अहमदपूर ( प्रतिनिधी) –
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा वारसा संत रोहिदास महाराजांनी जपत उत्तर भारतात कर्मकांड, अंधश्रद्धा, व वर्णाश्रम धर्माला विरोध करत मानवताधर्माची शिकवण दिली. असे प्रतिपादन शिवाजी महाविद्यालय रेणापूर येथील डॉ. जयद्रथ जाधव यांनी संत रोहिदास यांच्या ६४६ व्या जयंती व्याख्यान प्रसंगी झरी (बु.) येथे केले.
संत रोहिदास विचार मंच झरीबु यांच्या वतीने आज ही जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित सरपंच मा. दयानंदभाऊ सुरवसे होते. प्रमुख मार्गदर्शक व्याख्याते म्हणून डॉ.प्रा. जयद्रथ जाधव प्रा.वैजनाथ सुरनर , श्री खलसे सर, यांचेही बहुमूल्य प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. महादेव घायाळ यांनी केले. संत रोहिदास यांच्या विचार कार्यावर प्रकाश टाकताना डॉ. जयद्रथ जाधव म्हणाले की, संत साहित्याची मोठी परंपरा आपल्या देशाला लाभली आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वकाळात सामाजिक आणि वेगवेगळ्या संप्रदायाच्या माध्यमातून लोकशाहीचा विचार दिला. मध्ययुगात धर्म आणि समाजात प्रचंड विषमता होती.पण संतांनी याकडे दुर्लक्ष करून स्वतंत्र नवा संप्रदाय स्थापन करून त्यातून समाजाला संघटित व एक केले.संतांच्या विचारांमुळे भारतावर अनेक आक्रमणे झाली,गुलामी आली तरीही समाज दुभंगला नाही. आपल्या देशात पुरोगामी विचारांची संत परंपरा असून या परंपरेने सतत विषमतावादी वर्ण, धर्म, संप्रदायी विचाराला विरोध करत समाज एक संघ सातत्याने ठेवला आहे. यामध्ये संत रोहिदासांचा महत्त्वाचा वाटा आहे. संत रोहिदासांचा जन्म काशी जवळील गोवर्धनपूर येथे झाला. त्यांचे गुरु रामानंद होते.भक्ति आंदोलनाच्या प्रभावातून सामान्य जातीतील संत निर्माण झाले.१५ व्या शतकातील संत रोहिदास हे परिवर्तनवादी प्रभावी संत होते.शीख पंथाचे गुरू अर्जुनदेव यांनी त्यांचे ४० पदे गुरूग्रंथसाहेब यात समाविष्ट केले आहेत.

संत रोहिदास यांनी जाती, धर्म,वर्ण व्यवस्था हटवण्याचा प्रयत्न केला.
“जाति जाति मे जाति है।छो केतन के पात,
रैदास मनुष्य ना जुड़ सके जाति न पात।“
याबरोबरच संत रोहिदासांनी कर्म धर्माची शिकवण दिली.कर्माने,विचारांने मनुष्य श्रेष्ठ असतो.
“ब्रह्माण मत पुजिए छो होए गुणहीन,पुजिए चर्च चांडाल के छो होने गुण प्रविण।“असे सप्रमाण सांगितले. संत हे नुसते भजन करत नव्हते, तर समाजात होत असलेल्या अन्यायावर अनिष्ठेवर आवाज उठवण्याचे काम आपल्या प्रबोधनातून करीत होते. प्रा. वैजनाथ सुरनर यांनी संत रोहिदास महाराज यांनी आपले चर्मकाराचे काम प्रामाणिकपणे करून समाजाची सामाजिक बांधिलकी जपत प्रबोधन करण्याचं काम करत होते. तसेच ते आपल्या व्यवसायात एवढे एकनिष्ठ होते की, त्यांनी आपल्या कामांमध्ये सतत व्यस्त राहून परमेश्वराचे चिंतन केले. आणि समाजाला एक आगळावेगळा आदर्श निर्माण करून दिला. तरी याप्रसंगी खलसे सरांनी सुद्धा संतांनी भेदाभेद किंवा जातीयता न मानता एकनिष्ठपणे समाजाची सेवा केल्याचे सांगितले. देव हा दगडात नसून प्रत्येक पशु प्राणी पृथ्वीच्या प्रत्येक कणाकणामध्ये देव असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय समारोप माननीय दयानंदभाऊ सुरवसे यांनी केले. या कार्यक्रमाला श्री नामदेव सुरवसे, पोलीस पाटील तुकाराम पाटील,श्री आबाजी सुरवसे, श्री उमाकांत डोंगरे, श्री नागनाथ सुरवसे, श्रीपाराप्पा शिंदे, श्री तुकाराम कांबळे, श्री बालाजीतात्या मेन चक्रे, ग्रामपंचायत सदस्य राहुल सुरवसे व शिवशंकर सुरवसे, श्री गणपत सुरवसे,श्री राम पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक घायाळ बामणे परिवारातील सर्व नवतरुण मंडळ उपस्थित होते.आभार प्रदर्शन श्री लक्ष्मण घायाळ यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा जयेश कर्डिले व प्रा.गणेश डोंगरे यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी चर्मकार समाजातील सर्वच तरुण यांनी मिळून मिसळून केला.




