25.5 C
Pune
Thursday, June 19, 2025
Homeमहाराष्ट्रशकू आत्या

शकू आत्या

व्यक्ती विशेष

माहेरी आम्हा खारकरांच्या घरात काही कार्यक्रम असेल आणि पाच-पंचवीस लोक जमले असतील तर एखादी गोरीपान ठेंगणी, ठुसकी, डोक्यावरचे केस पांढरेशुभ्र झालेली सत्तरीच्या वयाची चष्मा लावलेली आणि चेहर्‍यावर प्रसन्न हास्य असलेली बाई जर कुणाची मुलाखत घेताना दिसली तर तुम्ही हमखास समजा त्या आमच्या शकुआत्याच आहेत.

शकुआत्या म्हणजे माझ्या वडिलांची धाकटी बहिण. त्यांना माणसं समजून घेण्याचा विलक्षण छंद आहे. भेटेल त्या प्रत्येक माणसाची त्या मुलाखत घेतात, यशापर्यंत तू कसा पोहोचलास? या पोस्टसाठी तुझी कशी निवड झाली? तुझ्यातले कोणते गुण लोकांना आवडतात? अशा प्रकारचे अनेक प्रश्न न थकता त्या समोरच्या माणसाला विचारतात. यशस्वी माणसांबद्दल त्यांना विलक्षण कुतूहल वाटतं. आम्ही त्यांना गंमतीने ‘गरिबांची तब्बसुम’ म्हणतो. त्याही दिलखुलासपणे तो किताब स्वीकारतात.

त्यांच्या आयुष्याकडे मागे वळून बघितलं तर तो एक न थांबता, न थकता, केलेला चिवट प्रवास असेच म्हणावे लागेल. त्यांच्या आई-वडिलांची परिस्थिती साधारण होती. त्यात आठ-दहा माणसांचा गोतावळा. परत येणारे-जाणारे खूप असत. त्यांनी अतिशय नेटाने शिक्षण पूर्ण केलं. शाळा संपल्यावर त्यांनी डीएड केलं आणि शिक्षिकेची नोकरी पत्करली. वडिलांच्या संसाराला आत्याबाईनी शिक्षण संपल्यापासूनच हातभार लावला.

काटकसर हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे पूर्वी गरीबी होती आणि आता सवय म्हणून. त्यांची दोन्ही मुलं करोडपती. परंतु आत्यांची राहणी नेहमीप्रमाणेच साधी आहे. त्यांच्यात कुठलीही गोष्ट रसाळपणे सांगायची एक विलक्षण हातोटी आहे. सत्तर वर्षाचा सगळा इतिहास त्यांना तोंडपाठ आहे. त्या खूपच गोष्टीवेल्हाळ आहेत त्यांच्याशी बोलणं म्हणजे एक आनंद यात्रा असते. त्या त्या काळातला इतिहास समोर उभा राहतो. एखादी गोष्ट, आठवण सांगण्याची त्यांची शैली चित्रमय आहे.

त्यांचा एक मुलगा दुबईला असतो. सतीश त्याचं नाव. त्या पहिल्यांदा दुबईला गेल्या. तिथले सगळे वैभव बघून लहान मुलासारख्या हरखल्या. इतकी वर्ष दुधाची आलेली पिशवी धूऊन पुन्हा वापरायची त्यांची सवय होती. पण दुबईत मात्र त्यांची सून चांगलेचांगले टीन/प्लास्टिकचे डबे वापरून फेकून देते हे पचवणे त्यांना फार अवघड गेलं! परदेशात छोट्या-मोठ्या गोष्टी विकत घेतल्यावर अतिशय आकर्षक अशा कॅरीबॅग मिळत. त्यांनी तिथे गेल्यावर विविध ठिकाणी मुला-मुलींनी खरेदी केलेल्या सामानाबरोबर आलेल्या सुंदर, दणगट कॅरीबॅग गोळा केल्या आणि परभणीला जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना वाटल्या. मुलं खूप खुश झाली. जेव्हा मुलं त्यांना ‘एक साथ नमस्ते’ म्हणायची त्यावेळेस त्यांना वाटायचं या मुलांसाठी अजून आपण खूप काही करायला हवे.

त्यांचं वाचन प्रचंड आहे सगळ्या प्रकारची पुस्तके त्यांनी वाचली आहेत. मध्यंतरी त्यांना डॉक्टरांनी बायपास सर्जरी करायला सांगितलं होते. त्यांनी सुनेला सांगितले की ज्यांची बायपास सर्जरी करायची आहे त्या पेशंटचेचे काय हाल होतात अशी काही वर्णन असलेली पुस्तकं आणून दे. कल्पनाने पुस्तक आणून दिलं त्यात देश-विदेशातील 100 महनीय व्यक्तींचे मृत्यूच्या जवळ जातानाचे अनुभव होते. ते त्यांनी वाचले व धीटपणे त्या डॉक्टरांना म्हणाल्या अँजिओप्लास्टी करताना मला भूल देऊ नका मला ते सगळे स्वतःच्या डोळ्यांनी बघायचा आहे. त्यांनी ते ऑपरेशन वयाच्या सत्तराव्या वर्षी अनुभवले. सगळा जीवनानुभव आत्यांनी रसरशीतपणे स्वीकारला आहे. आजही त्यांच्या घरी गेलात तर किमान दहा प्रकारची लोणची पाच-सहा प्रकारच्या चटण्या दिसतील.

त्यांना पाहुण्यांची विलक्षण आवड आहे. लोकांनी आपल्याकडे यावं, राहावं, असं त्यांना वाटतं. त्या खूप सहनशीलही आहेत. चार माणसांच्या कुटुंबात भांड्याला भांडं लागतं लोक बोलतात पण त्या सहजपणे काही न बोलता सहन करतात. विसरूनही जातात. आयुष्यात त्यांनी अनेक संकटांचा सामना केला आहे. कडक शिस्तीच्या पतीला सांभाळले आहे. अनेक भाच्या-पुतण्यांची लग्न लावून दिली आहेत. त्यांनी खूप शारीरिक दुखणी, मानसिक त्रास, चढउतार सहन केला आहे. पण या सगळ्याचा कडवटपणा त्यांच्या स्वभावात आला नाही. आमच्या बरोबरीने गप्पा मारण्याची त्यांना आवड आहे त्यांची थट्टामस्करी केली तर त्या दिलखुलासपणे त्यात सहभागी होतात. मोठी आत्या असा दबाव आमच्यावर कधीही येत नाही.

एकदा मला कुठलातरी पुरस्कार मिळाला होता. त्यावेळेस त्या म्हणाल्या, ‘काही म्हणा खारकरांच्या मुली हुशारच आहेत. ती हुशारी त्यांच्या रक्तातच असते. सगळ्या मुली कशा कर्तबगार निघाल्या.’ त्यावेळेस मी हसून म्हणाले, ‘काय आत्याबाई, तुम्ही माझी तारीफ करत आहात का स्वतःची स्तुती? त्यावर त्या म्हणाल्या, ‘मी काय माझी स्तुती करतेय ग? तुझीच तर तारीफ करते आहे ना? त्यावर मी म्हटलं, “तुम्ही म्हणताय खारकर यांच्या मुली हुशारच आहेत. पण खारकर यांच्या मुलींमध्ये तुम्ही पण आहात की! आणि तुम्ही तर आद्य खारकरकन्या आहात.” त्या वेळेस त्यांनी दिलखुलास दाद दिली आणि त्यानंतर आमच्या कुटुंबात त्यांचे नाव “आद्य खारकर कन्या” असे झाले ते कायमचेच.

   माझ्या जडणघडणीत आत्याबाईंचा फार मोठा वाटा आहे. शाळेत असताना आम्ही त्यांच्या परभणीच्या घरी जात असू, त्यावेळी त्या खूप पुस्तके आणून ठेवत. वाचनाची गोडी मला तिथे लागली. कोवळ्या वयात मृत्युंजय, ययाती, स्वामी, काळे पाणी, वीर सावरकरांचे चरित्र, कर्हेचे पाणी, अशी कितीतरी पुस्तके वाचल्याचे आठवते.

बदलत्या जीवनप्रवाहात नाती बदलली, माणसं बदलली, आपुलकी संपली आणि व्यवहार सुरू झाला. हे सगळे प्रत्येकाला स्वीकारावे लागते. आज-काल कुणाकडे गेलो तर बरेचजण आपण काय आणले आहे की आपण किती उपयोगाचे आहोत याचे गणित सुरू करतात. प्रत्येक भेटीत औरंगाबाद जास्तीतजास्त अनोळखी आणि परकं होत चालले आहे. पण आत्या मात्र आहे तशाच आहेत. मी येणार म्हटल्यावर चार पदार्थ करून निरपेक्षपणे माझी वाट बघतात. माझ्या आनंदात स्वतःचा आनंद शोधतात. हा केवढा मोठा दिलासा आहे!

(हा लेख १७ वर्षापूर्वी दैनिक दिव्य मराठी त प्रसिद्ध झाला होता. काल आत्याबाईचे दु:खद निधन झाले. एक मोठा अध्याय संपला! एका रसरशीत जीवनाचा अंत झाला. पोरकेपणाचे आभाळ भरून आले आहे. पण मला माहिती आहे की, आत्याबाई, आमच्या आद्य खारकरकन्या तुम्ही कुठे दूर गेलेला नाहीत. तर आमच्यात, आमच्या रक्तात, आणि प्रत्येक श्वासात आहात.)


श्रद्धा बेलसरे खारकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]