती. याप्रसंगी मेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षीत, तसेच नागपूर मेट्रोचे अधिकारी सुनिल माथूर, अनिल कोकाटे, अतुल गाडगीळ, हरिंदर पांडे, उदय बोलवनकर आदी उपस्थित होते.
000

समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
महामार्गावर १० किलोमीटरचा प्रवास
नागपूर, दि.११ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. महामार्गाच्या नागपूर येथील झिरो पॉईंट पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टोल प्लाझा येथे अनावरणाचा हा कार्यक्रम झाला.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.
कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी महामार्गाची पाहणी केली. तत्पूर्वी श्री. मोदी यांनी समृद्धी महामार्गावर झिरो पॉईंट ते टोल प्लाझा असा 10 किलोमीटरचा प्रवास केला. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य मान्यवर होते.
प्रधानमंत्र्यांनी घेतला ढोलताशाचा आनंद
कोनशिला अनावरणप्रसंगी प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी ढोलताशा पथक ठेवण्यात आले होते. प्रधानमंत्र्यांनी स्वतः ढोल वाद्य वाजवत अनोखा आनंद घेतला. तसेच या पथकातील कलावंतांशी संवाद साधला. कार्यक्रमस्थळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अनावरण संपवून निघतांना प्रधानमंत्र्यांनी नागरिकांची गर्दी असलेल्या ठिकाणी वाहन हळू करत नागरिकांना हात दाखवित त्यांचे अभिवादन स्विकारले.
समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळ्याच्या शिर्डी इंटरचेंज येथील लाईव्ह प्रक्षेपण कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जनतेच्या मनाला जोडणारा विकासाचा महामार्ग – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
शिर्डी, दि.११ डिसेंबर (उमाका वृत्तसेवा) – हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याच्या वाहतूक व दळणवळण सेवेचे लोकार्पण नागपूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी करण्यात आले. नागपूर येथील मुख्य सोहळ्याचे शिर्डी इंटरचेंज येथे थेट दृकश्राव्य प्रक्षेपण करण्यात आले. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रक्षेपण कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जनतेच्या मनाला जोडणारा हा विकासाचा महामार्ग असल्याचे मत यावेळी पालकमंत्र्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने शिर्डी इंटरचेंज येथे नागपूर येथील सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री श्री. विखे-पाटील बोलत होते. यावेळी खासदार सदाशिवराव लोखंडे, डॉ.सुजय विखे पाटील, आमदार सिमा हिरे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, कार्यकारी अभियंता यशवंत पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २०१६ मध्ये मुख्यमंत्री असतांना समृद्धी महामार्गाची घोषणा झाली आणि प्रत्यक्ष कामाला त्यांच्या काळात सुरुवात झाली. त्यावेळी आपल्या विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रस्ते विकास विभागाचे मंत्री होते. या उभयतांनी समृध्दी उभारणीसाठी कष्ट घेतले. विक्रमी अशा कमी वेळेत भूसंपादन केले. मुंबई ते नागपूर ७०१ किलोमीटरचा हा महामार्ग चार विभागांतील १० जिल्ह्यांमधून जात असल्याने त्या भागातील विकासाला मोठी गती मिळणार आहे. शेती विकासाला उपयुक्त ठरणार असून, मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश मधील शेतकरी आपला उत्पादित माल थेट मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी नेवू शकणार आहेत. शेती – कृषी मालाची निर्यात होणार असल्याने औद्योगिकीकरणाला चालना मिळणार असल्याचा विश्वास ही महसूलमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
खासदार श्री.लोखंडे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विकासाला प्राधान्य देऊन काम करत आहे. समृद्धी महाराष्ट्राबरोबर नगर जिल्ह्याची भाग्यरेषा ठरणारा प्रकल्प आहे.
खासदार डॉ.विखे-पाटील म्हणाले, समृध्दी महामार्गाला जोडूनच सुरत-हैद्राबाद हा ग्रीन फिल्ड महामार्ग जाणार आहे. नगर-मनमाड महामार्गाचे काम जानेवारी २०२३ पासून सुरू होत आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याला गतिशिल रस्त्यांचे जाळे उभे राहणार आहे. त्यातून विकासाला चालना मिळणार आहे.
प्रास्ताविकात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे प्रकल्प संचालक विश्वनाथ सातपुते म्हणाले की, समृद्धी महामार्गावर मुंबई ते नागपूर दरम्यान २४ इंटरचेंज (प्रस्थान मार्ग) आहेत. यात शिर्डी इंटरचेंज सर्वात मोठा आहे. या इंटरचेंज वर १६ टोल नाके (मार्गिका) आहेत. या १६ मार्गिकेच्यावर मध्यभागी एकच आधारस्तंभ असलेली सर्वात मोठी छत्री (canopy) आहे. मनमाड- अहमदनगर, पुणतांबा – झगडे फाटा व सिन्नर-शिर्डी तीन राष्ट्रीय महामार्ग एकमेकांना समृद्धी महामार्गावर शिर्डी इंटरचेंज येथून छेदून जातात.
कार्यक्रमानंतर लगेचच केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून एक हजार ज्येष्ठ नागरिकांना विविध दिव्यांग साधनांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानात आयटीआय विद्यार्थ्यांचा सहभाग
विद्यार्थ्यांनी केला स्वच्छ मुंबईचा संकल्प
मुंबई, दि. ११: शहराला स्वच्छ आणि आरोग्यदायी बनविण्याच्या उद्देशाने सध्या राबविण्यात येत असलेल्या ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानात मुंबईतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले. त्याचबरोबर या अभियानाबाबत जनजागृती करून अभियानात मुंबईकरांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेत आपल्या संस्थेबरोबरच शहराला स्वच्छ ठेवण्याचा निर्धार केला.
राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रदीप दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली उपनगरातील आयटीआयनी या अभियानात सहभाग घेतला.
अभियानाअंतर्गत 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत नवीन वर्षारंभापुर्वी मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ असावीत या उद्देशाने मुलुंड, कुर्ला, गोवंडी, अंधेरी, बोरिवली व चांदिवली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून उत्साहात हा उपक्रम राबविण्यात आला. या संस्थांनी आपल्या आयटीआय परिसराबरोबरच मुलुंड, नाहूर, विद्याविहार, बोरिवली, खार व कुर्ला रेल्वे स्थानकांवर स्वच्छता केली. संस्थांचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी व प्रशिक्षणार्थ्यांनी “स्वच्छता प्रतिज्ञा” घेतली. कार्यक्रमासाठी त्या त्या वॉर्डचे महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुंबई उपनगरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य संजय गोरे (मुलुंड), उपप्राचार्य संदिप परदेशी (मुलुंड), श्रीमती पाटिल (कुर्ला गोवंडी), कमलेश केळबाईकर (बोरीवली), शरद गोतपगार (अंधेरी), एस. व्ही. पाटील (चांदिवली) यांनी उपक्रमाचे नियोजन केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा
‘फ्रीडम पार्क – खापरी मेट्रो’ प्रवास
प्रवाशांशी साधला संवाद
नागपूर, दि.11: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथील फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन ते खापरी या स्थानकांदरम्यान मेट्रोने प्रवास केला. या प्रवासात त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला.
प्रधानमंत्र्यांसोबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव व मेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते.
नागपूर शहराला नवी ओळख प्राप्त करून देणाऱ्या मेट्रोवर आधारित प्रदर्शनाची पाहणीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. यावेळी मेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. या पाहणीनंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन ते खापरी प्रवास केला. या प्रवासात त्यांनी स्टार्टअप विद्यार्थी, मेट्रो कर्मचारी व इतर प्रवाशांसोबत संवाद साधला.
नागपूर-बिलासपूर ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला
प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा
नागपूर दि. 11: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर रेल्वे स्थानकावर नागपूर-बिलासपूर शहरांदरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ या वेगवान रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. या गाडीमुळे या दोन्ही शहरांदरम्यान वेगवान रेल्वेगाडीचा पर्याय उपलब्ध झाला असून ही देशातील सहावी तर महाराष्ट्रातील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरली आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी रेल्वे स्थानकावर उभ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यामधील प्रवाशांशी संवाद साधला. तसेच या एक्सप्रेस गाडीच्या कॅबिनलाही भेट देवून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मुख्य कार्यक्रमस्थळी त्यांनी या एक्सप्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी उपस्थित मान्यवर, विद्यार्थ्यांसह रेल्वे अधिकारी कर्मचारी व नागरिकांनी टाळयांच्या गजराने या एक्सप्रेस गाडीला निरोप दिला. वंदे भारत एक्सप्रेसमुळे नागपूर ते बिलासपूर हे अंतर अवघ्या साडेपाच तासात गाठता येणे शक्य होणार आहे. दक्षिण पूर्व मध्ये रेल्वे मार्गावर ही एक्सप्रेस चालवली जाणार आहे. वेगवान प्रवासासोबत सुरक्षेची काळजी घेण्यात आलेल्या या एक्सप्रेस गाडीला 16 कोच असून या गाडीची आसनक्षमता 1 हजार 128 आहे. नागपूर ते बिलासपूर दरम्यान या गाडीला फक्त गोंदिया, दुर्ग आणि रायपूर एवढेच थांबे देण्यात आले आहेत.
वंदे भारत एक्सप्रेस गाडीविषयी
· आज प्रारंभ झालेली देशातील ही सहावी तर महाराष्ट्रातील दुसरी वंदेभारत एक्सप्रेस ठरली आहे.
· स्वदेशी बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय अभियंत्यांच्या क्षमतेची साक्ष आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे फलित आहे.
· या एक्सप्रेस गाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आणि छत्तीसगडची राजधानी रायपूर आणि बिलासपूर ही महत्वाची शहर जोडली जाणार.

· नागपूर – बिलासपूर एकूण अंतर: 412 कि.मी.
· प्रवास वेळ : 5.30 तास
· उभय शहरांदरम्यान आठवड्यातून 6 वेळा धावणार वंदे भारत एक्सप्रेस (शनिवारी सेवा बंद असणार)
· गाडीला एकूण 16 कोच असून प्रत्येक कोचमध्ये प्रवाशांच्या माहितीसाठी 32 इंचीच्या डिजिटल स्क्रिन.
· प्रवासी घेणार वेगवान व सुरक्षित प्रवासाचा अनुभव. विमान प्रवासाचा अनुभव देतानाच ‘कवच’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून या एक्सप्रेस गाडीत सर्वोत्तम सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
· प्रत्येक कोचमध्ये प्रवाशांची माहिती आणि इंफोटेनमेंट उपलब्ध आहे. दिव्यांग प्रवाशांची विशेष काळजी घेण्यात आली आहे, ठीक -ठिकाणी ब्रेल लिपीतून माहिती व सूचना देण्यात आल्या आहेत. टच फ्री सुविधांसह व्हॅक्यूम प्रसाधनगृहे, उच्च कार्यक्षमतेच्या कंप्रेसरद्वारे उत्कृष्ट वेंटिलेशन आणि वातानुकूलन नियंत्रण राखण्यात आले आहे.
00000