कारखाना सुरू करण्याच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याची उपमुख्यमंत्री व सहकारमंत्र्याची ग्वाही..
औसा – किल्लारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आ. अभिमन्यू पवार यांनी संकल्प केला आहे.(दि.,२५) सप्टेंबर रोजी किल्लारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. त्याप्रसंगी किल्लारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहणार असून या माध्यमातून किल्लारीचे गतवैभव पुन्हा मिळवून देऊ अशी ग्वाही आमदार अभिमन्यू पवार यांनी केली.
सेवा पंधरवडाचे औचित्य साधून (दि. २५)सप्टेंबर रोजी सभासदांच्या उपस्थितीत किल्लारी साखर कारखान्याचे नवीन भाग विक्री, अपूर्ण भाग पूर्ण करून घेणे व मयत सभासदांचे भाग वारसांना वर्ग करणे चा शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी आ. अभिमन्यू पवार बोलत होते. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, कारखाना समिती सदस्य पी.आर. फडणीस, एस.आर. नाईकवाडी, संताजी चालुक्य, भाजप औसा तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता,न. प. चे गटनेते सुनील उटगे,जि. प. सदस्य सुभाष पवार,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब मोरे, ज्ञानेश्वर वाकडे, संजय कुलकर्णी, गुंडाप्पा बिराजदार,किल्लारी कारखान्यांचे माजी संचालक युवराज बिराजदार, जयपाल भोसले, बंकट पाटील, दिपक चाबुकस्वार, महेश पाटील, प्रकाश पाटील, बाबासाहेब पाटील, ज्योती हालकुडे, जयश्री कांबळे, सहाय्यक उपनिबंधक शिंदे आदीसह शेतकरी सभासद मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी आ. अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की किल्लारी साखर कारखान्यावर अनेक खाजगी कारखानदारांचा डोळा होता. मात्र शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशातून उभा राहिलेल्या या कारखान्याला कवडीमोल किमतीत खाजगी कारखानदारांच्या घशात घालणे योग्य नाही.त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीने किल्लारी साखर कारखाना सुरू करण्याचा संकल्प केला आहे.हा कारखाना शेतकऱ्यांचाच राहणार आहे. कारखान्याच्या चिमणीतून निघणाऱ्या धुरातून शेतकऱ्यांच्या चुलीचा संबंध आहे. त्यामुळे हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहणार असून त्या माध्यमातून किल्लारीचे गतवैभव पुन्हा मिळवून देऊ या साखर कारखान्याची संपत्ती महाराष्ट्रातील इतर साखर कारखान्याच्या तुलनेत अधिक आहे.खाजगी साखर कारखानदाराकडून शेतकऱ्यांची होणारी लुट व कुचंबणा थांबवायची असेल तर साखर कारखाना शेतकऱ्यांचा राहिला पाहिजे. हा कारखाना सुरू करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे मात्र त्यामध्ये यश आले नाही.हा कारखाना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांची साथ महत्वाची असल्याचा उल्लेख करून तो सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीयमंत्री अमित शाहा यांची मदत घेऊ असे ते म्हणाले.

__________________________________
कारखाना सुरू करण्याच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याची उपमुख्यमंत्री व सहकारमंत्र्याची ग्वाही..
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून कारखाना सुरु करण्यासाठी शेतकरी जर २ पावले पुढे येत असतील तर सरकार ४ पावले पुढे येईल. कारखाना सुरु करण्याच्या प्रयत्नांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे अशी ग्वाही सभासद व ऊस उत्पादक शेतकर्यांना दिली. सहकारमंत्री अतुल सावे यांनीही व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून मेळाव्याला मार्गदर्शन केले.
माजी संचालकांकडून शेतकऱ्यांना जेवण व्यवस्था
गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या किल्लारी साखर कारखान्यावर बऱ्याच वर्षांनंतर सर्वसाधारण सभा झाली या अनुषंगाने किल्लारी साखर कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा होत असल्याने याठिकाणी लातूर व धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. याची व्यवस्था म्हणून या साखर कारखान्याचे माजी संचालक युवराज बिराजदार यांनी स्वखर्चाने सर्व शेतकरी सभासदांना जेवण व्यवस्था केली होती. त्यामुळे त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.




