डिसेंबर आला तरीही कारखान्यांचे धुराडे बंदच
लातूर दि.२९– राज्यात ठिकठिकाणी ऊसाचे मोठ्या प्रमाणात गाळप सुरू असताना लातूर ग्रामीण विधानसभा कार्यक्षेत्रात येणाऱ्या साखर कारखान्यांनी अद्याप प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात केली नसल्याने पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकरी संकटात आला असून स्वतःला शेतकऱ्याचे कैवारी आणि सहकार महर्षी म्हणून घेणाऱ्यांना शेतकऱ्याची दया येणार तरी केव्हा असा प्रश्न भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी उपस्थित केला आहे.

वर्षभर स्वतःच्या मुला-बाळा प्रमाणे ऊसाच्या पिकाला सांभाळून, जोपासून स्वप्न बघणाऱ्या लातूर ग्रामीण मतदार संघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने कुठल्या ना कुठल्या संकटाचा मुकाबला करावाच लागत आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने ऊसाचे पीकही तसेच जोमात आले आहे.
राज्यातील अनेक भागात साखर कारखान्यांनी प्रत्यक्ष उसाचे गाळप सुरू केले. काही कारखान्याचे तर लाखात गाळप झाले मात्र लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या साखर कारखान्यांनी गाजावाजा करून मुळीचे कार्यक्रम घेतले दणक्यात भाषणे ठोकली पण अद्यापही प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात केली नाही. याबाबत संबंधीताकडे चौकशी केली असता कारखान्याचे काम सुरू असल्याचे कारण पुढं करत आहेत. सध्या सुरू असलेली कारखान्याची कामे गाळप सुरू होण्यापुर्वी करता आली असती मात्र तसे न करता जाणीवपुर्वक शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम केले जात असल्याचा आरोप आ. कराड यांनी केला.
ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये प्रत्यक्ष गाळप सुरू होणे अपेक्षित असताना डिसेंबर उजाडतोय तरीही गाळपाला सुरुवात झालेली नाही. कारखान्यांनी ऊस गाळपाचा अद्याप कार्यक्रम जाहीर केला नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला असून उशिरा कारखाने सुरू झाल्यास शेतकऱ्यांचेच नुकसान होणार. पैसेही उशिरा मिळणार आणि आर्थिक नुकसानही सहन करावे लागणार हे मात्र सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे असे सांगून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी अशी उपाधी लावून घेणारे आणि सहकार महर्षी म्हणून सन्मानित करून घेणारे लातूर ग्रामीण मधील साखर सम्राट स्वतःच्या ताब्यात असलेल्या कारखान्याचे प्रत्यक्ष गाळप सुरू करून शेतकऱ्यांना कधी न्याय देणार असा प्रश्न प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून उपस्थित केला आहे.