22.8 C
Pune
Thursday, June 25, 2026
Home महत्त्वाच्या घडामोडी मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणार -मुख्यमंत्री फडणवीस

मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणार -मुख्यमंत्री फडणवीस

0
257

स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे दुष्काळमुक्त मराठवाड्याचे स्वप्न साकार करू-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लातूर येथे स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
• जिल्हा सामान्य रुग्णालय, शहर विस्तारीत पाणीपुरवठा योजनेला मंजुरी
• गुत्ती येथील ५ मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण
• जिल्हा परिषदेच्या व्हॉटसअप चॅटबोट उपक्रमाचे उद्घाटन
• विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश, लाभ वितरण

लातूर, दि. ११ (माध्यम वृत्तसेवा) : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे हे कर्तृत्ववान व संघर्षशील नेतृत्व होते. त्यांची कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री पदापर्यंतची वाटचाल संघर्षमय होती. त्यांनी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न पाहिले. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मराठवाड्याच्या हक्काचे पाणी या भागात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी कृष्णा खोऱ्यातील ७ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी यापूर्वीच मंजुरी दिली असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता गोदावरी खोऱ्यातील ५४ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच लातूर शहर विस्तारीत पाणी पुरवठा योजना आणि जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या कामाला मंजुरी देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

लातूर येथे आज स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणानिमित्त दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार सर्वश्री विक्रम काळे, संभाजी पाटील-निलंगेकर, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अभिमन्यू पवार, रमेश कराड, संजय केणेकर, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महापालिका आयुक्त श्रीमती मानसी यांची उपस्थिती होती.

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळाली, हे आपले भाग्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख व स्व. गोपीनाथरावराव मुंडे यांची मैत्री सर्वश्रुत होती. आज जिल्हा परिषदेच्या आवारात स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आहे. स्व. विलासराव देशमुख यांचाही पुतळा जिल्हा परिषदेच्या आवारात आहे. या दोन्ही मित्रांची स्मारके एकाच आवारात आहेत, हा अनोखा योगायोग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

विरोधी पक्षनेता कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्व. गोपीनाथराव मुंडे. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला, अनेक घोटाळे बाहेर काढले. राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याचे काम त्यांनी केले. गृह हे महत्त्वाचे खाते त्यांनी सांभाळले, त्यांच्या काळात मकोका कायदा आणला गेला. गुन्हेगारी दहशतीतून महाराष्ट्राला बाहेर काढण्याचे काम केले. सत्तेत नसतांनाही त्यांचा रूबाब कायम होता, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

सत्तेशी समझोता करू नये, सत्तेशी संघर्ष करावा. बिकट परिस्थितीतही आपल्या विचारांवर ठाम राहण्याची शिकवण स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी दिल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी त्यांनी आंदोलने केली. सर्व समाजासाठी स्व. गोपीनाथराव मुंडे हे हक्काचे घर होते. कोणत्याही समाजाचा त्यांनी व्देष केला नाही. आजच्या राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांची शिकवण अंगिकारली पाहिजे. केंद्रात त्यांना अल्पकाळ केंद्रिय ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या अल्पकाळातही त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखविली. त्यांना मोठा कार्यकाळ मिळाला असता तर वेगळे चित्र दिसले असते. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आज मुख्यमंत्री पदावर काम करत असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

लातूर येथील रेल्वे बोगी निर्मिती कारखाना लवकरच सुरु होत असून यामुळे आगमी काळात १० हजार जणांना रोजगार देण्यात येईल. यामध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या कारखान्याला लागणारे कुशल मनुष्यबळ जिल्ह्यातच तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील. येत्या पाच वर्षात राज्यातील सर्व शेतरस्ते पक्के करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी सर्व सामान्य, दीनदलीत व मजूर यांना न्याय मिळवून दिला. विधीमंडळात मुद्दे मांडण्याची त्यांची शैली वाखाणण्यासारखी होती. स्व. मुंडे यांना अपेक्षित काम देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात होत आहे. श्री. फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राला कणखर नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्या नेतृत्वात जिल्हा विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यावेळी म्हणाले. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाचे काम, सोयाबीन संशोधन केंद्राला मंजुरी देण्याची विनंती त्यांनी यावेळी केली.

स्व. गोपीनाथराव मुंडे आपल्यातून जावून आज ११ वर्ष झाली आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारे लोक आजही मोठ्या संख्येने आहेत. त्यांचे जीवन हे संघर्षमय होते, कितीही संकटे आली तरी स्वाभिमान गहाण टाकायचा नाही, ही त्यांची शिकवण होती. त्यांनी दाखविलेल्या मार्गावरच वाटचाल सुरु असल्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकज मुंडे यांनी सांगितले.

ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या संघर्षाचे व कार्याचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात घडत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट वाढवून आणून ३० लाख कुटुंबांना घरकुल देण्याचे काम मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या नेतृत्वात करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी संघर्ष केल्याचे आमदार धनंजय मुंडे म्हणाले. प्रास्ताविकामध्ये आमदार रमेश कराड यांनी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या लातूर जिल्ह्यासाठी संबंधित विविध आठवणींना उजाळा दिला.

गुत्ती येथील सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण; विविध योजनांचे लाभ वाटप

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना २.० अंतर्गत जळकोट तालुक्यातील गुत्ती येथे उभारण्यात आलेल्या पाच मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. या प्रकल्पामुळे ७७२ शेतीपंपांना दिवसा वीज मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ‘लातूर जिल्हा : वाटचाल प्रगतीकडे’ या विशेष पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच महिला बचतगटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी उमेद अंतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘हिरकणी हाट’ लोगोचे अनावरण यावेळी करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या व्हॉट्सअप चॅटबॉटचे उपक्रमालाही यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. उमेद अंतर्गत तुळजाई उद्योग समुहास २ कोटी ५ लक्ष रूपयाचा धनादेश, तसेच रमाई घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाची चावी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

महाराष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. पुष्पगुच्छ, शाल व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याची प्रतिकृती देवून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन उद्धव फड यांनी केले. माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]