*पृथ्वी वाचवण्यासाठी बांबूपासून तयार होणारा इकोफ्रेंडली टूथब्रश वापरा-आ. डॉ राहुल आहेर*=
पाशा पटेल यांच्या पुढाकारातून साकारतोय बांबूपासून टूथब्रश निर्मितीचा मराठवाड्यातील पहिला महाराष्ट्रतील दुसरा कारखाना
प्लास्टिकचा ब्रश हजारो वर्ष नष्ट होत नाही-पटेल*पाशा पटेल म्हणाले की, प्लास्टिकचा ब्रश हजारो वर्षे वापरलातरी तो नष्ट होत नाही अर्थात त्याचे विघटन होत नाही, ही बाब पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. याउलट, बांबूपासून तयार केलेल्या इकोफ्रेंडली ब्रशची 1 वर्षात माती होते म्हणजेच तो नष्ट होतो. या कारखान्यात दररोज 25000 टूथब्रशची निर्मिती होणार असून, मागणीनुसार उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी ठिकाणी युनिट सुरू करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.
*लातूर/प्रतिनिधी* –
प्लास्टिक हे पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरत असून, टप्प्याटप्प्याने प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे धोरण सरकारने आखले सर्व प्रकारच्या प्लास्टिक वस्तूवर बंदी आणली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सरकारच्या या पर्यावरणपूरक संकल्पनेचा एक भाग म्हणून प्लास्टिक टूथ ब्रशला पर्याय बांबूपासून टूथब्रश निर्मितीचा देशातील पहिले बांबू पासून टूथब्रश चे निर्माते पुण्याचे श्री योगेश शिंदे यांचा भागीदारीने मराठवाड्यातील पहिला व महाराष्ट्रातील दुसरा कारखाना पर्यावरण अभ्यासक तथा बांबू लागवड व वापर चळवळीचे प्रणेते पाशा पटेल यांच्या संकल्पनेतून साकारल्या जात असलेला बांबूपासून ब्रश निर्मितीचा कारखाना ही एक पर्यावरण संरक्षणातील क्रांतिकारी चळवळ असून, पृथ्वीवरील मानव जात वाचवायचे असेल तर प्रत्येकाने बांबूपासून बनवलेल्या टूथब्रशचा वापर करावा, असे आवाहन नाशिकचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले. पृथ्वीवरील मानव जात वाचवण्यासाठी सरकार दगडी कोळसा, पेट्रोल, डिझेल या इंधनाला पर्याय म्हणून बांबूचा वापर करण्याला प्राधान्य देत आहे. प्लास्टिकदेखील पर्यावरणासाठी घातक आहे. त्यामुळे हळूहळू सरकार प्लास्टिक वापरातून हद्दपार करण्यासाठी पावले उचलत असून प्लास्टिकवर बंदी आणत आहे. यात आपलेही योगदान असावे म्हणून पाशा पटेल यांनीही पावले उचलली असून, त्यांच्या फिनिक्स या संस्थेमार्फत बांबूपासून टूथब्रश तयार करण्याचा कारखाना लातूर जिल्ह्यातील लोदगा येथील फिनिक्स कॅम्पसमध्ये साकारत आहे. या कारखान्याच्या शेडचे भूमिपूजन रविवारी (ता. 20) आमदार डॉ राहुल आहेर यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पाशा पटेल, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर, सोलापूर येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते शहाजी पवार, कुमार करजगी, जयदीप वानखेडे, नाशिकचे उद्योगपती पप्पू चांदवडकर, डॉ. निलेश निकम, दिनेश देवरे,कुडाळचे संजय करपे आदींची उपस्थिती होती.

यावेळी आ. डॉ राहुल आहेर पुढे म्हणाले की, पर्यावरण संरक्षण ही सरकारच नव्हे तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण पृथ्वीवरील मानव जात वाचविण्यासाठी आता प्रत्येकाने पर्यावरणपूरक इंधन आणि वस्तू वापरणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने जसे पेट्रोल-डिझेल दगडी कोळसा या घटकांना पर्याय म्हणून बांबूचा वापर करण्यावर भर दिलेला असून, त्यासाठी पर्यावरण अभ्यासक पाशा पटेल हे गेल्या पाच वर्षपासून देशभर बांबू लागवड आणि बॉयलरमध्ये दगडी कोळसाला पर्याय म्हणून बांबूचा वापर करण्यासाठी जनजागृती करत आहेत. त्याची फलश्रुती म्हणजे परळी येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्प तसेच अनेक औद्योगिक कंपन्यांमध्ये बॉयलरमध्ये काही प्रमाणात बांबूचा वापर सुरू करण्यात आला, याचे श्रेय पाशा पटेल यांनाच जाते. जगातील प्रत्येक जण सकाळी टूथब्रशचा वापर करतो. हे ब्रश प्लास्टिकचे असतात आणि प्लास्टिक हे पर्यावरणासाठी घातक सिद्ध झालेले आहे. त्याला पर्याय म्हणून पाशा पटेल हे बांबूपासून ब्रश निर्मितीचा मराठवाड्यातील पहिला व महाराष्ट्रातील दुसरा कारखाना येथे सुरू करत आहेत, ही अख्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. प्रत्येकाने बांबूच्या टूथब्रशचा वापर करून पर्यावरण वाचविण्याच्या चळवळीत आपले वैयक्तिक योगदान द्यावे, असे आवाहन आ. आहेर यांनी केले.
प्रास्ताविकपर भाषणात पाशा पटेल म्हणाले की, केंद्र सरकारच्या प्रत्येक पर्यावरण संकल्पनेला आपण प्रतिसाद देत, त्यावर काम करणे सुरू केले आहे. गेल्या पाच वर्षापासून पर्यावरणपूरक बांबू लागवड आणि त्याचा वापर, गोदा खोऱ्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन अशा प्रकारचा कार्यक्रम लोकसहभागातून हाती घेऊन प्रदूषण थोपविण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्लास्टिक कोणतेही असो ते हजारो वर्ष नष्ट होत नाही, ही बाब प्रदूषण वाढविणारी आहे. अबालापासून थोरांपर्यंत सर्वजण प्लास्टिक टूथब्रशचा वापर करतात आणि महिनाभरानंतर दुसरा ब्रश घेतात. फेकून दिलेले ब्रश विघटन पावत नाहीत अर्थात नष्ट होत नाहीत. त्यामुळे प्रदूषणाच्या अनेक समस्या निर्माण होतात. बांबूपासून गृहसजावटीपासून ते टी-शर्ट पर्यंतच्या सुमारे 1800 वस्तू तयार करता येतात. त्याचप्रमाणे बांबूपासून टूथब्रशही तयार होतात. प्लास्टिकपासून वापरातील टूथब्रशची संख्या दैनंदिन वापरातील प्लास्टिक वस्तू वापराच्या संख्येच्या तुलनेत सर्वात मोठी असल्याने आमच्या फिनिक्स संस्थेमार्फत बांबूपासून टूथब्रश निर्मितीचा कारखाना सुरू होत असून, त्याची मुहूर्तमेढ आज रोवली गेली आहे. लवकरच या कारखान्यातून प्रति दिवस 25000 याप्रमाणे बांबू ब्रश निर्मितीला सुरुवात होईल, अशी माहिती त्यांनी दिली व तसेच पृथ्वी जर वाचवायची असेल तर प्लास्टिक ला पर्याय म्हणून बांबू वापरणे गरजेचे आहे त्यामुळे पहिल्यांदा बांबू च्या ब्रश पासून सुरुवात करून हळू हळू इतर ही वस्तू येणाऱ्या काळात पर्यवरण संरक्षणासाठी बांबू च्या वापराव्यात असे आव्हान पाशा पटेल यांनी यावेळी बोलताना केले.