वडवळ सेवा सोसायटीवर पाटील पॅनल चे वर्चस्व, ॲड. नंदागवळे यांच्या वटसिद्ध नागनाथ शेतकरी विकास पॅनलला मतदारांनी नाकारले
वडवळ नागनाथ,दि.२२ – येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या गटांने पुन्हा वर्चस्व कायम केले असुन एकुण तेरा जागेपैकी दोन जागा बिनविरोध तर उर्वरित आकरा जागेसाठी झालेल्या निवडणुकीत आकरा जागेवर दोनशे च्या वर मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आहे. प्रतिस्पर्धी असलेल्या ॲड.भिमाशंकर नंदागवळे यांच्या वटसिद्ध नागनाथ शेतकरी विकास पॅनलला मतदारांनी स्पष्ट नाकारले आहे. पाटील गटाने तेरा जागेपैकी तेरा जागा जिंकून सोसायटी पुन्हा आपल्या ताब्यात घेऊन वर्चस्व कायम केले आहे.
सेवा सोसायटीच्या एकूण तेरा जागांसाठी शुक्रवारी (दि.२०) रोजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेतील दोन केंद्रांवर सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान घेण्यात आले. यावेळी आठशे ४४ पैकी सहाशे ३५ मतदारांनी उत्साहाने व शांततेत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर निकाल काय लागणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. याचं केंद्रावर मतमोजणी सुरू होताच निकाल ऐकण्यासाठी शाळेच्या बाहेर नागरिकांनी एकच गर्दी केली. यावेळी आकरा जागेसाठी झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या “शेतकरी विकास पॅनलने” आकरा जागेवर दणदणीत विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली आहे तर ॲड.भिमाशंकर नंदागवळे यांच्या वटसिद्ध नागनाथ शेतकरी विकास पॅनलला मतदारांनी स्पष्ट नाकारले आहे.

या निवडणुकीतील एकुण ६०७ वैध मतापैकी विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते (कंसात) पुढील प्रमाणे आहेत. सर्वसाधारण खातेदार कर्जदार गट- अण्णासाहेब बापुराव पाटील (४३९), संभाजी वैजनाथ रेकुळगे (४२४), हनुमंत नारायण लवटे पाटील (४१५), अशोक त्र्यंबक बेंडके (४१३), उमाकांत बाबुराव आचवले (४०३), आजमत फकिर पटेल (४०२), वैजनाथ काशिनाथ नंदागवळे (३९४), शशीकांत भिमाशंकर चिंतलवार (३८१) इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गट – बाबुराव किशन भोजने (४१०), महिला प्रतिनिधी गट – ललिता बाबुराव भेटे (४४३), राजुबाई रोहीदास कसबे (४०४) अशी मते मिळाली आहेत. तर या निवडणुक प्रक्रिया दरम्यान अनुसूचित जाती जमाती गटातुन संतराम तात्याराव वाघमारे आणि भटक्या विमुक्त जाती जमाती गटातुन कोंडीबा नामदेव कराड हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन.एस.किलचे यांनी काम पाहिले. दरम्यान, निवडणूकीचा निकाल जाहीर होताच शेतकरी विकास पॅनलच्या कार्यकर्त्यानी येथील महात्मा बसवेश्वर चौकात फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला; सर्व विजयी उमेदवारांची ढोल ताशांच्या गजरात तसेच गुलालाची मुक्त उधळण करीत ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथाचे दर्शन घेऊन गावातून जल्लोषात विजयी मिरवणूक काढण्यात आली. शेवटी विजयी उमेदवार संभाजी रेकुळगे आणि पॅनल प्रमुख अण्णासाहेब पाटील यांनी मतदारांचे आभार मानले.