संवाद
वस्तीवरील मुलांची ऊर्जा खूपच असते. त्यात ते खूप लहानपणीच कमावते होतात. आपल्या कमाईतील काही रक्कम ते आईला देतात आणि उरलेली स्वतःकडे ठेवतात. त्यातून आवडीचे खाद्य पदार्थ खाणे. पैसा जमा करून मोबाईल घेण्याचे वेड पण खूप असते.
त्यामानाने वस्तीतील मुलींचे आयुष्य खूपच अवघड. घरातील सगळीच कामं लहानपणापासून करावे लागतात. वस्तीबाहेर जायचे असेल तर आई सोबत असेल तर जाता येते. खास काही खाण्यासाठी बाहेर जाणे जवळपास अशक्यकच असते.

मी काही दिवसांपासून माझी कार घेऊन वस्तीवर जातोय. कार मध्ये बसून एका वस्तीहून दुसऱ्या वस्तीवर येण्याची मुलांची खूपच धडपड असते. आम्ही काही नियम केले आहेत. ज्याने आंघोळ केली आहे. अभ्यास केला आहे आणि चित्र रंगवले आहे त्यालाच कार मध्ये बसून माझ्यासोबत येता येईल. यातून खूप काही साधले. मुलं दररोज आंघोळ करायला लागली. स्वच्छ राहायची सवय लागली. आनंद शाळेतील संख्या आता भरपूर असते. दोन्ही वस्तीवरील मुलांची दोस्ती होत आहे.

आमचे हे सर्व फारच जोशात आणि आनंदात होत असे. यात मला एक लक्षात आले की मुलींना या आनंदात सहभागी होता येत नाही. त्या खरं तर खूप नीटनेटक्या राहतात. नियमितता मुलांच्या पेक्षा जास्त आहे. अभ्यासात आणि चित्र रंगवण्यात त्यांची प्रगती खुपच चांगली आहे. त्यांना मात्र या आनंदापासून दूर राहावे लागत होते.
त्यांची नाराजी मला कळत होती. माझ्याकडे काही उपाय पण नव्हता. मी माझी हतबलता त्यांना सांगितली.
आज दिवशी मी वस्तीवर पोहनचन्याच्या आधीच त्यांचे फोन सुरू झाले.
” दादा,आज आम्ही तुमच्या सोबत येणार. आम्ही आईची परवानगी घेतली आहे. तुमच्यासोबत आम्हाला आई कुठपणे पाठवू शकते.”
त्यांच्या बोलण्यात प्रचंड उत्साह होता. मी कार घेऊन वस्तीवर पोहनचलो तर सगळ्या एकदम खुशीत होत्या. आज जोरदार नट्टापट्टा पण केलेला होता.सकाळपासून त्या माझी येण्याची वाट पाहत होत्या. आज त्यांना घेऊन फकीर आणि गिरी वस्तीत जायचे ठरले. गिरी वस्तीतील सुनीता आता अफलातून चित्र काढते. तिची बहीण पूजा पण छान काढायला लागली आहे.
माझ्या छोट्या झेन एस्टीलो मध्ये 10 जणी मुली आणि एक छोटा मुलगा असे मस्त दाटीवाटीने बसली. काहींना डिकीत बसायचा विशेष आनंद असतो. आम्ही मस्तीत निघालो.

सुनीताने काढलेली चित्र पाहून मुली अचंबित झाल्या. सुनीताने तिचे घर त्या सर्वांना दाखवले व छान चित्र काढायचे कसे हे पण शिकवले. मुलींच्या चेहऱ्यावर खूप काही मिळाल्याचे समाधान आणि आनंद होता. एकदम भारी मूड मध्ये आम्ही निघालो. सर्वांना वडापाव खाण्याची इच्छा झाली. एकही वडापावचा गाडा आज चालू नव्हता.
” आमचे नशीबच खराब आहे दादा !!”
लक्ष्मी नाराज होऊन बोलली. आम्ही कुल्फी खावी म्हणून गाडी थांबवली तर आज कुल्फी पण संपली होती. आता अंधार पण पडत होता. परत निघण्याशिवाय गत्यंतर नव्हते.मुली थोड्या नाराजच झाल्या. त्याही पेक्षा मला थोडं जास्तच वाईट वाटत होते. शेवटी यशवंतराव चौकात एका हॉटेलमध्ये पाव दिसले पण वडे नव्हते. वडे तयार करावे लागणार होते. वेळ होईल म्हणून मी नको म्हणलो. छोटी अस्मिता म्हणालो,
“घेऊ न दादा ! तुमच्या सोबत आम्ही आहेत म्हणजे आमची आई काळजी नाही करणार !! “
आम्ही मस्त वडापाववर ताव मारला व एकदम खुशीत वस्तीकडे निघालो. आज प्रत्येक मुलीला मनातून वाटत होतं,
आज मै उप्पर , आसाम नीचे !!
प्रचंड आनंदाने जोरदार आवाज करत त्यांनी वस्ती हादरून टाकली व सगळ्यांना मोठ्या आवाजात आजचा वृत्तांत सांगितला. किती छोटी गोष्ट पण त्यांचा आनंद आज गगनात मावत नव्हता !!

प्रसाद चिक्षे