तब्बल बावीस वर्षांनी महालक्ष्मी /, गौरीसाठी गावी आलो आहे … आपल्या गौरवांकीत परंपरेच्या पोटात अनेक पिढ्याचं संचित असल्यामुळे या बद्दल कमालीची श्रद्धा गावागावात अजूनही दिसते… ही परंपरा नेमकी कधी सुरु झाली..
हा सण आपल्याकडे का आणि कशासाठी असा प्रश्न येतो तेंव्हा त्याचा शोध कोणत्या तरी गौरी महात्म्य वगैरे अशा पोथ्यात आपण शोधतो …. ज्याची खोली एक दंत कथेत अडकलेली असते. खरच यातील तथ्यांश काय असतील हे शोधल्यास हाती जे लागत ते अधिक मानवी वंशाच्या इतिहासासी मेळ खाणारे असते …पोथी पुराणातून बाहेर पडून अधिक डोळस करणार सत्य आपल्या समोर उभ राहतं ते असं …

सिंधु नदीच्या खो-यात मानवी समुदाय सर्वप्रथम नांदला त्याच्या खुणा “हडप्पा – मोहंजदरो ” मध्ये मोठ्या प्रमाणात सापडल्या …तो काळ आहे इ.स.पूर्व तीन हजार वर्षापूर्वीचा …त्याकाळातला समृध्द काळ,जगाच्या इतर भागातला या संस्कृतीबरोबरचा व्यापार त्यामुळे ग्रीक ,रोमन ,इजिप्त ,परशीयन प्राचीन संस्कृतीत आपल्या संस्कृतिच्या देवाण घेवाणीच्या खुणा आढळतात. सिंधु संस्कृतीत देव देवता नव्हत्या मात्र वृषभ (बैल ) आणि मातृ पुजा , गोत्र पुजा ( पितृ पुजन म्हणजेच पितृ पंधरवाडा अर्थात महाळ महिना ) जो गौरी पुजना नंतर काही दिवसानी होतो. गौरीपुजन म्हणजेच मातृपुजन ,भूदेवी पुजन हे श्रमण संस्कृतीचे मानबिंदु होते . ती परंपरा काही कर्मकांड घेवून आजही पाळली जाते.

आजची गौरी हा सिंधु परंपरेचा थोर वारसा आहे. सप्तसिंधु ( सिंधु ,सरस्वती,गंगा,यमुना , सतलज ,रावी, झेलम ) …सात आसरा पुजन हे नदी आणि जल याच्या प्रती असलेली श्रध्दा ….एकूण प्राचीन कृषी परंपरा ही ज्या ज्या गोष्टी थेट लाभ देणा-या होत्या त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी होती. त्याचे काही धागे आपण तसेच ठेवले आहेत फक्त आपल्या त्यामागची पार्श्वभूमी माहित नसल्यामुळे परंपरेच्या नावाखाली आपण ते जपतो. त्यात डोळस श्रध्दा असाव्यात म्हणून हा लिहण्याचा प्रपंच …!!

@ युवराज पाटील
(लेखक हे लातूर जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत )




