जलसमृद्ध औसा अभियानांतर्गत औसा तालुक्यातील ७ गावांत व्यापक आरोग्य अभियानाचा शुभारंभ
१५ मे रोजी रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आरोग्य शिबिरांचा शुभारंभ
औसा- जलसमृद्ध अभियान राबविण्यात येत असलेल्या तांबरवाडी, फत्तेपूर, पारधेवाडी, महादेववाडी, कवळी, हिप्परगा आणि दावतपूर या सात गावांमध्ये आता नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी “एकात्मिक विकास अभियान” राबविण्यात येणार असून, विविध शासकीय योजना आणि आरोग्य सुविधा एकत्रितपणे गावपातळीवर पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या अभियानांतर्गत १५ मे रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते नेत्र तपासणी शिबिर तसेच महिलांसाठी कॅन्सर तपासणी शिबिराचा शुभारंभ होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा गावातच उपलब्ध करून देणे आणि कायमस्वरूपी आरोग्य जनजागृती निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.या पार्श्वभूमीवर शनिवार दि. ९ मे रोजी औसा येथे आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित अधिकारी, वैद्यकीय यंत्रणा आणि आरोग्य विभागासोबत सविस्तर बैठक घेऊन नियोजनाचा आढावा घेण्यात आला.

बैठकीत गावागावांत आरोग्यविषयक जनजागृती अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला.अभियानांतर्गत प्रत्येक नागरिकासाठी डिजिटल आरोग्य कार्ड तयार करण्यात येणार असून, ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १० लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार देणारी वयवंदना योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. महिलांसाठी तोंड, स्तन आणि गर्भाशय कॅन्सर तपासणी, किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन उपलब्धता, कुपोषणमुक्तीसाठी जनजागृती, शाळा व अंगणवाड्यांमधील पौष्टिक आहार तपासणी, व्यसनमुक्ती पथके, दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप, TB मुक्त गाव अभियान, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, एकल महिलांची आरोग्य तपासणी तसेच सर्व महिलांना रक्तगट कार्ड वितरण असे अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.निरोगी गाव, सक्षम कुटुंब आणि आरोग्यदायी समाज घडविण्याच्या दिशेने हे अभियान महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या बैठकीस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रेवनाथ देवणीकर, सदाशिव जोगदंड, वैद्यकीय अधिकारी, CHO, ANM, आशा कार्यकर्त्या तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




