व्यक्ती विशेष
…………………….
डॉ. बबन जोगदंड
प्रभारी संशोधन अधिकारी
माध्यम व प्रकाशन विभाग, यशदा, पुणे
…………..…………………..
पंकज चव्हाण
..….…………..
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. बाबासाहेबांनी शिक्षणाला प्रचंड महत्व दिले. त्यामुळेच शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा! हा मंत्र त्यांनी सर्वांना दिला. बाबासाहेबांनी दिलेला हा विचार प्रत्येक्ष कृतित उतरविण्यासाठी धडपडणारे अधिकारी म्हणजे डॉ. बबन जोगदंड होय. महाराष्ट्र शासनाची प्रशिक्षण क्षेत्रातील शिखर संस्था असणारी ‘ यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी अर्थात ‘यशदा’ या संस्थेमध्ये ते ‘प्रभारी संशोधन अधिकारी’ या पदावर कार्यरत आहेत. २००४ पासून आतापर्यंत या विभागात काम करताना त्यांनी अमुलाग्रह बदल घडवला. विभागात नाविन्यपूर्ण बदल केलेच पण विविध प्रकाशन आणि प्रशिक्षण सत्रांची निर्मिती करून महत्वाच्या विभागांचे प्रशिक्षणवर्गही सुरू केले. राज्यातील विविध शासकीय घटकांना संस्थेतील प्रशिक्षणाचा लाभ देण्यासाठी त्यांची असणारी तळमळ आणि संस्थेला सगळ्या घटकांशी जोडून ठेवण्यासाठी दहा ते सहा ही चाकोरीबद्ध कामाची त्यांनी मोडलेली चौकट त्यांच्यातील कार्यतत्पर अधिकाऱ्याची ओळख अधोरेखित करते.

आपल्यामध्ये असणारे अंगभूत कौशल्य आणि काही कामाचा भाग म्हणून निर्माण करावे लागणारे कौशल्य यांची सांगड घालून आपण ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेला पुरेपूर फायदा करून देणे ही वृत्ती सगळेच अधिकारी ठेवतात असे नाही. परंतू जोगदंड यांनी त्यांच्या जनसंपर्क अर्थात माणसं जोडण्याच्या हातोटीचा फायदा संस्थेला पुरेपूर करून दिला आहे. अर्थात हा चांगुलपणा जोगदंड यांच्याही वयैक्तिक आयुष्यात कामी आला आहे. आजच्या घडीला यशदामध्ये येणारी प्रशिक्षणार्थी जोगदंड सरांना भेटल्याशिवाय परतीचा प्रवास करत नाहीत. हे वास्तव आहे. त्यांच्या ह्या माणसं जोडण्याच्या प्रभावी कौशल्यामुळे त्यांच्यावर ‘द किंग ऑफ ह्युमन नेटवर्किंग’ अर्थात ‘मानवी संबंधाचा बादशहा’ हे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. दांडगा जनसंपर्क असणारा हा अवलिया यशदा या मानद संस्थेची ओळख बनला आहे.
डॉ. बबन जोगदंड हे यशदामध्ये माध्यम व प्रकाशन या विभागाचे प्रमुख या नात्याने काम पाहतात. या संस्थेतील त्यांचा १९ वर्षाचा प्रवास हा उत्तरोत्तर बहरणारा आहे. जोगदंड त्यांच्या खाजगी आयुष्यात यशस्वी झाले त्याच बरोबरीने त्यांनी नोकरीतही यश पादाक्रांत केले. जेंव्हा ते संशोधन अधिकारी या पदावर रुजू झाले तो काळ दोन दशकापूर्वीचा होता. त्यांच्या विभागाचे नावच प्रकाशन आणि माध्यम असल्याने या दोन क्षेत्राच्या कक्षा वृंदावायला हव्यात हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे यशदाच मुखपत्र असणारं ‘यशमंथन’ ह्या त्रैमासिकेचं कलर ले आऊट मध्ये रूपांतरण करण्यापासून त्यांचं दर्जेदार संपादन करण्यापर्यंत जोगदंड यांचं योगदान महत्वाचं आहे. विशेष म्हणजे यशदाचे तत्कालीन माध्यम व प्रकाशन केंद्राचे संचालक राजीव साबडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय माहिती आयोगाने ‘माहितीचा अधिकार कायद्याला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कॉपी टेबल बुक बनविण्याची जबाबदारी यशदावर दिली होती, हे आव्हानात्मक काम जोगदंड यांनी लिलया पेललं आणि ‘ट्रस्ट थ्रू ट्रान्सपरन्सी’ ह्या कॉपी टेबल बुकची निर्मिती केली. माहितीच्या अधिकारापासून घरपोच धान्य योजनेपर्यंत अनेक विषयांवरील दर्जेदार ग्रंथ जोगदंड यांच्या संकल्पनेतून तयार झाले. त्याच बरोबर शिपाई पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या प्रभावी लघुपटाची निर्मिती जोगदंड यांच्या कार्यकाळात झाली आहे. आज ह्या लघुपटांचा फायदा नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्यांसह सर्व यंत्रणाना होत आहे. यशदाच माध्यम आणि प्रकाशन विभाग कसा असायला हवा, त्याने काय काम केलं पाहिजे याची उत्तम बांधणी डॉ.जोगदंड यांनी करून ठेवली आहे. त्यामुळे यशदाचा हा विभाग सर्वांसाठीच लोकप्रिय आणि लोकोपयोगी ठरला आहे.

या विभागाच्या माध्यमातून डॉ. बबन जोगदंड यांनी आतापर्यंत शंभरहून अधिक प्रशिक्षण कार्यक्रम घेतले आहेत. त्यामध्ये ज्यांना यशदामध्ये प्रशिक्षणाची संधी मिळत नाही त्यांच्यासाठी त्यांनी प्रशिक्षण सुरू केले. उदा. पोलीस, शिक्षक , प्राध्यापक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, अल्पसंख्यांक वर्ग यांचा समावेश आहे. या प्रशिक्षणामुळे माध्यमांची प्रशिक्षणात आणि माध्यमांची प्रशासनामध्ये काय भूमिका आहे, हे लोकांना कळले. माध्यमं लोकांची मते परावर्तित करू शकतात आणि त्यामुळे माध्यमांचा प्रशासनात महत्त्वाचे स्थान आहे. लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्यामध्ये सुद्धा माध्यमांची महत्त्वाची भूमिका आहे. हा विचार प्रशिक्षणातून ठळकपणे डॉ.जोगदंड मांडत असतात.

महाराष्ट्रातील दांडगा जनसंपर्क असणारा अधिकारी म्हणून डॉ.जोगदंड यांची ओळख सर्वश्रुत आहे. पण डॉ.जोगदंड त्यांची ओळख सांगताना , नांदेड जिल्हातील हदगाव तालुक्यातील माळ सावरगाव अशी सांगतात. ज्या मातीने संघर्षाचे बळ दिले ते जन्मगाव त्यांच्यासाठी आजही प्रेरणादायी आहे. पुण्यासारख्या शहरात नोकरीला असताना, गावाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे सुट्टीला ते हमखास गावी असतात. एखादा माणूस स्वकर्तृत्ववाने गगनभरारी घेतो, पण पाय मात्र जमिनीशी इमान राखून असतात. डॉ.जोगदंड यांचं व्यक्तिमत्त्व हे अशाच स्वरूपाचं आहे. प्रशासन, पत्रकारिता, समाजकार्य, संघटन , इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रातील त्यांची मुशाफिरी अनुभवसंपन्न आहे. त्यांनी आतापर्यंत पंचवीस विषयात पदव्या संपादन केल्या असून पत्रकारितेमध्ये पीएचडी ही सर्वोच्च पदवी प्राप्त केली आहे. अधिकारी वर्गात सर्वाधिक पदव्या घेतल्याबद्दल त्यांच्या पदव्याची दखल ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये झाली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन पुण्यासारख्या ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवला आहे. त्यांची आत्तापर्यंत दहाहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आणखी काही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यांचा शिक्षण हा छंद असून ते दरवर्षी एक डिग्री घेत असतात. त्यांनी सहा विषयात एम. ए. केले व भविष्यात कमीत कमी पस्तीस विषयात पदव्या मिळवण्याचा त्यांचा संकल्प आहे .आतापर्यंत त्यांनी पंचवीस देशांचे दौरे केले असून ते सातत्याने चळवळीमध्ये सक्रिय असतात. अधिकाऱ्यांचे संघटन असलेल्या ‘महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम’ या संघटनेचेही ते राज्याचे सहसचिव म्हणून काम पाहतात. यशाच्या शिखरावर असतानाही अद्याप तरी अहंकाराची गोचडी त्यांना चिकटली नाही , हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
त्यांच्याविषयी माहिती व जनसंपर्क महासंचालनाचे माजी संचालक सुरेश वांदिले म्हणतात, ”बबन जोगदंड, हे एक भारदस्त नाव. ते इतकं की, यशदा सारख्या संस्थेलाही या नावानं वलय मिळवून दिलं._ कदाचित ही कुणाला किंवा बऱ्याच जणांना आतिशयोक्ती वाटेल. पण वस्तुस्थिती अशी आहे की, यशदामध्ये तथाकथित निम्नश्रेणीच्या पदावर असणारे बबन जोगदंडच हे महाराष्ट्राला ज्ञात आहेत. साधारणत: सचिव प्रधान सचिव ते अप्पर मुख्य सचिव या दर्जाचे अधिकारी या संस्थेचे प्रमुख पद भूषवतात. गेल्या दोन दशकातील किती अधिकाऱ्यांची अशी नावे सांगता येतील? मेंदुला खूप ताण दिला तरच एक दोन नावे आठवतीलही. पण पुढे काय? ही मंडळी इथे त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत होती. तो कार्यकाळ संपला नि तेही दुसऱ्या वाटेने निघून गेले. यापलिकडे फारसे हाती गवसत नाही. पण बबन जोगदंड या व्यक्तिने, त्याच्याकडे जी काही लहानशी जबाबदारी आहे, त्याची गुणवत्ता आणि दर्जा इतक्या उंचीवर नेऊन ठेवलाय की, यशदा संस्थेचा उल्लेख त्यांच्या नावाशिवाय अपूर्णच राहतो.नांदेड सारख्या तसे म्हंटले तर मागास गावातील, लहानपणी उपक्षेचे जीवन जगावी लागणारी एक व्यक्ती, त्या उपेक्षेचे कोणतेही भांडवल न करता आणि ओझे न बाळगता केवळ स्वत:च्या परिश्रमावर आणि नेहमीच दूरदृष्टीने बघण्याच्या सवयीमुळे पुण्यात आपले स्वत:चे स्थान निर्माण करते, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात येणाऱ्या मुलांसाठी त्यांच्या प्रेरणेने स्पर्धा परीक्षा केंद्र सुविधा केंद्र उभारते, प्रकाशन संस्था उभी राहते. त्यामाध्यमातून अनेक दर्जेदार ग्रंथांची निर्मिती- विक्री-वितरण सारे काही लिलया होते, हे सारे काही अकल्पित ठरावे. मात्र बबनरावांनी वयाची पन्नाशी गाठण्याच्या आधीच हे कर्तृत्व सिध्द केले. बबनरावांनी स्वत:चा एक ब्रँड तयार केला असल्याचे म्हंटल्यास वावगे ठरु नये. हा ब्रँड दर्जेदार आणि गुणवत्तेची हमी आणि खात्री देणारा आहे”.

डॉ.जोगदंड यांच्या कार्याविषयी भरभरून आणि प्रामाणिकपणे त्यांच्या कामाचे मूल्यमापन करणारी मंडळी राज्याच्या कानाकोपऱ्यात आहेत. सध्या यशदामध्ये ते प्रशिक्षकाची भूमिका बजावतात, समन्वयाची भूमिका बजावतात, अनेक प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्यासाठीही ते तत्पर असतात. अनेक विभागांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी संबंधित विभागाच्या सहकार्याने प्रशिक्षण मॉड्यूल तयार केले. त्याप्रमाणे अनेक विभागाचे, टू द पॉईंट प्रशिक्षणही होऊ शकले.

डॉ. बबन जोगदंड हे विद्यार्थिदशेपासून चळवळीमध्ये कार्यरत आहेत. पुण्यामध्ये त्यांनी २०१४ मध्ये स्वयंदीप करिअर ॲकॅडमी स्थापन करून गरीब व होतकरू मुलांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण सुरू केले आहे. या प्रशिक्षण केंद्रावरील अनेक विद्यार्थी आज अधिकारी म्हणून काम करतायत. सामाजिक क्षेत्रातील डॉ. जोगदंड यांचे योगदानही मोठे असून आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाप्रति कृतज्ञतेची भावना म्हणून दरवर्षी ते विविध सामाजिक उपक्रम राबवतात. आता स्वयंदीप करिअर ॲकॅडमीचे रूपांतर स्वयंदीप फाउंडेशन या संस्थेमध्ये केले असून या माध्यमातून दरवर्षी ते संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यात आयुष्य अर्पण केलेल्या व्यक्तीला स्वयंदीप सन्मान जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करतात.