प.पू.विद्यानंदजी सागर महाराजांचे भागवत कथेत प्रतिपादन
लातूर ; दि.२७ (प्रतिनिधी ) – ” जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा या देशातील संत , ऋषी , मुनी महंत , साधू पुढे सरसावतात , त्यामुळे साधुसंतांना अवमान न करता त्यांचा सन्मान करा , त्यांची प्रतिष्ठा जपा , त्यांचा आत्मसन्मान वाढवा , असे आवाहन प.पू. विद्यानंदजी सागर महाराज बाबा यांनी केले.

श्री राधाकृष्ण सत्संग समितीच्या वतीने लातूर शहरातील रिंग रोड भागातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात 1 जानेवारी 2023 या कालावधीत पर्यंत दुपारी एक ते चार या वेळेत विद्यानंदजी महाराज बाबा यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून या कथेच्या तिसऱ्या दिवशीच्या आशीर्वाचनात बाबा बोलत होते . आजच्या कथेत बाबांनी गुरुंची महती , साधू संतांची उपयुक्तता , भारतीय संस्कृती, अनिष्ट प्रथा , अंधश्रद्धा आदींवर विस्ताराने भाष्य करीत काही उदाहरणे , दाखले देत कथा रंजक केली त्यांच्या अमोघ वाणीतील भागवत कथेला दिवसेंदिवस गर्दी वाढत असून संगीताच्या तालबद्ध साथीने बाबांची कथा दिवसागणिक अधिक फुलत आहे.
बाबांच्या भागवत कथेस आंध्र , राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र आदी प्रांतातील साधुसंत , ऋषीमुनींनी हजेरी लावली आहे. आज तिसऱ्या दिवशी स्वामी अमर गिरीजी, ( गुजरात ) ,स्वामी राधेश्वरानंदजी विष्णू , देवानंद गिरीजी (त्रंबकेश्वर नाशिक ) आदी साधुनी उपस्थिती दर्शवली. या साधुनी पूर्ण वेळ उपस्थित राहून बाबांच्या कथेचे रसग्रहण केले. विविध प्रांतातून आलेल्या साधुसंतांचा बाबांनी पुष्पहार घालून त्यांचे पूजन करून सन्मानाने त्यांची व्यासपीठांसमोर अग्रभागी व्यवस्था केली होती.
भागवत कथेत तिसऱ्या दिवशीच्या आशीर्वाचनात विद्यानंदजी सागर महाराज यांनी भारत देश , भारत देशातील संस्कृती आणि धर्माचरण यावर विस्तृतपणे मांडणी केली . बाबा म्हणाले की, भारत ही शूरवीरांची भूमी आहे .भारत ही साधुसंतांची, महापुरुषांची पावनभूमी आहे .अलीकडच्या काळात साधुसंत , महापुरुषांचा वारंवार अवमान केला जात आहे. ही बाब अशोभनीय आहे. या देशाच्या उभारणीत साधुसंत , महापुरुषांचा सिंहाचा वाटा आहे , हे विसरता कामा नये. त्यांना वगळून या देशाचा इतिहास सांगता येणार नाही .

आज कथेच्या तिसऱ्या दिवशीही पूजनीय बाबांनी भोंदू बाबा , खोटे धर्म सुधारक , ढोंगी लोक, भरमसाठ बिदागी घेऊन कथा , कीर्तन करणाऱ्या आणि अमुक इतकी रक्कम घेतल्याशिवाय पाद्यपूजेस येणार नाही अशी गळ घालणार्याचा चांगला समाचार घेतला .अशा लोकांना वेळीच वठणीवर आणण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे असे ते म्हणाले.
गुरुंची महती
गुरुची महती सांगताना विद्यानंदजी महाराज म्हणाले की , गुरु कोणाला म्हणावे ? गुरु कोणाला करून घ्यावे ? हे शिष्याने अगोदर समजून घ्यावे. दीक्षा घेताना त्या गुरुचे आचार विचार काय आहेत हे अगोदर समजून घ्यावे. गुरूंचा सन्मान करा .गुरु जेव्हा शिष्याला मांडी घालून बसायला लावून दीक्षा देतो तेव्हा त्या शिष्याच्या जीवनात बदल होतो तेव्हा त्यावेळी तो नवीन जन्म घेत असतो सदाचाराचा अवलंब करून शिष्याच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊन त्याचे जीवन सुखमय होते .गुरुला आपण ब्रह्माची उपमा दिलेली आहे. गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरातील आई-वडील , आजी-आजोबा हे देखील गुरूच्या ठिकाणी आहेत .त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी आचरणात आणण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे.
ढोंगी लोकांच्या, बुवाबाजी करणार्याच्या नादी लागून जीवन बरबाद करुन घेऊ नका
प.पू. विद्यानंद महाराज यांनी दिला गुरुमंत्र
“आपल्या वरील समस्या ,संकटाचे निराकरण करण्यासाठी आपण अनेक बुवाबाजी करणार्या , भोंदूगिरी करणार्या भोंदूबाबाच्या मागे लागून आपले जीवन बरबाद करुन घेत आहोत ,कोणताही बाबा, देव तुमचे जीवन सुधारु शकणार नाही ,असा गुरुमंत्र प.पू. विद्यानंदजी सागर महाराज यांनी दिला.
आज श्रीकृष्ण जन्मसोहळा भव्यतेने साजरा होणार
भागवत कथेच्या चौथ्या दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्याची कथा पूजनीय विद्यानंदजी सागर महाराज बाबा हे सांगणार असून या सोहळ्याची जय्यत करण्यात आली आहे. तसेच आज बाबा प्रल्हादाचे चरित्र , वामनाची कथा , राम अवतार आदीची कथा देखील सांगणार आहेत. या श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्यास बहुसंख्य भाविक भक्तांनी भारतीय पोषाखसह उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
छाया ..विविधा आणि ओम फिल्म्स लातूर