Homeसांस्कृतिकदशमान गोसावी समाजाचा 'पंचसूत्री कार्यक्रम' संपन्न

दशमान गोसावी समाजाचा ‘पंचसूत्री कार्यक्रम’ संपन्न

‘वारकरी संप्रदायाचे संस्कार जपत समाजातील गुणवंतांना बळ देणे हीच खरी प्रगती

लातूरचा हा आदर्श पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवावा’ -ज्येष्ठ मार्गदर्शक ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर*

लातूर येथे दशनाम गोसावी समाजाचा ‘पंचसुत्री कार्यक्रम’ आणि भव्य गुणवंत सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न*

गोसावी समाजाने आता मागणाऱ्यांच्या यादीत नाही, तर देणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट व्हावे — ह.भ.प. अविनाश भारती महाराज*

गोसावी समाजासाठी आयुष्यभर लढत राहू -धर्मवीर भारती*

समाजाच्या कोणत्याही कार्यासाठी आपण सदैव तत्पर -व्यंकटेश पुरी*

लातूर, दि.02.08.2026..”साधु-संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या लातूरच्या पवित्र परिसरात वारकरी संप्रदायाचे संस्कार आणि विचारांची मोठी देणगी लाभली आहे. समाजातील गुणवंत, यशवंत, सेवागौरव आणि आदर्श व्यक्तींचा सन्मान करणे हे अत्यंत मोठे आणि आदर्श कार्य आहे. गुणवंतांच्या पाठीवर योग्य वेळी कौतुकाची थाप देणे हे केवळ एक कौतुक नाही, तर ती विद्यार्थ्यांच्या गुणांची सर्वांगीण प्रगती करणारी ऊर्जा ठरते. या कौतुकामुळे विद्यार्थ्यांना जीवनात पुढे जाण्याची नवी प्रेरणा मिळेल आणि समाजात एकमेकांबद्दल प्रेमाची भावना वाढीस लागेल. शैक्षणिक क्षेत्रातील ‘लातूर पॅटर्न’ जसा जगभर प्रसिद्ध आहे, अगदी त्याच धर्तीवर लातूरच्या या ‘गोसावी वुमन्स विंगचा पॅटर्न’ संपूर्ण महाराष्ट्रात राबवला गेला पाहिजे. जेव्हा प्रत्येक जिल्ह्यात महिला अशा पद्धतीने प्रामाणिक, सक्षम आणि संघटित कार्य करतील, तेव्हा समाजाची प्रगती निश्चितच होणार यात शंका नाही,” असे भावपूर्ण व दिशादर्शक विचार समाजातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मार्गदर्शक तथा कार्यक्रमाचे उद्घाटक ह.भ.प. श्री. महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी व्यक्त केले.

दशनाम गोसावी समाज, लातूर आणि गोसावी वुमन्स विंग आणि भारती फाऊंडेशन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पंचसुत्री कार्यक्रमांतर्गत भव्य सत्कार सोहळ्याचे शानदार उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते. स्थानिक भालचंद्र ब्लड बँक सभागृहात पार दिलेल्या या सोहळ्याचे अध्यक्षस्थान परभणीचे श्री. स्वप्निल भैया भारती यांनी भूषवले.

उद्घाटक ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी आपल्या मार्गदर्शनात पुढे बोलताना, लातूरचे सुप्रसिद्ध बिल्डर धर्मवीर भारती यांच्या नि:स्वार्थी समाजकार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, धर्मवीर भारती यांच्या माध्यमातून हे मोठे समाजकार्य आज आकारास आले असून ते अतिशय प्रामाणिकपणे सुरू आहे. या समाज प्रबोधनाच्या पवित्र कार्याला आणि प्रतिष्ठानच्या वाढीला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा आहेत, अशा शब्दात त्यांनी ईश्वराकडे प्रार्थना केली.यानंतर मुख्य वक्ते ह.भ.प. श्री. अविनाशजी भारती महाराज यांनी आपल्या अमोघ व प्रबोधनपर वाणीतून गोसावी समाजाला अंतर्मुख व्हायला लावणारा अत्यंत परखड संदेश दिला.

ते म्हणाले की, गोसावी समाजाने आता केवळ मागणाऱ्यांच्या यादीत न राहता, स्वतःला शिक्षण, उद्योग आणि उच्च संस्कारांच्या जोरावर इतके सक्षम करावे की समाजाने देणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट झाले पाहिजे. स्त्रियांचा सन्मान आणि योग्य संस्कारांची जपणूक हीच कोणत्याही जागृत धर्म संस्कृतीची खरी विचारसरणी आहे. ‘देश सेवा हीच खरी ईश्वर सेवा’ असून गोसावी समाजाची नाळ ही माऊली चाकरवाडीकरांशी जोडलेली आहे, ते वारकरी संप्रदायाचे सच्चे अनुयायी आहेत. कीर्तनकारांचा असा भव्य सोहळा लातूरमध्ये संपन्न होत आहे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, असे सांगत त्यांनी नामदेव महाराजांच्या कार्याचाही विशेष गौरव केला.

‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, गोसावी समाजात कीर्तनकार आणि योगी पुरुषांची मोठी परंपरा लाभलेली आहे, जी गावोगावी जाऊन समाजाचे प्रबोधन करण्याचे पवित्र कार्य अविरतपणे करत आहे. आता केवळ त्रिसूत्री आणि पंचसूत्रीवर बोलण्यापेक्षा सर्व गोसावी बांधवांनी स्वतःमधील मतभेद विसरून एकत्र येत ‘एकसूत्री’ होण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. आजच्या काळात आपल्या समाजाच्या मुलांना पूजा कशी करावी हे सांगायची वेळ येणे ही मोठी शोकांतिका असून मुलांना योग्य संस्कार देणे हे आपले प्रथम कर्तव्य मानले पाहिजे. आपण सरसकट कोणालाही गुरू मानतो या प्रवृत्तीवर जळजळीत प्रहार करत महाराज म्हणाले की, ‘सर्वांचा गुरू म्हणजे गोसावी’ या आपल्या मूळ संकल्पनेवर समाजाने आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे माझ्या समाजासाठी प्रामाणिक कार्य करत राहणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य असले पाहिजे. शेवटी, छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श देशकार्य डोळ्यांसमोर ठेवून धर्म म्हणजे पाखंड नव्हे, तर दुसऱ्या धर्माचा आणि व्यक्तीचा सन्मान करणे होय, हा मोलाचा संदेश त्यांनी दिला.

या भव्य सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाच्या प्रारंभी लातूरचे सुप्रसिद्ध बिल्डर धर्मवीर भारती यांनी अत्यंत प्रभावी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी, गोसावी समाज एकसंघ करण्यासाठी आपण सदैव बांधिल आहोत, अशी ठाम ग्वाही दिली. हा भव्य पंचसूत्री सोहोळा आयोजित करण्यामागचे मुख्य प्रयोजन स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, समाजातील घटकांचा यथोचित सन्मान करणे आणि युवा पिढीतील गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी व प्रगतीसाठी मोठे प्रोत्साहन मिळावे, हाच या सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे. याच वेळी त्यांनी लातूरमध्ये कार्यरत असलेल्या महिला संघटन आणि गोसावी वुमन्स विंगच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करत महिला शक्तीचे कौतुक केले. त्याचबरोबर दशनाम गोसावी समाजाचे व्यंकटेश पुरी यांनीही समाज बांधवांना दशनाम गोसावी समाज हा हिंदू धर्म प्रचारक, प्रसारक असल्याचे सांगून समाजाच्या कोणत्याही कार्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत. आपला हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ गुरू म्हणून आपला सन्मान केला जातो, हे पावित्र्य आपण जपले पहिजे असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकानंतर आपले मनोगत व्यक्त करताना गोसावी वुमन्स विंगच्या सुरेखा धर्मवीर भारती म्हणाल्या की, वुमन्स विंगच्या माध्यमातून आज समाज संघटित करण्याचे मोठे काम सुरू असून, हे कार्य कायम राहिला पाहिजे. आज तरुण युवा पिढीला म्हणजेच ‘नेक्स्ट जनरेशन’ला सोबत घेऊन जाणे आणि त्यांना योग्य व्यासपीठ देणे ही काळाची गरज आहे. युवा पिढीला आणि महिलांना प्रोत्साहन दिले तरच समाजाचे भविष्य उज्ज्वल असेल, म्हणूनच आजच्या सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला आहे. गोसावी समाजाच्या प्रगतीसाठी आम्ही आयुष्यभर लढत राहू, मात्र समाज चालवताना केवळ आधार बनण्यापेक्षा सर्वांनी सोबत राहणे आवश्यक असून प्रत्येक अडचणीला तोंड देऊन महिलांना सक्षम करण्यासाठी समाजाने पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.सोहळ्यादरम्यान उपस्थित सर्वच मान्यवरांनी लातूरचे धर्मवीर भारती यांच्या नि:स्वार्थी समाजसेवेचा गौरव केला. धर्मवीर भारती जेव्हा एखादे कार्य हाती घेतात, तेव्हा तो सोहळा नेहमीच भव्यदिव्य आणि आदर्श ठरतो, असा सूर उमटला. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता, अत्यंत शांतपणे आणि एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला कळू न देता निरंतर समाजसेवा करण्याची त्यांची वृत्ती इतर कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आली. तसेच संकटकाल असो वा शैक्षणिक मदत, समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या भारतीय फाउंडेशनच्या कार्याचाही यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला.

याप्रसंगी उपस्थित इतर प्रमुख पाहुण्यांनीही आपले विचार मांडले. नाशिकचे श्री. अनुप गोसावी यांनी लातूरची विंग अतिशय उत्तम काम करत असल्याबद्दल महिला विंगचा विशेष गौरव केला तर श्री. मुन्ना गिरी गोसावी (पंढरपूर) यांनी सर्वांना सामावून घेतल्याशिवाय समाज यशस्वी होत नाही असे सांगत, ग्रामीण भागात जागृतीची मोठी गरज असल्याचे स्पष्ट केले. पुणे येथील श्री. सूर्यकांत गिरी गोसावी यांनी तरुणांना व्यवसायाच्या संधी मिळवून देण्यासाठी आणि शहरी व ग्रामीण भागातील समाज एकत्र आणण्यासाठी धर्मवीर भारती व त्यांच्या टीमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

श्री. ओमप्रकाश गिरी (बीड) यांनी समाजात ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी समाजासाठी वेळ द्यावा आणि सर्वांनी एकत्रित येऊन अन्याय-अत्याचाराचा विरोध करावा, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला श्री. सुखदेव गिरी (कोल्हापूर) आणि श्री. गणेश पुरी (नागपूर) यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यामध्ये समाजातील निवृत्त अधिकारी, विविध क्षेत्रातील समाजभूषण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच भारती फाउंडेशनच्या वतीने अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली. अत्यंत देखणा आणि भव्य दिव्य असलेला हा पंचसुत्री सोहळा लातूरमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहोळ्याचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्राध्यापक मकरंद गिरी व प्रवीण गिरी यांनी केले.शेवटी दशनाम गोसावी समाज आणि गोसावी वुमन्स विंगच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दशमी नाम गोसावी समाज लातूर आणि वुमन्स विंग, लातूरच्या वतीने परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments