माझी वारी.. माझा आनंद..!!
न चुकता वर्षानुवर्षे वारी करणाऱ्या एखाद्या वारकऱ्याला जवळून पाहिलंत का कधी? हाती भगवी पताका, कपाळी गंध, ओठी विठूनामाचा गजर आणि मनात त्या सावळ्याच्या भेटीची आस धरून ऊन-वारा-पाऊस या कशाचीही तमा न बाळगता मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचं समाधान कधी अनुभवलंय का जवळून?
तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे? तीर्थक्षेत्रांच कसं बाजारीकरण झाले आहे, ती गर्दी, मंदिरांमध्ये भाविकांची होणारी लूट, चेंगराचेंगरी, अस्वच्छता, चोऱ्यामाऱ्या, शिस्तीचा बडगा दाखवणारे पोलीस यावर यथेच्छ गप्पा मारणारे आपण कोण आहोत? तर प्रत्यक्ष वारीचा अनुभव न घेतलेलेच बहुतेक जण….
अहो एप्रिल-मे मध्ये उरकलेलं घरातलं एखादं लग्न कार्य, पावसामुळं सुरू असलेली शेतीची कामं, आषाढ-श्रावणामुळं हिरवा साज लेवून नटलेला निसर्ग, येणाऱ्या सणांच्या चाहूलीने उत्साहित झालेलं मन….. अशा प्रसन्न वातावरणात त्या विठूमाऊलीच्या भेटीनंतर, दर्शनानं धन्य होऊन पुढच्या वारी पर्यंत पुरणारी अनामिक सकारात्मक ऊर्जा घेऊन परत फिरतात ही मंडळी.. कोरोना मुळे सलग दुसऱ्यांदा या समस्त वारक-यांचा हिरमोड होणार……. असो.
मला वाटतं ही संधी आहे आपल्या सारख्या तमाम वारी न करणाऱ्या सर्वांसाठी.. पाप-पुण्य, भक्ती, मुक्ती, परमार्थ, मोक्ष असे क्लिष्ट शब्द न वापरता सोपं काय आहे हे बघूया…
घरातील ज्येष्ठ मंडळी आसुसलेले आहेत आपल्या शब्दांसाठी.. फक्त थोडा वेळ काढून त्यांच्याजवळ बसुन आपल्याच बालपणीच्या आठवणींमध्ये रमून जाऊया.. अनेक आप्तेष्टांच्या आठवणी काढून त्यांच्याशी गप्पा मारू या.. आपल्याच तरुण मुलांशी ताण देणा-या त्यांच्या शिक्षण, नोकरी बद्दल न बोलता नवीन आलेल्या वेब सिरीज किंवा एखाद्या वेगळ्या पिक्चर बद्दल बोलूया… त्यांच्या खांद्यावर हात ठेवून जाणवू द्या नं त्यांना की आपण आहोत त्यांच्यासोबत…त्यांच्यासाठी.. नेहमीच…! मोबाईल मध्ये बुडून गेलेल्या नातवंडांकडून शिका नं एखादा गेम, पहा त्यांच्यासोबत एखादा कार्टून शो.. करा नं बायकोच्या माहेरच्यांची विचारपूस… करून पहा एखादा फोन तिच्या आई-बाबांना तिच्याही नकळत… आता तुम्ही म्हणाल काय होणार आहे असं वागून?
अरे वागून तरी पहा…
आईवडिलांची सेवा करणा-या पुंडलिकासाठी युगानुयुगे विटेवर उभं राहणारा पांडुरंग तुमच्यावर वात्सल्याचा वर्षाव करेल, त्याच्यामागे रुसून उभी असलेली रखुमाई घरीच गालात हसलेली दिसेल आणि “विठू माझा लेकुरवाळा” अशी पोझ घेतलेला सर्व संत मंडळींना कडेवर-खांद्यावर घेऊन मिरवणारा तो परमात्मा पहायला कुठंही जायला कशाला पाहिजे? असे वाटायला लागेल…
वारीचा प्रत्यक्ष आनंद याहूनही खूप वेगळा, उच्च प्रतीचा असेल कदाचित… पण ते नाही जमणार ना आपल्याला.. मग हे करून पाहूया..
काय पटतंय ना ?
–शुभदा जोशी.