- कृषी नवतंत्रज्ञान, पीक लागवड पद्धतीविषयी मार्गदर्शन
- स्टॉलच्या माध्यमातून सुमारे ९४ लाखांची उलाढाल
लातूर, दि. १० ( वृत्तसेवा ) : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आयोजित जिल्हा कृषी महोत्सवाचा आज समारोप झाला. ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान झालेल्या कृषी महोत्सवात शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान विषयक परिसंवाद, चर्चासत्रे आणि प्रगतशील शेतकऱ्यांचे अनुभव कथन यामधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यानिमित्ताने कृषी तंत्रज्ञान, महिला बचतगट आणि शेतकरी उत्पादक कंपनीने उत्पादित केलेल्या वस्तूंचं स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलवर तीन दिवसांत सुमारे ९४ लाखांची उलाढाल झाली.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोयाबीन उत्पादकता वाढीसाठी सुधारीत तंत्रज्ञान या विषयावर सच्चिदानंद फड यांनी मार्गदर्शन केले. तसेच सोयाबीन पिकाचे विविध वाण व गुणधर्म याविषयी श्रीकृष्ण सदाशिव शिंदे, यांनी, तर सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व भविष्यातील आव्हाने या विषयावर कृषी विद्यावेत्ता अरूण गुट्टे यांनी मार्गदर्शन केले.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ऊस उत्पादक वाढीसाठीचे तंत्रज्ञान व विक्रमी ऊस उत्पादनाचा शेतकऱ्याचा स्वानुभव या सत्रात ब्रम्हदेव नवनाथ सरडे यांनी आपले अनुभव कथन केले. तसेच ऊस पिकातील सुधारित वाण व हंगामनिहाय पिक व्यवस्थापन याविषयी डॉ. भरत रासकर यांनी सखोल मार्गदर्शन केले आणि उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शेतमाल खरेदीदार विक्रेता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी बँक कर्ज व कृषी पायाभूत सुविधा अंतर्गत व्याज सवलत योजना एचडीएफसी बँकेचे क्षेत्रीय अधिकारी प्रमोद आळणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच सनदी लेखापाल भैरवनाथ मराठे यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांना कृषी व्यवसायाचा प्रकल्प प्रस्ताव तयार करणे व बँक कर्ज प्रकरणाकरिता प्रस्ताव तयार करण्याविषयी आवश्यक बाबींची माहिती दिली. लातूर जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी व पिक स्पर्धेमध्ये विजेते शेतकरी यांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन यथोचित सत्काराने कृषी महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी सेवानिवृत्त कृषि संचालक दिनकर जाधव अध्यक्षस्थानी होते. तसेच लातूर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सचिन डिग्रसे यांची उपस्थिती होती.

कृषी प्रदर्शनामध्ये एकूण १७७ स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. त्यामध्ये कृषी अवजारेबाबत १४ स्टॉल, विविध खाद्यपदार्थांचे १५ स्टॉल, कृषी निविष्ठा यांचे ४१ स्टॉल शेतकरी गट तथा उत्पादक कंपन्या यांचे ४० स्टॉल, विविध गृहपयोगी वस्तू यांचे ५० स्टॉल आणि विविध शासकिय विभाग यांचे १७ स्टॉल लावण्यात आलेले होते. त्याअंतर्गत सुमारे ९४ लाख रुपये उलाढाल झाली.




