धानोऱ्यापासून राज्यस्तरापर्यंतचा सहकाराचा प्रवास;
संतोष सोमवंशी यांना ‘मराठवाडा सर्वोत्कृष्ट सहकार नेतृत्व’ पुरस्कार
महाराष्ट्राचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सन्मान; शेतकरीहिताच्या कार्याची राज्यस्तरावर दखल
लातूर प्रतिनिधी :लातूर जिल्ह्यातील धानोरा या छोट्याशा गावातून सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात करून आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणेचे उपसभापती संतोष सोमवंशी यांना ‘लोकशाही मराठी’ चॅनलच्या वतीने ‘मराठवाडा सर्वोत्कृष्ट सहकार नेतृत्व गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.गेल्या दोन ते तीन दशकांपासून सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या सोमवंशी यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. त्याचबरोबर औसा शेतकरी खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेले कार्य त्यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाची वेगळी ओळख निर्माण करणारे ठरले.औसा कृषी उत्पन्न बाजार समितीला नवी ओळख मिळवून देण्यासाठी, तसेच सहकार क्षेत्रात पारदर्शकता, गतिमानता आणि शेतकरीहिताला केंद्रस्थानी ठेवण्यासाठी सोमवंशी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
धानोरा गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज राज्यस्तरावरील सहकार क्षेत्रापर्यंत पोहोचला असून, त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.सहकार क्षेत्रासोबतच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही सोमवंशी यांनी जनसामान्यांशी असलेली नाळ कायम ठेवली आहे. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांची ‘हक्काचा लोकनेता’ अशी ओळख निर्माण झाली आहे.
यावेळी ‘लोकशाही मराठी’चे हेड जितेंद्र अक्कलदेवी यांनी संतोष सोमवंशी यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले, “धानोरा या छोट्याशा गावातून सुरू झालेला संतोष सोमवंशी यांचा उत्तुंग प्रवास आणि सहकार क्षेत्रातील भरीव कामगिरी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेत ‘सर्वोत्कृष्ट सहकार नेतृत्व गौरव पुरस्कार’ देताना आम्हाला विशेष अभिमान वाटत आहे.”मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झालेला हा सन्मान म्हणजे संतोष सोमवंशी यांच्या दीर्घ सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातील कार्याला मिळालेली राज्यस्तरीय पोचपावती मानली जात आहे. या पुरस्कारामुळे धानोरा, औसा आणि संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.





