27.8 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeसंगीतलता मंगेशकरांना स्वरचिंब श्रद्धांजली

लता मंगेशकरांना स्वरचिंब श्रद्धांजली

‘तेरा जाना ….’ : लातुरात सुश्राव्य मैफलीने लता मंगेशकरांना स्वरचिंब श्रद्धांजली

सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात रसिक झाले मंत्रमुग्ध

लातूर : ( विशेष प्रतिनिधी)-

रसिकांसाठी, सामान्यजनांसाठी सुरांचे कोणते ऐश्वर्य, कोणता ठेवा लतादीदी ठेवून गेल्या, याची स्वरचिंब प्रचीती लातुरात सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या ‘तेरा जाना… दिल के अरमानोंका लुट जाना…’ ह्या कल्पक श्रद्धांजलीपर कार्यक्रमात आली. लतादीदींच्या जाण्याने व्यथित झालेल्या कलावंत आणि रसिकांचे सूर ह्या कार्यक्रमात जुळले. लातूरमधील ‘गायत्री उत्सव’ सभागृहातील कार्यक्रमात नव्या-जुन्या, पारंगत आणि नवख्या पण सशक्त कलावंतांनी सादर केलेल्या, नव्या-जुन्या, वेगवेगळ्या भावावस्थेतील आणि सुरावटीतील सिनेगीतांबरोबरच सिनेतरही मराठी हिंदी गाण्यांना रसज्ञ दाद देवून लातूरकरांनी आपल्या रसिकतेचा परिचय करून दिला. लतादीदींच्या स्मृतींनी जडावलेल्या अंत:करणाने अतिशय गंभीर वातावरणात सुरु झालेल्या, दर्जेदार निवडीच्या व दमदार सादरीकरणाच्या, हूरहूर लावणाऱ्या मैफलीचा आस्वाद रसिक घेत राहिले. 

‘ओम नमोजी आद्या…’ ह्या प्रतिभेच्या मूर्तीचे वर्णन करणाऱ्या, ज्ञानेश्वरांच्या ओळींसह डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी  सुरुवात केलेल्या ह्या मैफलीची रंगत वरचेवर वाढत गेली. डॉ. आशा कोल्हे यांनी गायिलेले ‘ऐ दिले नादां…’ हे गीत जणू त्याच स्वरांची आळवणी होती असे वाटले. मनाची हीच कैफियत पुढे ‘दिल तो है दिल…’ ह्या ऐंशीच्या दशकातील गीतातून डॉ. विनया बनशेळकीकर यांनी मांडली, तर डॉ. देवश्री येरटे यांनी ‘तुझसे नाराज नही जिंदगी…’ ह्या गाण्यातून आयुष्याचे अनाकलनीय स्वरूप उभे केले. स्त्रीसुलभ भावनेच्या एकाकी आणि विरहव्याकुळ मनाची साद डॉ. अर्चना आपटे यांनी ‘मेघा छाये आधी रात…’ मधून मांडली, तर ‘साधी माणसं’ मधील ‘माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं…’ ह्या गाण्यातून ग्रामीण, मराठमोळ्या, शेतकरी सासुरवाशिणीच्या जीवनवादी स्वच्छंदी, निरागस मनाचं प्रतिबिंब डॉ. राजश्री  सावंत यांनी आपल्या शैलीत हुबेहूब साकारलं. पहिल्या सत्राच्या शेवटी कोवळ्या वरदा बनशेळकीकर हिने लतादीदींची ओळख असलेल्या जगप्रसिद्ध ‘ऐ मेरे वतन के लोगों…’ तून रसिक व कलावंतांना अक्षरश: सद्गदित व अंतर्मुख केले. ह्या गाण्यातील भाव, सूर, तादात्म्य भावनेची आव्हानं लहान वयात पेलणाऱ्या वरदानं मैफल आश्चर्यचकित केली. दुसऱ्या सत्रात डॉ. अनुजा कुलकर्णी यांच्या सुमधुर ‘अजीब दास्तां है ये…’, डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्या सुस्वर ‘तेरे सुर और मेरे गीत …’  तर वृषाली कुलकर्णी यांच्या मनोज्ञ अशा ‘तुमही मेरे मंदिर…’ ह्या गाण्यांनी हिंदी सिनेसंगीताचा भावोत्कट असा अभिजात काळच उभा केला. गीता पाटील यांच्या मार्दवयुक्त आवाजातील ‘ऐरणीच्या देवा तुला…’ हे मागणे मांडणारे मराठी बाजाचे गाणे मराठी जीवनसंस्कृतीचा स्वरालेख मांडून गेले. संजय अयाचित यांनी ‘तेरी आंखोंके सिवा…’ हे सुरम्य गीत सुरेल गाऊन मने जिंकली.  दरम्यानच, ह्या एकल गीतांना साथ दिली ती लातुरातील अतिशय सशक्त आणि दमदार अशा डॉ. सुधीर बनशेळकीकर, चंद्रशेखर पारशेट्टी, नागेश शिंदे ह्या किशोर, रफी, मुकेश ह्यांची हुबेहूब गाणी सादर करणाऱ्या बिनीच्या गायक कलावंतांसह गायिलेल्या युगुल गीतांनी. वृषाली कुलकर्णी यांच्यासोबतचे नागेश शिंदे यांचे ‘इक प्यार का नगमा है…’ चंद्रशेखर पारशेट्टी यांचे ‘ये दिल तुम बिन कही लगता नही…’ मने जिंकून गेले. डॉ. सुधीर बनशेळकीकर यांनी डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्यासह गायिलेले ‘इस मोड से जाते है…’, डॉ. विनया यांच्यासोबतचे ‘कोरा कागज था ये मन मेरा…’ आणि डॉ. आशा कोल्हे यांच्यासोबत गायिलेले ‘हजार राहें…’ ही गाणी धीरगंभीर भावुकतेची साक्ष ठरली. नागेश शिंदे डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्यासोबतच्या  ‘ओ शमा मुझे फूंक दे ..’ ह्या अनवट गीताने व डॉ. विनया बनशेळकीकर यांच्यासोबतच्या ‘हमसफर मेरे हमसफर ..’ ह्या गाण्यांनी कृष्णधवल काळातील रुपेरी सूर प्रकट केले. चंद्रशेखर पारशेट्टी यांनी गीता पाटील यांच्याबरोबर ‘बेखुदी मे सनम …’, डॉ. अनुजा कुलकर्णी यांच्यासोबत ‘तेरी बिंदिया रे…’, डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्या साथीत ‘जो वादा किया वो…’ व डॉ. देवश्री येरटे यांच्यासह ‘ऋत है मिलन की…’ ह्या ‘बांधणी’तल्या गाण्यांनी वातावरण रम्यतम केले. अजय पांडे यांनी डॉ. दीपाली अंबेकर यांच्यासह ‘याद किया दिल ने कहां हो तुम..’ ह्या, तर डॉ. राजश्री सावंत यांच्यासह ‘मी डोलकर, डोलकर…’ ह्या हेमंतकुमारांच्या हिंदी व मराठी गाण्यांनी अनेकांच्या आयुष्यातील जुन्या आठवणींच्या काळाला भावाहन केले. सचिन सोनवणे आणि गीता पाटील यांनी मात्र, ‘तुझे देखा तो ये जाना सनम..’ ह्या गाण्याने नव्या काळातील वळणावरच्या पिढीला प्रसन्न केले. टिपेचा माहोल केला तो रफी, किशोर आणि मुकेश यांच्या लतादीदीबरोबरच्या ‘देख के तुमको दिल डोला है…’ ह्या डॉ. सुधीर बनशेळकीकर, चंद्रशेखर पारशेट्टी आणि नागेश शिंदे ह्या ज्येष्ठ गायकांनी डॉ. देवश्री येरटे यांच्यासह सादर केलेल्या गाण्याने. चार दिग्गजांची हजेरी लावणाऱ्या ह्या गाण्याने मैफलीचे वातावरण तंतोतंत जुळलेल्या स्वरांतून हलके केले. डॉ. संतोष कुलकर्णी व वृषाली कुलकर्णी यांनी सादर केलेले ‘किसी राह मे …’ आणि डॉ. संतोष कुलकर्णी यांच्याबरोबर गायिलेले डॉ. देवश्री येरटे यांनी गायिलेले ‘नाम गुम जायेगा…’ ही गाणीही रसिकांची उत्तम दाद घेवून गेली. शेवटी डॉ. दीपाली अंबेकर यांच्या ‘अखेरचा हा तुला दंडवत ..’ ह्या गीताने ह्या श्रद्धांजलीपर स्वरमैफलीचा समर्पक समारोप झाला. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐन दिवशी कालवश झालेले शहरातील नामांकित व ज्येष्ठ डॉ. कमलाकरराव मैंदरकर यांना स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शहरातील ज्येष्ठ, जाणकार रसिकाग्रणी, उद्योजक मा. श्री. प्रभाकरराव उदगीरकर, प्रमुख पाहुणे मा. श्री. अभिजीतराव देशमुख, कार्यक्रमाचे प्रमुख संचालक डॉ. अशोक आरदवाड, सामाजिक कार्यकर्त्या व कलावती शुभदाताई रेड्डी, सूत्रधार अजयजी पांडे, प्रतिष्ठानचे समन्वयक प्रा. मनोहर कबाडे यांच्यासह डॉ. पी. के. शाह, रंगकर्मी शिरीष पोफळे आदी मान्यवरांनी लतादीदींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. प्रास्ताविकात सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानच्या कार्याची थोडक्यात ओळख करून देण्यात आली. मैफलीचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी यांनी केले. रंगमंच व्यवस्था व प्रकाशयोजना संजय अयाचित, प्रा. मनोहर कबाडे व सुधीर राजहंस यांनी, ध्वनीसंयोजन दत्ता तारणे यांनी तर कार्यक्रमाचे चित्रीकरण, ध्वनीमुद्रण व संकलन शिरीष कुलकर्णी व दत्ता पोतदार यांनी केले. हा कार्यक्रम दूरमाध्यमावरही प्रत्यक्ष प्रसारित करण्यात आला. मान्यवरांसह शहरातील रंगकर्मी व जाणकार रसिक डॉ. श्री. मुकुंद भिसे, डॉ. व्यंकट येलाले, श्री. बाळकृष्ण धायगुडे, विजयकुमार सुवर्णकार, प्रसाद उदगीरकर, रणजीत गांधी, भारत जाधव व मोठ्या संख्येने रसिकवर्ग उपस्थित होता. 

लतादीदींच्या असंख्य मराठी, हिंदी गाण्यांतून सर्व प्रकारच्या मनोहारी स्वराकारांचा अविष्कार घडवून सर्व गानकलावंतांनी आपल्या सश्रद्ध स्वरांनी ह्या गानकोकिळेला स्वरचिंब अशी स्वरांजली वाहिली आणि रसिकांनीही त्यात आपली साश्रू दाद मिसळून भावनांची जुगलबंदी पूर्ण केली. शेवटी, ‘तेरा जाना, दिल के अरमानोंका लुट जाना …’ ह्या गाण्याची ध्वनिमुद्रित सुरावट मनात घेवून श्रोतृवर्ग परतला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]