Homeसाहित्यभाषा ही माणसांना जोडण्याचे काम करते, तोडण्याचे नाही : देवेंद्र भुजबळ

भाषा ही माणसांना जोडण्याचे काम करते, तोडण्याचे नाही : देवेंद्र भुजबळ

मुंबई : भाषा ही माणसांना जोडण्याचे माध्यम आहे. त्यामुळे भाषेवरून वाद निर्माण करण्यापेक्षा; आपल्या भाषेबरोबर आणखी एक भाषा शिकल्यास आपण दुसर्‍या एका जगाशी जोडल्या जातो .भाषा एकमेकांना जोडण्याचे काम करते, तोडण्याचे नाही, असे ठाम प्रतिपादन लेखक तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक देवेंद्र भुजबळ यांनी केले.

सुरेखा पाटील यांनी मराठीत लिहिलेल्या कवितांचा त्याच पानावर प्रतिभा बिर्जे यांनी हिंदी भाषेत केलेला अनुवाद असे स्वरुप असलेल्या कविता संग्रहामुळे मराठी आणि हिंदी भाषेला जोडणारा एक नवा सेतू निर्माण झाला आहे, असे गौरवोद्गार काढून, कवितांचा अनुवाद इतका सुरेख झाला आहे की त्या अनुवादित वाटत नाहीत, असे नमूद केले .शारदा प्रकाशनच्या वतीने कवयित्री सुरेखा पाटील आणि कवयित्री प्रतिभा बिर्जे यांच्या हिंदी-मराठी ‘तरंग’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन भुजबळ यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

पत्रकार व कवी मंगेश विश्वासराव यांनी हा सोहळा कौटुंबिक आणि साहित्यिक जिव्हाळ्याचा असल्याचे सांगितले. “या दोघी कवयित्री मैत्रिणी असाव्यात असे सुरुवातीला वाटले; मात्र त्या सख्या बहिणी असल्याचे नंतर समजले. माणूस सांगण्याचे काम कविता करते, असे ते म्हणाले. कविता सुरेल असण्यासाठी नातीही सुरेल असावी लागतात. या कुटुंबाचे जीवनच काव्यात रंगलेले आहे. ‘तरंग’मधून आयुष्याचे नवे तरंग अनुभवायला आणि शिकायला मिळतील, अशा आशा प्रकाशक प्रा. डॉ. संतोष राणे यांनी व्यक्त केली.

कवयित्री प्रा. प्रतिभा सराफ यांनी सुरेखा पाटील यांच्या साहित्यिक मैत्रीच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या लेखनाचे कौतुक केले. सुरेखा यांच्या मराठीतील शब्दांना हिंदीत ऐकण्याचा अनुभव वेगळाच आनंद देणारा असून त्यांच्या प्रत्येक कवितेत काहीतरी नवे सापडते, असे त्यांनी सांगितले.यावेळी सुप्रसिद्ध निवेदिका कीर्ती पाटसकर यांना कवयित्री प्रतिभा बिर्जे यांच्या स्मरणार्थ शारदा प्रकाशनतर्फे ‘स्वरप्रतिभा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.सुप्रसिद्ध निवेदक दिनेश अडावदकर आणि लंडनहून विशेष उपस्थित राहिलेल्या सुरेखा पाटील यांच्या कन्या ऋचा पाटील रायकर यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि दोन्ही कवयित्रींच्या कवितांचे खुमासदार सादरीकरण केले.त्यांच्या काव्य वाचनाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.‘तरंग’ हा काव्यसंग्रह सुरेखा पाटील यांच्या धाकट्या भगिनी शुभांगी प्रधान यांना अर्पण करण्यात आला आहे. कार्यक्रमाचा समारोप सुरेखा पाटील यांच्या मनोगत व आभार प्रदर्शनाने झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लंडनहून आलेले अंकुर रायकर तसेच पाटील कुटुंबीयांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमास साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments