श्रम आणि सेवा याचा सुरेख संगम म्हणजे बाबा आमटे – डॉ.शिवराज बोकडे
उदगीर,
बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांना आपलंसं करून त्यांच्यातील अस्मिता, स्वाभिमान जागे केले. रंजल्या गांजल्याची सेवा हीच खरी सेवा आहे, हे व्रत घेऊन त्यांनी काम केले. कर्मभक्तीला त्यांनी सतत महत्त्व दिले. एकंदरीत श्रम, सेवा व समर्पण याचा सुरेख संगम समाजसुधारक बाबा आमटे यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला होता. असे विचार डॉ. शिवराज बोकडे यांनी व्यक्त केले.

वाचक संवादाचे २५९ वे पुष्प स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. शिवराज बोकडे यांनी गुफले. माजी प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे लिखित आनंदयात्री : डॉ. बाबा आमटे या पुस्तकावर गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र उदयगिरि महाविद्यालय उदगीर येथील मराठी विभागाचे प्रमुख व उपप्राचार्य डॉ.राजकुमार मस्के हे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. शिवराज बोकडे म्हणाले, आनंदवन सामाजिक बांधिलकीचे, प्रबोधनाचे, देशप्रेमाचे एक महत्त्वाचे केंद्र होते. बाबांनी सामाजिक कार्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा निजध्यास देखील घेतलेला होता.अनेक प्रकल्प हाती घेऊन बाबा आमटे शेवटपर्यंत कृतिशील राहिले. असे सांगत त्यांनी या ग्रंथातील अनेक संदर्भ अगदी ओघवत्या भाषेत सांगून श्रोत्यांना अंतर्मुख केले. शेवटी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला समर्पक अशी उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.राजकुमार मस्के म्हणाले, आनंदवन हे एक समाजाचे विद्यापीठ ,अनाथांचेआश्रयस्थान आहे. समाजाने ज्याला नाकारले होते त्या माणसात बाबा आमटे यांनी देव पाहिला.त्यामुळेच तर आपण त्यांच्या विचार व कार्यासमोर नतमस्तक होतो. यावेळी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जाधव साहेबांना जन्मदिनाची ग्रंथभेट देऊन गौरविण्यात आले. यावेळी शहरातील बंधू-भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक अनंत कदम, मुरलिधर जाधव, प्रा.राजपाल पाटील, डॉ.कांत जाधव यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुर्यकांत सावंत तर आभार डॉ. म. ई. तंगावार यांनी मानले.