भाग ५–लेखमाला
अंबाजोगाईच्या आसमंतात निजामाच्या अत्याचारी राजवटीच्या विरुद्ध संघर्ष होता. स्वामी रामानंदतीर्थांच्या नेतृत्वाखाली हैद्राबाद मुक्तीचा लढा निकराने लढला गेला होता. कासीम रिझवीच्या रझाकारांनी सर्वत्र हैदोस घातलेला होता. हे सर्व असून सुद्धा अंबाजोगाईतील निजामशाही बरोबरील संघर्ष कधी हिंदू-मुस्लीम संघर्षात रुपांतरीत झाला नाही. सामान्य हिंदू आणि मुस्लीम इथे सलोख्याने राहिले. स्वामींच्या नेतृत्वाखाली नावारूपास आलेल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेने परिसरातील अनेकांना देशप्रेमाचे आणि समाजकार्याचे संस्कार दिले.आई याच वातवरणात लहानाची मोठी झाली.
अंबाजोगाईचा परिसर अनेक सुंदर अशा हेमाडपंथी मंदिरांनी सजलेला. पश्चिमेला असलेले श्री.खोलेश्र्वराचे मंदिर पाहताना स्तिमित व्हायला होते. तेथे असणारा शिलालेख अंबाजोगाईचा पुरातन वारसा सांगतो. मंदिराच्या दक्षिणेला असलेला उंच बुरुज भव्य इतिहासाची साक्ष देतो. तेथून सरळ पूर्वकडे आलो की चौकात लागणारे गणेश मंदिर. ह्या भागाला चौभारा असे पण म्हणतात. गणेश मंदिराचा सुंदर कळस आणि दर्शनी भागातच असणारा शिलालेख. चौकातून उत्तरेकडे जाणारा रस्ता सरळ घेवून जातो ते जिरेगल्लीत. इथेच दोन मजली घर आईच्या वडिलांनी विकत घेतले होते. विविध जातीचे बांधव याभागात गुण्यागोविंदाने राहत होते. प्रत्येकाच्या आपल्या परंपरा होत्या तरीही त्यांचे एकमेकांशी असणारे नाते घट्ट स्नेहाचे होते.

आईचे लग्न ठरले आणि बाबांचे चौभाऱ्यात येणे नित्याचे झाले. दररोज सकाळी बाबांच्या सोबत कुणीतरी चिक्षे परिवारातील असायचे. बाबांचे आईला भेटायला येणे म्हणजे घरातील प्रत्येकाच्यासाठीच नाही तर अगदी किरायदारांच्यासाठी पण आनंदोत्सव असायचा. बाबांचा स्वभाव खूपच मोकळा आणि खुशमस्करी करणारा. सर्वाना खूप जीव लावणारा. थोड्याच दिवसात गल्लीतील डाके, जिरे, गडम परिवारांशी पण त्यांचा स्नेहबंध जुळला.आईसाठी हि भेट थोडी अडचणीची होती. तिचा सकाळी नेमका इंग्रजीचा तास असायचा आणि बाबा आल्याने ते नेमका बुडायचा. तिच्या मित्र- मैत्रिणीसाठी तर आता हा विषय चांगलाच गंमतीचा बनला होता. बाबांच्या घरी येण्यावरून तिला चिडवणे सुरु झाले.
‘लष्करा पासून चौभाऱ्या पर्यंत पेरला हरबरा आणि चिक्षे मारतात येरझाऱ्या’
अशा शाब्दिक कोट्या पण होऊ लागल्या.
आईला चार भावंड. तिच्या पाठचा अनिल चार वर्षांनी लहान. तो माझा अण्णामामा. अण्णामामा म्हणजे हरहुन्नरी माणूस. अभ्यासात फारशी रुची नसल्याने गती नव्हती. दहावीला मात्र त्याने जोरदार अभ्यास केला आणि अभ्यासातील पण आपली चुणूक दाखवली. त्याच्या पाठचा प्रमोद म्हणजे बापूमामा. अभ्यासातील प्रचंड गती असणारा. अंबाजोगाईच्या हुशार मुलात त्याची गणना होते. त्याच्या पाठची लता म्हणजे लतामावशी गोरेली आणि चुणचुणीत. सर्वात छोटा म्हणजे संजय संजूमामा मनमौजी माणूस. आई आणि इतर भावंडांच्या वयातील अंतर थोडं जास्त असल्याने आईचे लग्न सर्वांच्यासाठी खूपच आनंदाचा विषय होता. मंगलताईचा होणारा नवरा म्हणजे त्यांचा भाऊजी त्यांचे भारीच लाड करत असत. सायकलीवर फिरायला नेणे हे तर खास असे. बाबांचे फक्त आईशीच लग्न ठरले असे नव्हते तर संपूर्ण घराशी एक अनोखे नाते बनत होते.
क्रमशः

लेखन : प्रसाद चिक्षे
अंबाजोगाई