36.3 C
Pune
Wednesday, May 13, 2026
Home महत्त्वाच्या घडामोडी *संमेलनाध्यक्ष जयंत नारळीकर*

*संमेलनाध्यक्ष जयंत नारळीकर*

0
310

मराठी साहित्याला विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनाची गरज : डॉ.नारळीकर
कुसुमाग्रज साहित्यनगरी (भुजबळ नॉलेज सिटी) नाशिक : ‘मराठी आणि जगभरातील साहित्य समृद्ध व मानवी कल्याणच्या दृष्टीने परिपूर्ण होण्यासाठी साहित्यिक व रसिक यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणे गरजेचे आहे.’ असे प्रतिपादन भारतातील खगोलशास्त्रज्ञ व विज्ञानकथा, साहित्य लेखक डॉ. जयंत नारळीकर यांनी ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना केले. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी ध्वनीचित्रफितीद्वारे साहित्य रसिकांशी संवाद साधला. यावेळी देशाच्या विविध भागातून आलेले मान्यवर साहित्यिक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या भाषणात डॉ. नारळीकर यांनी साहित्य व विज्ञान यांच्यातील नाते उलगडून दाखवले. मराठीचे अपूर्णत्व सर्वात जास्त विज्ञान साहित्याच्या बाबतीत जाणवते. विज्ञानाची गरुडझेप तंत्रज्ञानाच्या रूपाने मानवी जीवन अधिक प्रगत, विकसित करायला कारणीभूत ठरली आहे या सर्वांचे प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.
अभिजात दर्जा मिळावा : मुख्यमंत्री यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. मराठी भाषा ही अभिजात व्हावी यासाठी मराठी जनांनी एक व्हावे, त्यासाठी राष्ट्रपतींना पत्र पाठवावे असे आवाहन त्यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाईन मार्गदर्शन केले. उदघाटन प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
माजी आमदार हेमंत टकले यांनी खुमासदार सूत्रसंचालन केले.
प्रारंभी पं. मकरंद हिंगणे व सहकाऱ्यानी कुसुमाग्रज यांचे ‘गर्जा जयजयकार’हे गीत सादर केले व संमेलन मंडपात चैतन्य निर्माण झाले.
: यावेळी मिलिंद गांधी व संगीतकार संजय गीते यांनी तयार केलेले संमेलनगीत सादर करण्यात आले. प्रकृतीच्या कारणाने माजी संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो उपस्थित नव्हते.व्यासपीठावर स्वागताध्यक्ष, नाशिकचे पालकमंत्री छगनराव भुजबळ, माजी संमेलनाध्यक्ष उत्तमराव कांबळे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, सदानंद मोरे, श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख, सयाजी संस्थानच्या राजमाता शुभांगीनी गायकवाड,अ. भा. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, ना. दादा भुसे, माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, उद्योगपती दीपक चांदे, मुकुंद कुलकर्णी, शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, प्राचार्य प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
संमेलनाचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकूर यांनी मान्यवरांचे शुभेच्छा संदेश वाचून दाखवले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, ना.अमित देशमुख, लेखिका व उद्योजिका सुधा मूर्ती यांनी संमेलनास दिलेल्या शुभेच्छा त्यांनी वाचून दाखवल्या. शुभांगीनी राजे गायकवाड व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ग्रंथपूजन करण्यात आले.
लोकशाही बळकट होवो : ना.भुजबळ

स्वागताध्यक्ष ना.छगन भुजबळ यांनी नाशिकच्या साहित्य परंपरेचा सविस्तर गौरवपूर्वक उल्लेख करून साहित्य संमेलनाच्या इतिहासात नाशिकचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, असे सांगितले. मराठी भाषा अभिजात असून तिला २२५० वर्षांचा इतिहास असल्याचे शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखित पोथ्यांचे शेकडो पुरावे प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने त्यांच्या अहवालात दिले आहेत. हा अहवाल भारत सरकारने नेमलेल्या सर्व भाषा तज्ज्ञांनी तपासला व एकमताने तो उचलून धरला. मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा ही त्यांची शिफारस गेली ७ वर्षे केंद्र सरकारकडे पडून आहे. असे ते म्हणाले. महात्मा फुले यांचा संदर्भ देऊन इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो त्याप्रमाणे इडा पीडा टळो व लोकशाही बळकट होवो असे ना.भुजबळ म्हणाले.
ठाले पाटील यांची खंत
साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिकचे साहित्य संमेलन
रसरसलेल्या वातावरणात उत्साहात दिमाखात संपन्न होत आहे याबद्दल आनंद व्यक्त केला. डॉ.नारळीकर हे मागील संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याप्रमाणे नाशिकला येऊ शकले असते तर चांगले झाले असते अशी भावना व्यक्त करून महामंडळाच्या घटनेत बदल करावा लागू नये. संमेलनाध्यक्ष काळजीपूर्वक निवडण्याचा सल्ला देखिल त्यानी दिला. संमेलनातील कार्यक्रमांची माहिती देऊन प्रतिसाद देण्याचे तसेच पुस्तक प्रदर्शनातील ग्रंथ विकत घ्या असे आवाहन केले. संमेलन समाजाचे आहे त्यास वेठीस धरू नये असा इशाराही त्यांनी दिला. नाशिकचे संमेलन वेठीस धरण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल त्यानी खेद व्यक्त केला.
सत्कार मागून मिळत नाही, मिळवावा लागतो असा इशारा त्यांनी संबंधित लेखक शरणकुमार लिंबाळे यांना दिला.
साहित्य संमेलन हा चमत्कार : विश्वास पाटील
नाशिकचे संमेलन हा चमत्कार असून बदाबदा पाऊस झाला असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर संमेलन करून सिंहाचा वाटा नव्हे तर वाघाचे काम त्यांनी दाखवून दिले. असे प्रतिपादन यावेळी उदघाटक प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी केले. तात्यासाहेब शिरवाडकर यांनी शेक्सपिअरच्या समाधीवर चांदीची फुले उधळली. तात्यासाहेब हे माझे अजिंठा व ,वसंतराव कानेटकर हे माझे वेरूळ असा भावपूर्ण उल्लेख करून त्यांनी सर्वांची मने जिंकली. नांदूर शिंगोटे येथील भागोजी नाईक याने ब्रिटिशांशी झुंज दिली! अशी आठवण सांगून त्यांनी मंत्रमुग्ध केले. श्रीपाद अमृत डांगे, शरद जोशी अशा अनेकांचा उल्लेख करून यारी आणि दिलदारीबद्दल त्यांनी नाशिककरांचे कौतुक केले.
: यूपीतून येऊन रामाने नाशिकमध्ये झोपडे बांधले, शाहीर परशुराम यांचे मंदिर नाशिकमध्ये आहे, वामनदादा कर्डक, बाबुराव बागुल यांच्या कर्तृत्वाचा गौरव त्यांनी केला.
शिवरायांचे राज्य अमेरिकन राज्यपूर्वी २०० वर्षे होते त्यामुळे स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्याएवढे शिवस्मारक तयार करण्यासापेक्षा गड किल्ले यांचे जतन करा असा सल्ला त्यांनी दिला. शहाजी राजांच्या ताब्यात नगर, पुणे नाशिक भागातील ६५ किल्ले होते. असे सांगून त्याकाळातील गौरवपूर्ण इतिहासाचा आढावा त्यांनी घेतला. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये सांगून महाराष्ट्रासाठी ते लढले! असे विश्वास पाटील म्हणाले.
तामिळ व कन्नड भाषेला अभिजात दर्जा दिला जात असेल तर तो मराठीला मिळायलाच हवा! ग्रंथालय कर्मचाऱ्यांना पुरेसे वेतन मिळाले पाहिजे! जात,धर्माच्या ऐवजी भाषेच्या नावावर नेते मत का मागत नाहीत असा सवाल त्यांनी केला. जगण्यासाठी माझी कविता कधीच नव्हती या कुसुमाग्रज यांच्या कवितेचा उल्लेख करून त्यांनी संमेलन आयोजक छगन भुजबळ यांच्या खमक्या स्वभावाचे नेते असताना मराठी कधी मरणार नाही! असे सांगून आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा समाचार त्यांनी घेतला.
यावेळी संमेलन प्रातिनिधिक स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. त्याबद्दल संपादक स्वानंद बेदरकर यांनी माहिती दिली.

गीतकार जावेद अख्तर म्हणाले, हजेरी लावण्यात गैर नाही :,जावेद अख्तर
पेशव्यांच्या दरबारात संत,कवी येत तसे शायर देखिल येत! त्यामुळे मराठीच्या दरबारात हजेरी लावण्यात गैर नाही. म्हणून मी येथे आलो. भाषा संपर्क साधन आहे तशी भिंत उभी करणारी देखिल आहे. शांतता कोर्ट चालू आहे या नाटकामुळे विजय तेंडुलकर ,पुलं यांचा परिचय झाला. अच्युत वझे, आनंद जोशी यांच्यामुळे मराठी साहित्य समजले. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज यांनी ज्ञान सामान्य माणसापर्यंत पोहोचवले! राजे,महाराज, जहागीरदार यांच्यापेक्षा साहित्यिक श्रेष्ठ आहेत.इंग्लंडमध्ये २०० वर्षापूर्वी पुरुषांचे नाव घेऊन लिहिणाऱ्या लेखिका होत्या तर ८०० वर्षांपूर्वी मराठीत मुक्ताबाईसारख्या महिलांनी सहित्य लेखन केले ही गौरवाची गोष्ट आहे!
साहित्यिकाला कोणा पक्षाची बांधिलकी असायला नको! प्रेम, फुलांची कहाणी लिहिण्यापेक्षा प्रगतिशील साहित्य लिहिण्याची प्रेरणा १९३६ च्या साहित्यिकांनी घेतली होती. , जो बात काहकर दरते है सब इतनी अंधेरी रात कभी न थी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]