आपल्या धर्मावर प्रेम करताना इतर धर्माचा आदर करणे गरजेचे : उज्जैन जगद्गुरु यांचे आवाहन..
औसा( प्रतिनिधी) : – संपूर्ण विश्वामध्ये प्रत्येक मानव जातीला आपला धर्म प्रिय असतो. आपल्या धर्माचे आचरण करीत असताना इतर धर्माचा आदर करणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. वीरशैव धर्माचे आचरण आणि परंपरा याला संपूर्ण जगामध्ये अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे, असे प्रतिपादन श्री उज्जैन पिठाचे जगदुरु डॉ. सिद्धलिंग राजदेशीकेंद्र, शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.

औसा हिरेमठ संस्थांनच्या ८६ व्या वार्षिक महोत्सवानिमित्त आयोजित धर्मसभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी धर्मपिठावर संस्थानचे मार्गदर्शक डॉ. श्री शांतवीर शिवाचार्य महाराज व पिठाधिपती बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांची उपस्थिती होती.
आपल्या अमृतवाणीतूनश्रीमदजगगुरु पुढे म्हणाले की, मानवाला मिळालेला जन्म हा अत्यंत महत्त्वाचा असून प्रत्येक जीवाने शिवाशी आपले नाते जोडण्यासाठी आदरपूर्वक गुरुभक्ती, वैराग्य आणि ज्ञान प्राप्तीचा मार्ग धरून आपल्या धर्मावर नितांत प्रेम करीत असताना इतर धर्माचा ही तितकाच आदर ठेवणे हेच खरे, वीरशैवाचे लक्षण होय. ८५ वर्षांपूर्वी लि. निरंजन शिवाचार्य महाराज यांनी आपल्या आध्यात्मिक ज्ञानसाधनेच्यामाध्यमातून हजारो शिष्यगण निर्माण केले, म्हणून त्यांची अखंड परंपरा आजतागायत सुरू आहे. प्रत्येक गुरूंनी सुद्धा आपल्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या शिक्षणाच्या दुःखाचे आणि चिंतेचे निवारण करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणे आवश्यक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

औसा हिरेमठ संस्थांनच्या माध्यमातून मागील ०८ दशकापासून सुरू असलेली धर्माची शिकवण ही कौतुकास पात्र ठरणारी आहे, म्हणून प्रत्येक माणूस हा चालते बोलते मंदिर आणि चालता बोलता देव होऊ शकेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दोन दिवस चालणाऱ्या इष्टलिंग महापूजा आणि सामूहिक शिवदीक्षा सोहळ्यात भाविक भक्तांनी श्रद्धापूर्वक सहभागी व्हावे असेही आवाहन श्रीक्षेत्र उज्जैन पिठाचे जगदुरु डॉ. सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले. हिरेमठ संस्थानच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा हिरेमठ संस्थान पुरस्कार महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व सन्मानपत्र देऊन करण्यात आला. धर्मसभेसाठी हजारो महिला पुरुष व युवक उपस्थित होते. यावेळी ष. ब्र. डॉ. १०८ श्री शांतवीर शिवाचार्य महाराज यांचेही आशिर्वचन झाले.





