*भारतीय जनता पार्टीचा इशारा*

0
250

शेतकर्‍यांच्या मदतीसाठी भाजपाने दिला आघाडी सरकारला अल्टीमेंटम

आ. निलंगेकर व आ. कराडांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

लातूर/प्रतिनिधी ः- अतिवृष्टी आणि नदीपात्रातून पुर्व सुचना न देता सोडण्यात आलेले पाणी यामुळे निर्माण झालेली पुरपरिस्थिती याच्या परिणामाने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झालेले असून अनेकांच्या जमीनी खरडून गेलेल्या आहेत. शेतकर्‍यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहून शासनाच्या वतीने तात्काळ सरसकट मदत मिळणे अपेक्षीत होते. मात्र अद्यापपर्यंत मदत न मिळाल्याने भाजपाने आज आघाडी सरकारला 72 तासाचा अल्टींमेटम जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून दिलेला आहे. या अल्टींमेटम सोबतच विविध मागण्याचे निवेदन आ. संभाजी पाटील निलंगेकर व जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांना दिले आहे.

यावर्षी वेळेवर पाऊस पडल्याने शेतकर्‍यांनी वेळेवर पेरणी केलेली होती. परिणामी खरीपाची पिके सुद्धा जोमात आलेली होती. मात्र जिल्ह्यात दोन वेळा अतिवृष्टी झाली. कांही भागात तर ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शेतीचे मोठे नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने आधीच शेतामध्ये पाणी-पाणी होऊन अनेकांची पिके वाहून गेलेली आहेत. त्यातच जल प्रकल्पामध्ये पाणी अतिरिक्त झाल्याने कोणतीही पुर्व सुचना न देता हे पाणी नदीपात्राद्वारे सोडण्यात आले. आधीच अतिवृष्टी आणि त्यात नदीपात्रातून सोडण्यात आलेले पाणी यामुळे आणखीन जलमय परिस्थिती निर्माण झाली परिणामी अनेकांच्या शेतात पाणी घुसून पिके वाहून गेली. कांहीजणांची तर जमीन सुद्धा खरडून गेलेल्या आहेत. शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला पिकाचा घास अस्मानी आणि सुल्तानी संकटामुळे हिरावला आहे. या परिस्थितीत शेतकरी उद्वस्त झालेला असून त्यांना तात्काळ शासनाच्या वतीने सरसकट मदत मिळणे अपेक्षीत आहे. मात्र अद्यापही शासन पंचनाम्याचे कागदी घोडे नाचवत असून अजून मदतीबाबत कोणतीच घोषणा अथवा हालचाल झालेली नाही. शेतकर्‍यांना वेळेत मदत न मिळाल्यास त्यांना रब्बीची पेरणी करणे सुद्धा अशक्य होणार आहे.

शेतीपिकाचे झालेले नुकसान आणि शेतकर्‍यांची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाच्या वतीने त्यांना तात्काळ सरसकट मदत मिळावी अशी मागणी भाजपाच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. मात्र अद्यापर्यंत शासनाने याची दखल न घेतल्याने आता भाजपाने आघाडी सरकारला शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी 72 तासाचा अल्टीमेंटम दिलेला आहे. हा अल्टीमेंटम देण्यासाठी व विविध मागण्यांकरीता जिल्हा भाजपाच्या वतीने माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर व जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिलेले आहे. जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयामध्ये या मागणीचे निवेदन भाजपाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकार्‍यांनी दिले आहे. या अल्टीमेंटमद्वारे 11 तारखेपर्यंत शासनाने शेतकर्‍यांना सरसकट मदत न दिल्यास आणि पिकविमा कंपनीकडून विमा रक्कम देण्यासाठी निर्देश न दिल्यास 72 शेतकर्‍यांना सोबत घेऊन भाजपा 72 तासाचा अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. यावेळी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्षा सौ. भारतताई सोळूंके, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, जि.प. चे माजी सभापती तथा जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, चेअरमन दगडू सोळूंके, डॉ. बाबासाहेब घुले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here